शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०१०

बीटची बर्फ़ी


साहित्य : २ मोठे बीट, खवा अर्धा पावशेर, साखर १ मोठी वाटी,वेलदोड्याची पुड १ मोठा चमचा,बारीक तुकडे केलेले काजु अर्धी वाटी, १ चमचा तुप, बर्फ़ी वर लावायला चांदीचा वर्ख.







कृती :- प्रथम बीटची साले काढुन घेउन ते किसुन घ्यावे. किसलेले बीट मिक्सरमधुन बारीक करुन घ्यावे.












मिक्सरवरुन बारीक केलेले बीट जाड बुडाच्या कढईत कोरडे होईपर्यंत परतुन घ्यावे. कोरडे झालेले बीट एका डीश मधे काढुन घेउन त्याच कढईत खवा परतायला घ्यावा.खवा चांगला लाल होइपर्यंत भाजावा.
खवा लालसर झाल्यावर त्यात आधी परतुन घेतलेले बीट घालुन त्यातच साखर घालावी आणि मिश्रण एकजीव करुन परत घट्ट होइपर्यंत परतावे.हे मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पुड आणि काजु घालावेत. मिश्रणाचा थापता येइल असा गोळा तयार झाला की तो तुप लावुन ठेवलेल्या डीश मधे घेउन वर प्लॅस्टीकचा कागद ठेऊन एकसारखे थापावे















थोडे कोमट झाले की त्याच्या वड्या पाडाव्यात आणि त्यावर चांदीचा वर्ख लावुन लावुन त्या वड्या डीश मधे काढुन सर्व्ह कराव्यात....



टीप :- आपण असेही या वड्या करु शकतो. कोरडा झालेला बीट आणि खवा एकत्र करुन परत चांगले परतुन घ्यावे. घट्ट होइपर्यंत. आणि गार झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी जसे आपण बेसनाच्या लाडवाला घालतो तसे आणि वड्या थापाव्यात.

बुधवार, १० नोव्हेंबर, २०१०

आशु



अश्विनी
....


ऑर्कुटवर मैत्री झालेल्यामधील ही अगदी जवळची मैत्रिण. एका मित्रामुळे हिची ओळख झाली. आणि ही नेटवरची ओळख अगदी गाढ मैत्रीत केव्हा रुपांतरीत झाली कळलेच नाही. साधारण महिने आम्ही गप्पा मारत होतो चॅटवर. एकमेकींची सुखदुःखे शेअर करीत होतो. माझ्यापेक्षा जराशीच लहान असलेली ही मैत्रिण अत्यंत भावुक होती आणि आहेही. अशाच गप्पांमधुन तीची आई नसल्याने ती आणि तिचे मिस्टर, मुलगा तिच्या माहेरीच राहतात असे समजले. त्यामुळे माहेरपणाला जायचे म्हणजे कुठे जायचे हा प्रश्न कायमच तिच्यासमोर असायचा. मला एक दिवस म्हणाली " शरु मी तुझ्या घरी येउ? माहेरपणाला दिवस? " आयला सॉलीडच... कारण अशा नेटवरच्या ओळखीतुन घरी येते म्हणालेली ही पहिलीच. मी माझ्या नवर्याशी बोलुन सांगुन टाकले तीला की तु कधीही येउ शकतेस आमच्या घरी. आणि मग तीने तीच्या नवर्याशी बोलुन येण्याचा दिवस पक्का केला. एका रवीवारी सायंकाळी तीचे आगमन सांगलीत झाले आणि माझ्या नवर्याबरोबर( माझे मीस्टर सांगलीत नोकरीस असतात) ती घरी आली आणि फ़क्त फ़ोटो मधे पाहिलेल्या आम्ही प्रत्यक्ष पाहत्या झालो :) दारातच एकमेकींच्या गळ्यात पडलो. असे वाटलेच नाही की आमची मैत्री नेटवरची आहे. बालमैत्रिणी भेटलो बरेच दिवसानी असे वाटत होते. मे महिन्याचे दिवस असल्याने आमरसाचा बेत केलेला. मस्त भरपेट हादडुन आम्ही रात्री पर्यंत गप्पा मारल्या. गप्पा मारता मारताच झोप लागली म्हणा ना...:) दुसर्या दिवशी मी, आशु, माझी कन्या आणि मीस्टर असे सगळे कोल्हापुरला देवीच्या दर्शनाला गेलो. दर्शन घेउन मस्त हातात हात घालुन बागडत कोल्हापुर हिंडलो. अगदी लहानपण अनुभवले. ती असतानाचे दोन तीन दिवस खरच खुप मजेत गेले. सध्या लहानपणच्या रुसण्याचा अनुभव घेतेय. :(

मंगळवार, ९ नोव्हेंबर, २०१०

नमस्कार...

सगळ्यांचे ब्लॉग आजपर्यंत वाचत होते आणि आहेही. बर्‍याच जणांनी मला विचारले की तुझा ब्लॉग नाहीय का? पण मी काही लेखिका नाहीय की कविता करत नाही तर करायचाय काय ब्लॉग? या दिवाळीत नेहमीप्रमाणेच कचकुन ५ दिवसाची सुट्टी मिळाली कंपनीला. डोक्यात दिवाळीचे विचार तर होतेच पण माझ्या आयुष्यात नव्यानेच प्रवेश केलेल्या इंटरनेट जगताचे विचार पण होतेच. त्यातच एक विचार आला की आपण आपला ब्लॉग तयार करायचा विचार एका क्षणात चमकुन गेला. पण लिहायचे काय? आपल्याला जे आवडेल ते लेखन/कविता? छे आजीबात नाही...मग एक नवाच विचार सुचला मला. मी नेटवर भेटलेल्या बर्‍याच व्यक्तींना प्रत्यक्ष भेटते. तर अशा व्यक्तीना भेटल्यावर मला काय वाटते याचे शब्दांकन इथे करावे असे सहजच मनात आले आणि आज ते अमलात आणायला सुरुवात केली.

तसेच माझ्या या ब्लॉगवर मी स्वता काढलेली छायाचित्रे तसेच काही पाककृती छायाचित्रांसहीत देणार आहे.