चंदा डोळे पुसतच पिठाच्या गिरणीत गेली. दादु गिरणीवाल्याने न दळलेल्या दळणाचे डबे मोजत चंदाकडे आपादमस्तक पाहिले. त्याच्या नजरेत अपार करुणा होती.
" काय चंदाराणी काय म्हणताय आज आजी नाय आली का?"
" दादु आबा आजीला ताप चढलाय ना म्हणुन आईने मला पाठवलय. "
तिच्या कडेवरचा न आवरणारा पण मोकळाच डबा दादुने घेतला अन म्हणाला, " जा आता शाळेत तु, मी गिरणी बंद करताना घरी पोचवतो डबा अस सांग तुझ्या मायेला. अन मला सांग तु जेवलीस का नाही? "
दादुपासुन तोंड लपवुन हो जेवले म्हणत ती माघारी निघाली. दादु काय समजायचे ते समजला. त्याने किसनाला आपल्या मधल्या नातवाला साद घातली, " आर ये किसना हिकड ये जरा. माझ काम करशील का रे पोरा."
किसन अभ्यास करत बसला होता. दादुची हाक येताच तो लगेचच दादुकडे आला. " काय रे दादु मला कशाला बोलवलस रे? "
" आर पोरा माझं एक काम कर मी पीठ देतो ते घे आणि मधल्या आळीतल्या राजी वयनीकडे पोचते कर. मगाशी चंदा आली होती पण तिला काही डबा पेलायचा नाही म्हणुन म्या तिला घरी धाडलय. आन एक काम कर. तुझ्या आवशीने भाकरी कालवण केल असल त्यातल थोडं चंदासाठी घेउन जा. मी तोवर डबा भरुन ठेवतो. जा तु पटकन ये. "
दादुकडे ज्वारीची आणि गव्हाची अशा दोन वेगवेगळ्या गिरण्या होत्या. खाली सांडलेले पिठ न्यायला रोज यशोदा चंदाची आज्जी यायची. दादु दोनही पिठे वेगवेगळ्या पिशवीत घालुन ठेवायचा. कधी कधी जास्त दळणे आली नाहीत तर सगळ्या डब्यातले मुठ मुठ पिठ काढायचा. त्याला खर तर ही लबाडी वाटायची पण त्याचा नाईलाज असायचा. आपण लबाडी करतोय पण त्यामुळे चार भुकेले जीव त्यावर जगत आहेत हे समाधान दादुला जास्त होते. खरे तर यापेक्षाही काही जास्त करावे असे दादुला नेहमीच वाटे पण त्याच्या कुटुंबाचे पोटही फ़क्त गिरणीवर चाले.
किसन दादुने दिलेले पिठ चंदाने आणलेल्या डब्यात घेउन निघाला एका हातात भाकरी अन कालवण असलेल्या डब्याची पिशवी होती.
राजी मावशी ए राजी मावशी अशी हाक मारतच किसन घरात शिरला. " मावशे हे घे डबा दादुने दिलाय बघ. अन हे आयेने दिलय. चंदाला खाऊ घाल आन शाळेला पाठव. मी येतो थोड्यावेळात तिला न्यायला. आन यशुआज्जी कशी आहे ग मावशे? दादु म्हणत होता ताप भरलाय म्हणे."
" हो रे किसना, सासुबाई आजारी आहेत. मगाशी दिलाय काढा करुन आता येइल ताप कमी. "
" पण दवाखान्यात ने ग तिला संध्याकाळी. " असे म्हणत तो झपाझप घराकडे निघाला.
भाकरी भाजीचा डबा पाहुन चंदा खुश झाली. आता आज उपाशीच नाही जावे लागणार शाळेला या विचाराने तिला जरा बरे वाटले. पण तरीही अर्धीच भाकरी खाउन ती पानावरुन उठली. राजीने पाहिले तर चार भाकर्या होत्या डब्यात पण खाणारी तोंडे पण सहा होती. राजी, यशु आज्जी, चंदा, मिनी, गणेश आणि शंकर. मिनी आणि गणेश तासाभरात येतील शाळेतुन आणि शंकर ??? कुठल्या गुत्त्यात जाऊन पडलाय कोण जाणे. केवढं छान सोन्यासारखे घर पण शंकरच्या दारुच्या व्यसनापाई आता सुतळीचा तोडाही घरात नसल्यासारखी घराची अवस्था झाली होती.
विचार करत ती केव्हा भुतकाळात पोचली तिचे तिलाच नाही समजले. सात बहिणी आणि तीन भावंडात आठवा नंबर असलेली राजी दिसायला सर्वात खुप सुंदर. तिचे राव खरे तर राजलक्ष्मी पण सारे लाडाने तिला राजीच म्हणायचे. घरची तशी गरीबीच पण खाऊन पिऊन सुखी असे कुटूंब. शेताच्या तीन एकर तुकड्यात वडिल आणि तिघे भाऊ रात्रंदिवस राबायचे. मोठ्या सार्या बहिणींची लग्ने झाली होती. गाव तसे यथा तथाच असल्याने शिक्षणे मात्र कुणाचीही जास्त नव्हती झाली. आणि मुलींना परगावी शिक्षणाला ठेवायचा काळही नव्हता तो. तीन भाऊ मात्र दहावी पर्यंत शिकले, शेजारच्या गावी जाऊन. कधी चालत तर कधी सायकलने. अशातच राजीला जवळच्याच गावातुन मागणी आली. देशमुख घराणे मोठे होते आणि शेतीवाडीही खुप होती. म्हणजे जवळ जवळ शंभर एकर शेती अन तीही बागायती. बर माणसेही चांगली होती. मुलगा दिसायला अगदी राजबिंडा होता. बारावी पास होता. घरी आई वडील अजुन एक भाऊ आणि बहिण. बर बहिणीचेही लग्नाचे वय झाले होते म्हणजे तीही यथावकाश लग्न होऊन सासरी जाणार. म्हणजे घरात माणसेही फ़ार नाहीत. त्यामुळे या घरी राजीला द्यायला घरच्या कुणाचीही हरकत नव्हती. आपली पोर सुखात नांदेल तिथे हा विचार करुन राजीच्या लग्नाचे पक्के करुनच तिचे आई वडिल आणि मोठा भाऊ घरी आले. लग्नात पायातल्या जोडवी पासुन ते माथ्यावरच्या बिंदीपर्यंतच्या सर्व सोन्याच्या दागिन्यांनी राजी नुसती मढली होती. लक्ष्मीसारखी दिसत होती. स्वताच्याच भाग्याचा तिला हेवा वाटत होता. शंकरही वरवेषात अजुनच रुबाबदार दिसत होता जणु गावचा राजाच. अर्थात ते खरही होतं म्हणा. पैसा असल्याने म्हणा किंवा इतर कशानेही गावात देशमुख घराणे वरचढच होते. लग्न होऊन देशमुखांच्या घराच्या उंबर्यावरचे माप ओलांडुन राजलक्ष्मी देशमुख वाड्यात आली. लवकरच आपल्या स्वभावाने तिने सार्यांनाच जिंकुन घेतले.
इकडे तिच्या माहेरी आता वडिलांनाही कष्टाचे काम जमत नव्हते. बर जमीनही चांगली पाणस्थळ होती त्यामुळे जरा कष्ट घेतले की पिकपाणी चांगले यायचे त्यावर वर्षभर गुजराण चालायची. हळु हळु तीनही भावंडे शेतीच करायला लागली. नवे नवे प्रयोग करु लागली. पिकपाणे उत्तम येउ लागले. पैसा अडका गाठीला बांधुन अजुन जमीन विकत घेतली. परिस्थिती पालटु लागली. राजी माहेरी यायची तेव्हा आपल्या माहेरचे पालटत चाललेले रुप पाहुन सुखावुन जायची. आता तिनही भावांच्या बायकाही होत्याच. कधी कधी सार्या बहिणी आपापल्या पिल्लाना घेउन माहेरी यायच्या. प्रत्येकीची २/३ कच्चीबच्ची. घर म्हणजे अक्षरशः गोकुळ वाटायचे. राजीलाही यथावकाश तीन मुले झाली. मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवर दोन मुली. सारे कसे सुखात चालले होते. दरम्यान राजेशचे शंकरच्या लहान भावाचे आणि सुमनचेही लग्न झाले. दोघांच्या संसारवेलीवर अनुक्रमे दोन आणि एक अशी फ़ुले उमललेली होती.
" आई ग अग कुठे तंद्री लागलीय तुझी केव्हाचा हाका मारतोय मी. " इती गणेश.
" अरे तु केव्हा आलास रे शाळेतुन? अन मिनी कुठाय? "
" अग ती आत आहे वाढुन घेतेय. तु जेवलीस का? आणि चंदाने काय खाल्ले? आज सकाळी डब्यात तर कसलेच पिठ नव्हते ना तांदळाचा एकही कण नव्हता."
" थांब जरा ज्वारीच्या पिठाचे आंबील करते ते खा तुम्ही दोघे. मी आज्जीला खायला घालते अन येते. सकाळी दादुनी डबा पाठवला त्याच्या मुलाकडुन. ती बायजा सारखं काही न काही देते म्हणुन बरं आहे पण...... "
" आई माहितेय मला तुला नाही आवडत ते. पण मी पण दुकानात लिखाण करुन देतो त्याचे पैसे जास्त नाही मिळत मग काय करणार. आणि बाबा कुठे आहेत ग ? गेले का नेहमीप्रमाणे? आज काय नेलय घरातनं??? "
" ..................... "
" आई तु अशीच नेहमी गप्प बसत जा. बाबांना काही समजाव नं."
" अरे शुद्धीत असतात तेव्हा समजावते तेव्हा घेतात न समजुन पण बाहेर गेले की ये रे माझ्या मागल्या. मी पण कंटाळलेय आता. पण तुम्हा तिघांकडे बघुन ..... " राजीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.
" आई ग तु नको ना रडु. जरा काही दिवस थांब मी चांगला शिकेन मोठा होईन तुला कशाला काही कमी पडणार नाही बघ. "
" माझं सोनं ग ते " असे म्हणत राजीने गणेशची अलाबला घेतली अन ती उठलीच. गणेश आणि मिनीला वाढुन एकीकडे दादुने पाठवलेल्या ज्वारीच्या पिठाचे आंबील केले. यशोदा आज्जीला आंबील खायला घालुन माजघरात येउन ती जरा झोपायचे म्हणुन आडवी झाली. पण डोळा कुठला लागायला. परत तिचा जिवनपट हळु हळु डोळ्यासमोर येउ लागला.
चंदाचा जन्म झाला अन तिचे रुपडे पाहुन शंकर आणि राजी दोघेही हरकुन गेले. साक्षात दुसरी राजीच. चंदाच्या बाळलिलांनी घर परत एकदा हरकुन गेले. चंदाचा पहिला वाढदिवस मोठा करायचा असे सार्याच देखमुख कुटूंबाने ठरवले. सगळीकडे आमंत्रणं गेली. शेतावरच्या घरात वाढदिवस करायचा असे ठरले. मस्त फ़र्मास बेत होता. शहरातुन आचारी बोलवला होता. जवळ जवळ सर्व गावाला आमंत्रण होते असे म्हणले तरी चालेल. सगळे येउन गेले. अगदी राजीच्या माहेरची पण येउन गेली. राजीचे आई आणी वडील मात्र त्या रात्री थांबले. शेतावरच सर्वांची जेवणे झाल्यावर सगळे गावातील वाड्यात जायला निघाले. शंकर आणि त्याचे काही मित्र मागे थांबले होते. त्याने राजीला सांगितले तुम्ही सगळे जा वाड्यावर मी आज इथेच मुक्कामाला राहतो माझे मित्रही आहेत मुक्कामाला. त्यांना जरा वेगळी पार्टी हवीय त्याची व्यवस्था केलीय मी. राजीही लगेच तयार झाली. कारण आपल्या नवर्याला ती चांगलीच ओळखत होती. काही झाले तरी वेडवाकडं काही करणार नाही याची खात्री होती त्यामुळे ती बिनधास्त वाड्यावर निघाली. आणि तसही शंकरचा मुक्काम बरेचदा शेतावरच्या घरात असायचा. आक्षेपार्ह वागणं कधीही नसायचे त्याचे.
सकाळचे नऊ वाजले तरी शंकर वाड्यावर आला नव्हता. असे आजवर कधीच घडले नव्हते. रात्री कितीही उशीर झाला तरी पहाटे पाचला शंकर उठायचाच. उठुन जोरबैठका मारुन घामाघुम झाल्यावर बाहेरच्या झोपाळ्यावर निवांत बसलेला असायचा थोडावेळ. मग सकाळची आन्हिके आवरुन पुजा पाठ करुन मग एक तांब्याभर निरसे दुध प्यायचा. पेपर वाचुन मग गावात फ़ेरफ़टका मारुन तसच शेतावर जाऊन दुपारी दोन वाजता जेवायलाच घरी यायचा. अगदी शेतावर मुक्कामाला गेला तरी त्याच्या सकाळच्या या दिनचर्येत काहीही फ़रक पडला नव्हता. लग्नानंतरच्या एवढ्या वर्षात प्रथमच हे असे घडले होते. उगाचच मनात कुठेतली पाल चुकचुकायला लागली. अकरा वाजत आले तशी राजीची अवस्था केविलवाणी झाली. शंकरचे आई वडिल पण काळजीत पडले. राजेश शंकरचा भाऊ आता मात्र शंकरला बघायला बाहेर पडला. राजेशची बायको मनिषा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आलेली सुमन राजीला धीर देत होते. तासभर गेला असेल नसेल राजेशची जीप दारात उभी राहिली. मागे शेतावरचा एक गडी शंकरला धरुन बसला होता. राजीच्या छातीस धस्स झाले. काय वाढुन ठेवलेय पुढ्यात तिला काही समजेना. ती वार्याच्या वेगाने जीपकडे धावली. राजेशने तिला शांत केले म्हणाला, " वहिनी काळजी करु नका, दादा अती दारु पिल्याने बेशुद्ध आहे. बाकी काहीही झालेले नाहीय." आपला नवरा दारु प्यायला हे समजल्यावर ती मटकन खालीच बसली. मनिषा आणि सुमनने तिला धीर देउन आत आणले. जरा पाणी प्यायला दिले. यशोदा एकदा तिच्याकडे अन एकदा आढ्याकडे बघत नुसतीच पडुन होती. अन तिच्याजवळ घरचे मोठे कारभारी विष्णुपंत हतबल होऊन बायकोकडे पहात बसलेले.
दुपारनंतर शंकर शुद्धीवर आला. त्याची त्यालाच लाज वाटायला लागली. उठुन बाथरुमात जाऊन उलट्या केल्या. आंघोळ करुन बाहेर आला तोपर्यंत सर्वजण माजघरात एकत्र आले होते. त्याने सर्वांची माफ़ी मागितली. पुन्हा असे होणार नाही. याची ग्वाही दिली. कुणीच काही बोलले नाही. राजीने सर्वांची पाने घेतली. सकाळपासुन लहान मुले सोडता कुणाच्याच पोटात अन्नाचा कण नव्हता. तरीही सारेजण उगाचच जेवायचे म्हणुन जेवले. झालेल्या प्रकाराने सर्वांचीच अन्नावरुन वासना उडाली होती. ताटावरुन उठुन शंकर खोलीत गेला. आणि बाकी सारेजण आपाप्ल्या खोलीत गेले. मागचे सारे आवरायला राजीला मदत करुन मनिषा आणि सुमनही आपापल्या खोलीत गेल्या. राजी मात्र स्वयंपाकघरात लहानग्या चंदाला घेउन तशीच बसली होती. झाल्या प्रकाराचा विचार करत. अशी कशी काय दारु प्यायची अवदसा आपल्या नवर्याला आठवली याचा विचार करुन करुन ति थकली अन बसल्या जागीच तिचा डोळा लागला.
कसल्याशा आवाजाने ती जागी झाली. पाहिले तर नुकतीच चालायला लागलेली चंदा स्वयंपाकघरातल्या कपाटाकडे गेली होती. त्या कपाटाला धरुन ती उभी रहात असताना काहीतरी पडले. अन त्या आवाजाने ती जागी झाली. चंदाला ती घेतच होती कडेवर तेवढ्यात चेहर्यावर अपराधी भाव असलेला शंकर तेवढ्यात तिथे आला. " राजी मला माफ़ कर ग. परत असे नाही होणार. मित्रांनी खुपच आग्रह केला ग म्हणुन अगदी घोटभर घेतली मी पण तेवढ्यानेही मला गरगरल्यासारखे झाले. अन मग त्यांनी मला कोल्डड्रींक्स मधुन पाजली ग. माझ्या नाही लक्षात आले ते."
" बर ठीक आहे. "
" नुसते ठीक आहे काय? रागव ग तु माझ्यावर. चिड माझ्यावर. पण अशी शांत नको बसुस. बोल न माझ्याशी. "
" काय बोलु मी? तुम्ही दारु पिलीत हा माझ्यावर एवढा मोठा आघात आहे की मी तो अजुनही पचवु शकत नाहीय. तरी बर माझे आई बाबा सकाळी पहिल्या गाडीने गावाकडे गेले. नाहीतर तुम्हाला असे पाहुन त्यांना काय वाटले असते अन त्यांच्यासमोर माझी काय अवस्था झाली असती याचा मी विचारच नाही करु शकत."
" हो ग राजी माझी चुक झाली मी मान्य करतो ग. खरच परत असे नाही होणार. "
राजीनेही त्याला मोकळ्या मनाने माफ़ करुन टाकले. परत सारे कसे छान चालु झाले. घडलेल्या या घटनेबद्दल परत कुणीही त्याला टोकले नव्हते. अन तो ही त्याचे नेहमीचे रुटीन पाळत होताच. राजेशही आपल्या नोकरीच्या गावी मनिषाला अन मुलांना घेऊन गेला आणि सुमनही आपल्या मुलांना घेऊन सासरी गेली. वर्षभर कसे अगदी काहीही न घडता सुरळीत गेले.
तसही विष्णुपंतांचा थोडा धाक होताच त्याला. त्यांची करारी करडी नजर शंकरवर होतीच. पण आज विष्णुपंत बाहेरुन आले तेच मुळी अगदी गलीतगात्र होऊन. परशा कायम त्यांच्याबरोबर असायचाच. परशाच्या आधाराने ते घरी आले. राजीला काही त्यांची लक्षणे ठीक दिसेनात. प्रचंड खोकत होते. अन अंग खुप कापत होते. चांगलीच हुडहुडी भरली होती. अंगात खुप ताप भरला होता. परशाला त्यांच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगुन ती बाहेर आली. गणेशला आजीला बोलवायला देवळात पाठवले. आणि शेजारच्या महादुला शेतावर शंकरला बोलवायला पाठवले. घरच्या फ़ोनवरुन गावातल्या डॉक्टरना फ़ोन केला आणि त्यांना ताबडतोब घरी यायला सांगितले. दहा पंधरा मिनीटात डॉक्टर आलेच. अन त्यांच्या पाठोपाठ यशोदा आज्जी आणि शंकरही आले. डॉक्टर विष्णुपंतांना तपासत होते. त्यांच्या चेहर्यावर चिंतीत भाव होते पण तरी फ़ार काही काळजी करण्यासारखी परिस्थिती नाहीय असे वाटत होते. एक इंजेक्षन देऊन आणि स्वताजवळची औषधे दिली. तसेच मेडीकलमधुन आणायची औषधेही लिहुन दिली. कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे चालु ठेवा असे सांगुन ते निघाले. शंकर त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने वडिलांच्या तब्बेतीबद्दल विचारणा केली. जरा काळजीतच होता तो. " अरे शंकर नको काळजी करु. आत्ता तरी साधा ताप वाटत आहे. आपण उद्यापर्यंत पाहु अन मग काय करायचे ते ठरवु. मी दिलेल्या इंजेक्षन आणि औषधाने ताप उतरायला हवा आहे. बघु उद्या मी सकाळी परत येतो."
तो दिवस सगळा काळजीतच गेला सर्वांचा. उपाशी रहायचे नाही म्हणुन सर्वांनी थोडे जेउन घेतले पण जेवणात कुणाचेच मन लागत नव्हते. ताप काही उतरत नव्हता. कुणी ना कुणी त्यांच्याजवळ बसुन कपाळावरच्या पट्ट्या बदलत होतेच. यशोदा आज्जीने तांदळाजी पेज थोडी थोडी चमच्याने भरवली पण अर्धी वाटी पेज फ़क्त पोटात गेली. ताप काही अजुनही कमी होत नव्हता पण तरीही ते चांगले शुद्धीत होते. सर्वांशी बोलत होते हळु हळु. पण तरीही सारेजण काळजीतच होते. रात्री आठच्या दरम्यान विष्णुपंतांनी परत एक वाटीभर पेज पिली. त्यानंतर त्यांना चांगली तरतरी आली. थोडे तक्क्याला टेकुन त्यांना शंकरने बसवले. घरातील लहान मोठी सगळीच त्यांच्याजवळ येऊन बसली. त्यांनाही सर्वांना पाहुन बरे वाटले. " शंकर उद्या जरा जरा राजेश आणि सुमनला बोलवुन घेतोस? अन येताना मुलांनाही घेउन या म्हणावे. " त्यावर शंकर म्हणाला, " बाबा आत्ताच फ़ोन करतो अन उद्या सकाळी यायला सांगतो." त्याने राजेशला फ़ोन करुन मनिषा अन मुलांना घेउन ये बाबा वाट पहात आहेत. जरा बरे वाटत नाहीय. असा फ़ोन केला अन येताना वाटेत थांबुन सुमनला अन भावजींना मुलांसहीत घेउन ये सांगितले. त्यावर राजेश काळजीत पडला. " का रे दादा काय झालय बाबांना? काही काळजीचे कारण आहे का?" " नाही रे आज सकाळपासुन ताप अन खोकला अचानकच चालु झाला. डॉक्टर येउन गेले. काळजीचे कारण नाही म्हणाले पण ताप मात्र अजुनही उतरला नाहीय. पण सकालपासुन अगदी मलुल होते ते आत्ता जरा उठुन बसलेत अन जरा जरा बोलत आहेत. तेच म्हणाले तुला अन सुमनला उद्या येउन जायला सांग. म्हणुन फ़ोन केला. अन नको काळजी करुस तु. उद्या मात्र लवकर निघा सगळे अन नाश्त्याला इकडेच या. मी सुमनला फ़ोन करुन सांगतोच. "
" ओके ठिक आहे. तसच काही वाटलं तर मला ताबडतोब फ़ोन कर. मी येतोच सकाळी सगळ्यांना घेउन. बाय... "
" बाय. "
रात्री जेउन सारी बच्चेकंपनी झोपली. आळीपाळीने यशोदा आज्जी, शंकर, राजी असे विष्णुपंतांजवळ बसुन होते. परशाही बाहेर पडवीत जागाच होता. त्याचे लहानपण सारे देशमुखांच्या वाड्यातच गेले होते. विष्णुपंत आणि परशा यांच्या वयात दहा बारा वर्षाचे अंतर होते. आणि परशाचे लग्नही विष्णुपंतांच्या वडिलांनीच लावुन देऊन वाड्यातीलच बाजुच्या दोन खोल्या त्यांना रहायला दिल्या होत्या. तो अन त्याची बायको रखमा तिथेच रहात होते. अन त्यांचा मुलगा सुन परगावी नोकरीच्या ठिकाणी. बराच काळ एकत्र असल्याने विष्णुपंत आणि परशा यांच्यात मालक नोकर हे नाते नव्हतेच. तो त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानायचा. त्यांचा सल्ला घ्यायचा आणि तो अमलातही आणायचा. दोघांचाही एकमेकांवर खुप जीव होता. विष्णुपंत आजारी पडल्यापासुन त्यालाही चैन पडत नव्हते. सकाळपासुन त्यानेही काही खाल्ले नव्हते. मधुनच उठुन तो त्यांच्या रुममधे येउन चक्कर मारुन जात होता. आपल्या नवर्याची अवस्था रखमाही जाणुन होती. रात्री मात्र तिने आपल्या नवर्याला जबरदस्तीने चार घास खाऊ घातलेच.
काहीही विपरीत न घडता रात्र तर पार पडली. पण ताप मात्र उतरायच्या ऐवजी चढायलाच लागला. पहाटे पहाटे पाचला मात्र तापामुळे ते ग्लानीत जायला लागले. आणि त्या ग्लानीत काही काही बोलायला लागले. काय करावे कुणालाच काही सुचेना. एवढ्या पहाटे दवाखान्यात तरी कसे न्यायचे? अन डॉक्टरला बोलवावे की नको अशा विवंचनेत शंकर असतानाच परशा डॉक्टरला घेउनच आला. डॉक्टरनी तपासले अन त्यांच्या चेहर्यावर काळजी दिसु लागली. ताप चांगलाच चढला होता. त्यांनी परत एक इंजेक्षन दिले. मात्र ते तिथेच थांबतो म्हणाले. इंजेक्षनचा काय परिणाम होतोय ते पाहुन आपण पुढचा निर्णय घेउ म्हणाले. एव्हाना सात वाजत आले होते. राजेशचा निघाल्याचा फ़ोन सहाला आलाच होता. तासाभरात तो पोचेलच. त्यामुळे त्याला फ़ोनवर काही सांगितले नाही.
साडेसात वाजले आणि दारात गाडी उभी राहिली. परशा गाडीतले सामान काढायला लागला. मुले गाडीतुन उतरुन आत आली अन चंदा मिनी बरोबर त्यांची मस्ती चालु झाली. लहानच असल्याने परिस्थितीचे गांभिर्य त्यांना कुठले समजायला. एकटा गणेशच काय तो थोडा कळता सवरता होता. राजेश मनिषा सुमन आणि तिचा नवरा सतीष सारेच विष्णुपंतांच्या खोलीकडे गेले. एकाच दिवसात त्यांच्या चेहर्यावरची रया गेली होती. राजेश अन सुमनने त्यांच्या दोन्ही बाजुला बसत त्यांना हाक मारली. त्यांची काहीच हालचाल नाही. दोघेही अगदी कावरे बावरे झाले. त्यातल्या त्यात सुमन तर जास्तच. अगदीच रडवेली झाली ती. एकुलती एक कन्या असल्याने सार्यांचाच तिच्यावर खुप जिव होता. आणि विष्णुपंतांचा तर जास्तच. बापलेकीचे नातेच जगावेगळे. डॉक्टरनी सर्वांनाच शांत रहायला सांगितले. मगाशीच इंजेक्षन दिलेय, त्यामुळे थोडा फ़रक आहे. पण अजुन अर्ध्या तासाच चांगला फ़रक व्हायला हवाय. तेव्हा तुम्ही जरा शांत रहा. काही काळजी करु नका.
अर्ध्या तासाचा तास गेला आणि त्यांनी जरा डोळे किलकिले केले. समोर अस्पष्ट असे दिसणारे चेहरे हळु हळु नीट दिसु लागले. समोर उभ्या असलेल्या शंकरच्या एका बाजुला राजेश आणि दुसर्या बाजुला सुमन आणि सुमच्या शेजारी यशोदेला पाहताच त्यांच्या चेहर्यावर हलकेसे स्मित उमटले. ते उठायचा प्रयत्न करु लागले. पण डॉक्टर होतेच जवळ त्यांनी त्यांना उठु दिले नाही. पुर्णतः झोपुनच रहायला सांगितले. एव्हाना सारी नातवंडेही जवळ आली होती. त्यांना पडलेला फ़रक बघता डॉक्टर जुजबी सुचना देऊन निघाले. राजीने तोवर तांदळाची पेज करुन आणली होती. ती गरम गरम पेज सुमनच्या हातुन खाल्ली. आणि औषध घेउन ते परत झोपले. आता ताण कमी झाला होता. बाकीच्यांनीही नाश्ता करुन घेतला. राजी आणि मनिषा दुपारच्या स्वैपाकाला लागल्या. स्वैपाक झाल्या झाल्या बच्चेकंपनीला आणि यशोदा आज्जीला वाढुन त्यांची जेवणे उरकुन घेतली. सुमन परत एकदा वडिलांसाठी रव्याची खीर घेउन गेली. ती खाऊन विष्णुपंत नातवंडाशी बसल्या बसल्या गप्पा मारु लागले. इकडे बाकी सारे जेवायला बसले. जेवताना वडिलांचा अचानक आलेला ताप, त्यांची एका दिवसातच डाऊन झालेली तब्बेत हाच विषय होता. तर तिकडे यशोदा नवर्याच्या शेजारी बसुन नातवंडाची बडबड ऐकत सुखावुन जात होती. चंदा सर्वात लहान असल्याने ती हट्ट करुन आजोबांच्या मांडीवर बसली. तर मिनी गणेश आणि सुमनची लतिका आणि राजेशचा आर्य आणि मनवा हे आजी आजोबांच्या आजुबाजुला बसत काही गमती जमती ऐकवत होती. मधेच काही हत्ती मुंगीचे विनोद ऐकवुन आजी आजोबा आणि इतरांना ऐकवत होती. परशा आणि रखमाही जेवण करुन तिथे खोलीत येउन बसले होते. सारे कसे छान चाललय असच अगदी. शंकर, राजेश आणि सतीष जेवण करुन अन राजी, मनिषा आणि सुमन मागचे सारे आवरुन विष्णुपंतांच्या खोलीत आले. त्यांनी आपल्या सार्या परिवारावर सुखाने नजर टाकली. एवढ्यात राजेशला काय वाटले कुणास ठाउक त्याने पटकन आपल्या मोबाईलवर आई वडील आणि नातवंडे असा एक फ़ोटो काढला. मग काय सगळेच फ़ोटोसाठी पुढे झाले. दोन्ही सुनांबरोबर वेगळा, तीनही मुलांबरोबर वेगळा अगदी परशा आणि रखमा बरोबर पण फ़ोटो काढला. सुख सुख म्हणतात ते अजुन काय ? असे त्यांना वाटुन गेले.
चला रे मुलांनो आता आजोबांना विश्रांती घेउ द्या बरे म्हणत राजी अन मनिषाने मुलांना बाहेर नेले. शंकर आणि राजेशने त्यांना व्यवस्थित झोपवुन अंगावर पांघरुण घातले. अन ते पण बाहेर आहे. सुमन आईबरोबर बोलत बसली हलक्या आवाजात. त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता विष्णुपंत झोपी गेले. चार वाजता त्यांना परत खीर अथवा पेज काय आणु हे विचारण्यासाठी म्हणुन सुमन उठवायला गेली. तिने हाक मारली. पण ते काहीच प्रतिसाद देईनात. चांगलीच गाढ झोप लागलेली दिसतेय थोड्यावेळाने उठवु म्हणत ती परत बाहेर आली. मुले बाहेर झोपाळ्यावर आजीजवळ गोष्ट ऐकत होती. ती पण बसली तिथे आपले बालपण आठवत. अर्धा तास गेला असेल नसेल तोच मुलांनी भुक भुक चालु केले. त्यांना काहीतरी करुन द्यावे आणि वडिलांनाही गरम गरम काही द्यावे म्हणुन आपल्या वहिनीसोबत सुमन स्वैपाकघरात गेली. राजीने एकीकडे तांदळाची उकड बनवली मुलांसाठी आणि फ़ार विचार न करता सुमनने थोडीशी पेज बनवली. ती घेउन ती वडिलांच्या खोलीत गेली. अजुनही वडील उठले नसल्याचे तिने पाहिले. मग तिने त्यांना हलवुन उठवायचे ठरवले. पेज बाजुच्या टेबलवर ठेवली. आणि ती वडिलांना उठवु लागली. " बाबा चार वाजुन गेलेत, उठा बरे जरा, पेज घ्या म्हणजे औषधे घ्यायला बरे." पण छे ते काही उठेनात. त्यांच्या कपाळावर हात ठेवला तिने अन ती चरकलीच जरा. कपाळ अगदी गार लागत होते. तिने हाकांचा सपाटा लावला.... आई, दादा, राजेश, वहिनी लवकर या. बाबा उठत नाहीत बघा." अन ती रडुच लागली. परशा सहीत सारेच धावत त्या खोलीत आले. सारेच अगदी कळवळुन हाका मारु लागले. पण ओ द्यायला ते होते कुठे? त्यांचे प्राण तर कुडी सोडुन केव्हाच गेले होते. मुलेही आली खोलीत अन आबा उठा की तुम्ही गोष्ट सांगणार आहात ना? उठा न पटकन असे म्हणु लागली. डॉक्टरही फ़ोन केल्यावर दहा मिनीटात हजर झाले. त्यांनी चेक केले अन आय अॅम सॉरी ते आता या जगात नाहीत असे म्हणत शंकर अन राजेशच्या खांद्यावर थोपटत बाहेर गेले.
कुणाचाच विश्वास बसत नव्हता की थोड्यावेळापुर्वी हसत खेळत बोलणारी व्यक्ती आत्ता आपल्यात नाहीय. घरात एकच हलक्ल्लोळ माजला. कोण कुणाला सावरायचे समजत नव्हते. गणेश सोडता सारी चिल्लीपिल्ली आपापल्या आईला चिकटली होती अन भेदरुन सारे पहात होती. एकटे आबा फ़क्त शांत दिसत होते. हळु हळु सर्वांना विष्णुपंत गेल्याची बातमी सर्वांना समजु लागली. जसे समजेल तसे एक एक जण येत येत सारा गाव लोटला. नाही म्हणलं तरी विष्णुपंत देशमुख गावातले बडे प्रस्थ होते. आणि नुसतेच बडे नाही तर गावातील सर्वांना कशाच्या ना कशाच्या रुपाने त्यांनी मदतही केली होती. सर्वांच्या दर्शनासाठी विष्णुपंतांचा देह बाहेर ओसरीवर आणुन ठेवला. लोकांची रिघ लागली होती. तासा दोन तासातच राजी आणि मनिषाच्या माहेरचे आणि सुमनच्या सासरचे लोक आले. यशोदाआजीचा एक मोठा भाऊ होता पण तो ही थकला होता आणि हिंडु फ़िरु शकत नसल्याने त्याचा मुलगा आणि सुन आले. सारे आलेच आहेत तर आता थांबण्यात काही अर्थ नाही असा विचार करुन बुजुर्ग मंडळींनी पुढाकार घेऊन पुढील सारी व्यवस्था केली आणि पुढच्या तासाभरात विष्णुपंत देहरुपाने पण या जगात राहिले नाहीत. यशोदा आज्जीला कल्पना आली होती की न कळे पण ती सर्वांसमोर तरी शांत होती. उठुन बाथरुममधे जाऊन तिने दार लावुन घेतले. सौभाग्यालंकारातील मंगळसुत्र कुणी काढले गळ्यातले ते समजले नाही तिला पण कपाळावरची कुंकवाची चिरी डोक्यावर पडणार्या पाण्यात मिसळुन जात दिसेनाशी झाली. आणि त्याचबरोबर डोळ्यातले अश्रु पण. तिने मनाशी काही ठरवले आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यावर कुणीतरी पांढरे पातळ पुढे केले. ते नाकारुन ती तशीच ओलेत्याने आपल्या खोलीत आली आणि दरवाजा लावुन घेतला. राजी घाबरली. मनिषा अजुनही एकीकडे सुमनला सावरता सावरता मुलांकडे बघत होती. राजी आपल्या सासुच्या मागोमाग आली. पण दरवाजा आतुन बंद होता. तिने हाका मारल्या पण आतुन काहीही प्रतिसाद आला नाही. आता बोलवावे कुणाला? कारण सारी पुरुषमंडळी तर घाटावर स्मशानात गेली होती. काय करावे हा विचार करतच होती तोवर यशोदा आज्जी बाहेर आली. एकदम शांत. त्यांचे पांढरे कपाळ अन मोकळ्या गळयाकडे पहावत नव्हते. नकळतच तिच्या डोळ्यातुन अश्रु येउ लागले. आज्जी म्हणाली, " राजी मोठी न तु घरची? तुच असे केलेस तर बाकीच्यांना कोण सावरणार ग? माझे दुःख तर डोंगराएवढे आहे ग. माझी इतक्या वर्षाची साथ सोबत अचानक एक दोन दिवसात संपली. पण मला रडुन नाही चालणार ग. मीच रडत बसले तर शंकर, राजेश अन सुमन कडे कोण पाहील? मला तुझी साथ हवीय या सर्वांना सावरायला. देशील न मला साथ? " डोळे पुसत राजीने होकार दिला.
" आई तु आंबील केले आहेस? मला दे न जरा आंबील. आई ए आई. " चंदा केव्हाची हाका मारत होती. ती भानावर आली आणि तिने चंदाला जवळ घेतले. " चंदा रागवलीस का ग माझ्यावर मी सकाळी तुला ओरडले म्हणुन? " " नाही ग आई. तु रागवलीस म्हणुन तर मी दादु आबा कडे गेले. अन मी गेले म्हणुन तर किसनाने डबा आणुन दिला अन मी काही खाऊ शकले न? " " किती शहाणी ग माझी बाय ती. " म्हणत राजीने चंदाची अलाबला घेतली. " पण आई असं किती दिवस आणायचं ग पीठ दादुआबा कडुन? मला नै आवडत. आणि तिथे कोण असेल ना तर कसे बघत असतात माहितेय तुला? " तिच्या केसातुन हात फ़िरवत राझी म्हणाली," हो ग बाळा, माहितेय मला. पण काय करु ग नाईलाज आहे माझा. या गावात मला काम पण नाहीय काही. आणि दुसर्या गावात जायचं म्हणजे रहायची सोय करण्यापासुन सगळच ग. पण बाळा जातील हे दिवस पण. भाऊ मोठा झाला न की सारे काही नीट होईल." पाच सहा वर्षाची चंदा परिस्थितीमुळे वयाच्या मानाने खुपच शहाणी झाली होती. मिनी आता सहावीत होती अन गणेश दहावीला होता. तिघही अभ्यासात हुशार होतेच. शाळेत शिकवताना होणारा अभ्यास आणि शाळेतील गुरुजी आणि बाईंनी पुस्तक वह्या बाबतीत केलेले सहाय्य आणि गणेशला मिळणारी स्कॉलरशीप यावर कसे बसे तिघांचे शालेय शिक्षण चालु होते. त्याला काही खिळ बसली नव्हती. पण नुसते तेच असे नाहीना. प्रपंचाला काय लागत नाही? घर स्वताचे असल्यामुळे निवारा होता. पण अन्न आणि वस्त्र याचे काय ? शंकर, राजी आणि यशोदा यांचे फ़ार काही अडले नाही कारण चांगली परिस्थिती असताना भरपुर कपडालत्ता होता. तोच आजवर जपुन जपुन वापरणे चालु होते. प्रश्न होता तो चंदा मिनी आणि गणेशचा. कारण वयानुसार अंगही वाढत होते त्यामुळे असलेले कपडे जोवर बसत होते तोवर काही प्रॉब्लेम नव्हता. पण नंतर? राजीच्या बहिणीं मात्र सणावाराच्या निमित्ताने मुलांना कपडे घेत होत्या. राजीचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही या पद्धतीने. मुलांसाठी ते मात्र राजीने मान्य केले पण इतर कसलीही मदत मात्र तिने घेतली नाही. सासुला पण ते आवडल नसतं याची तिला खात्री होती.
दुपारचे तीन वाजले असतील यशोदा आज्जीने आतुन हाक मारल्यावर ती आत गेली. सासुला उठवुन बसत ती म्हणाली, " काही आणु का करुन तुम्हाला? " " नको ग राजी. खुप करतेय तु. अगदी कोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय ते तुझ्याकडुन शिकावे बघ. पण माझ्या तोंडाला चवच नाहीय ग. माझा हा तापही यांचासारखाच मलाही नेतो की काय असे वाटु लागलेय मला. अन नेले तर बरेच होईल एक तोंड तरी कमी होईल ग खायचे. " " आई.......!!!! असे नका म्हणु हो तुम्ही. तुमच्या जिवावरच तर हा सगळा भार मी पेलतेय. तुम्ही गेलात तर मी मोडुन पडेन हो. " असे म्हणत राजी त्यांच्या अधिकच जवळ गेली. आणि गळामिठी घातली. आपल्या सासुचे अंग अजुनच तापलेय हे तिला जाणवले. अन तिने गणेशला डॉक्टरकडे पाठवले. त्याच्याबरोबर डॉक्टर आले आणि तपासुन त्यांनी औषध दिले आणि म्हणाले, " काळजी नका करु उद्या त्या खडखडीत बर्या होतील. " त्यांच्याबरोबर राजी बाहेर आली तिने काळजीने विचारले सासुच्या तब्बेतीबाबत आणि पैशाबाबत तेव्हा डॉक्टर म्हणाले, " वहिनी, काकु होतील बर्या नका काळजी करु. साधा ताप आहे. आणि पैशाचे म्हणाल तर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर नरकात पण जागा नाही मिळायची मला. माझ्यावर तुमच्या घराण्याचे खुप उपकार आहेत हो. बर मी निघतो आता. उद्या सकाळी दवाखान्यात जाण्यापुर्वी परत येतो. त्यांना हलकाच आहार द्या सध्यातरी. "
राजीने परत एकदा थोड्डेसे आंबील करुन सासुला खायला घातले. गोळ्या दिल्या. मुलांना अभ्यास करायला सांगुन ती सासु शेजारीच आडवी झाली जरा. पण आज झोप रुसलीच होती तिच्यावर......
सासरे गेल्यावर सासुच्या मदतीने राजीने सर्वांनाच सावरले. म्हणजे किमान सावरल्यासारखे वाटत तरी होते सारे. विष्णुपंतांचे दिवसकार्य झाल्यावर सारेच आपापल्या घरी निघाले. निघताना सुमन आणि राजेश आईच्या गळ्यात पडुन खुप रडले. वारंवार आई काळजी घे असे म्हणत होते. वहिनीला म्हणजेच राजीलाही काळजी घेण्याबाबत सारखे सांगत होते. एकाच गाडीने सारे निघाले. निघेपर्यंतच तीन वाजले. आणि नाही म्हणले तरी नुकतीच घडलेली घटना सर्वांच्याच मनात अजुनही घोटाळत होतीच. तेच विचार मनात चालु होतेच. गाडीत सारेच शांत होते. राजेश गाडी चालवत होता. एवढा घाट ओलांडला की सुमनला तिच्या घरी सोडुन पुढे जायचे या विचारांच्या नादात एका वळणावर समोरुन आलेला भरधाव ट्रक राजेशला कळलाच नाही. अन कळेपर्यंत वेळ निघुन गेली होती. ट्रकने कारला एवढी जोरात धडक दिली की त्या छोट्याशा घाटातुन कार जी खाली दरीत फ़ेकली गेली की कुणालाच काही समजायच्या आतच होत्याचे नव्हते झाले. गाडीतले पेट्रोल सांडुन त्याने पेट घेतला परिणामी गाडीही पेटली. बर फ़ार मोठ्या रहदारीचा रस्ता नसल्याने घडलेली घटना पटकन समजलीच नाही कुणाला. ट्रक ड्रायव्हर तर ट्रक घेउन लगेचच पळुन गेला. खाली कसली आग आहे हे पहायला काही वाहने थांबली असता रस्त्यावरच्या खाणाखुणांवरुन ट्रकने एखाद्या छोट्या वाहनाला जोरात धडक दिली असावी अशी शंका वजा खात्री जमलेल्या लोकांनी व्यक्त केली. मदतीला जावे तर पेट घेतलेल्या गाडीवरुन कुणी वाचले असायची शक्यता फ़ारच कमी होती. अन खाली जाणे तसही खुप रिस्की होते. तेवढ्यात कुणीतरी इमर्जन्सी नंबर डायल करुन घडलेली घटना कळवली. अर्ध्या तासातच पोलीस व्हॅन एका अॅम्ब्युलन्स सहीत तेथे आली. एकंदरीत परिस्थिती पाहता कुणीही वाचले असायची शक्यता फ़ारच कमी होती. आणि पोलीसांची आणलेली कुमकही कमी होती. एव्हाना आजु बाजुच्या छोट्या गावात अपघाताची बातमी पसरली होतीच. त्यामुळे तेथील उत्साही तरुण मंडळी आपापल्या गाड्या घेउन अपघातस्थळी दाखल झाली होतीच. त्यांची मदत घेउन खाली उतरायचे असा विचार पोलीस करत होते. पण अजुनही मदत हवीच होती. अग्नीशामक गाडीही बोलवावी लागणार होती. तर अशी सर्वांची मदत घेउन पोलीस काही तरुणांना घेउन खाली उतरु लागले. तोपर्यंत अग्नीशामक गाडीही तेथे दाखल झाली. सर्व जण योग्य ती काळजी घेऊनच गाडीजवळ जात होते. पाणी मारुन आग पुर्णतः विझवली. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात झोणार होती त्यामुळे जे काही करायचे ते तातडीने करावे लागणार होते. गाडीचा नंबर कळुन येत नव्हता. आणि गाडी जवळजवळ ७० ते ८० टक्के जळाली होती त्यामुळे आत किती लोक असावेत आणि कोण असावेत याचा काहीच अंदाज येत नव्हता. एवढ्यात बाजुला कुणीतरी कण्हल्यासारखा आवाज आला. तो आवाज एका तरुणाने ऐकला अन तो त्या दिशेने निघाला. बाजुच्या झुडुपात एक लहान मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. खर म्हणजे ती जिथे पडली होती त्यावरुन ती वाचली कशी याचेच आश्चर्य वाटत होते. तिला तेथुन अलगद बाहेर काढले ती पटकन काका म्हणत त्याला बिलगली आणि बेशुद्ध झाली. तिला तातडीने वर आणुन दवाखान्यात पोचवायची व्यवस्था केली. तेथील बाकीचे सारे सोपस्कार आवरुन पोलीसही अर्धवट जळालेल्या डेडबॉडीज घेउन सरकारी दवाखान्यात गेले. मुलगी शुद्धीवर आल्याखेरीज काहीही समजणार नव्हते.
राजेशचा फ़ोन कसा काय लागत नाही अथवा कुणीही पोहोचल्याचा फ़ोन कसा केला नाही यावरुन सारेच काळजीत होते. राजी आणि तिची सासु सारखे आत बाहेर हेलपाटे घालत काय लागला का फ़ोन असे शंकरला विचारत होत्या. पण छे फ़ोन जणु रुसलाच होता. त्यात रात्री आठच्या दरम्यान जवळच्या घाटात अपघात झालेले समजल्यापासुन कुणाचाच जिव थार्यावर नव्हता. वाट पाहुन शेवटी सारेजण चार घास खाऊन घेउ म्हणत जेवायला बसले. जेवण झाल्यावर परत एकदा फ़ोन लावुन पाहिला तर लागतच नव्हता. सुमन घरी पोचली असेल म्हणुन तिच्या घरीही फ़ोन लावला तर तोही कोणी उचलत नव्हते. शेवटी कंटाळुन सारेच झोपी गेले. रात्री बारा वाजुन गेल्यावर दरवाजाची कडी वाजली अन राजीच्या आणि अशोदा आज्जीच्या काळजात धस्स झाले. शंकर आणि मुले मात्र झोपली होती. तिने शंकरला उठवले आणि दाराची कडी वाजत असल्याने सांगितले. शंकरने उठुन दरवाजा उघडला तर दारात पोलीसांना बघुन तो चांगलाच हबकला. यशोदा आणि राजी आता काय पुढ्यात वाढुन ठेवलय या विचाराने मटकन खालीच बसल्या. " शंकर तुम्हाला जरा पोलीस चौकीत आणि दवाखान्यात यावे लागेल." असे पोलीसांनी म्हणताच शंकर जामच घाबरला. " क काय सा साहेब क काय झालय? " शंकर घाबरुनच त त प प करु लागला. त्याला बोलायचे काही सुधरेना. राजी पुढे झाली. तिने धीर करुन विचारले " काय साहेब काय झालय एवढ्या रात्री तुम्ही आलात म्हणजे तसच काही असले पाहिजे. पण जरा नीट सांगाल का सारे." एवढ्यात परशा आणि रखमा पण बाहेर आले होते. " वहिनीसाहेब, संध्याकाळी घाटात अपघात झाल्याची बातमी आली आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो. एक मुलगी सोडता कुणीही वाचले नाहीय. मुलगी तशी बेशुद्धच आहे पण मधेच थोडावेळ शुध्दीत आली असता तिच्याशी जे काही बोलणे झाले त्यावरुन आम्ही अंदाज बांधला आणि इथे आलो. तुम्ही जर लगेच आतात तर खुप बरे होईल. कारण मुलगी शुद्धीत आली की रडतेय नुसती." रखमाला आपल्या सासुजवळ आणि मुलांजवळ बसवुन पोलीसांच्याच गाडीतुन शंकर, परशा आणि राजी असे तिघही निघाले. राजीला दवाखान्यात एक लेडी कॉन्स्टेबलची सोबत देऊन तिथे सोडुन शंकर आणि परशाला घेऊन जीप सरकारी दवाखान्याच्या दिशेने निघाली.
राजीने ती मुलगी असलेल्या खोलीत महिला पोलीसासहीत पाय ठेवला आणि ती चरकलीच. ती लतिका होती. सुमनची मुलगी. तिच्याजवळ एक तरुण स्त्री होती. ती मायेने तिच्या डोक्यावरुन हलका हात फ़िरवत होती. लतिका असे जोरात ओरडतच ती लतिकाजवळ गेली. एवढ्यात नर्सही आलीच तिथे. राजीला शांत करत ती म्हणाली, " ताई तुम्हीच धीर सोडला तर त्या पोरीने काय करायचे? शुद्धीत येइल तसे नुसते आई आई म्हणत रडतेय. ही कुणाची कोण काहीच समजेना. पोलीसांच्या मदतीने ज्याने हिला इथे आणले त्याने आपल्या बायकोला घराकडुन बोलवुन घेतले आणि इथे थांबायला सांगितले. त्याच या मॅडम. " राजीने त्या स्त्रीला नमस्कार केला आणि म्हणाली, " ताई तुम्ही आणि तुमचे मिस्टर होतात म्हणुन हिला लवकर ट्रीटमेंट मिळाली. खुप उपकार झाले बघा. संध्याकाळपासुन आम्ही फ़ोन लावतोय पण कुणाचाच फ़ोन लागेना. "
वहिनीसाहेब मी खुप लहान आहे. मला ताई म्हणु नका. माझे नाव प्रतिभा. अन उपकाराचे काय हो. लहान पोर ते एकट होतं अन मोठ्या अपघातातुन वाचले हेच नशिब आहे. जवळ कुणीच नव्हतं कारण काहीच ओळख पटेल असे अपघाताच्या ठिकाणी सापडले नाही असे माझे मिस्टर म्हणाले. मग ते अन मी दोघेच इथे. हिला पुर्ण शुद्ध येईपर्यंत आणि हिची ओळख पटेपर्यंत इथे थांबायचे असे ठरवले. आम्ही तुम्हाला ओळखतो पण ही तुमच्यापैकी कुणाची असेल असे वाटले नव्हते. " " अग प्रतिभा आजकाल कुणी कुणासाठी पाच दहा मिनीटे पण थांबत नाही ग. अन तु एवढा वेळ थांबलीस. तुझ्या घरीही असतील न तुझी कच्ची बच्ची. जा तु ती वाट बघत असतील तुमची. मी आहे इथे." " नाही हो ताई मी थांबेन. माझी एक मुलगी आहे. लहान आहे पण तिला आत्यांची सवय आहे. ती त्यांच्याकडेच असते. मी थांबते इथे. आत्या म्हणाल्या पोरगी एवढी गंभीर जखमी आहे तर तिचे नातेवाईक आले तरी तु थांब मदतीला. त्यामुळे मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही नका काळजी करु."
लतिकाजवळ राजी अन प्रतिभा दोघीही थांबल्या. बाहेर प्रतिभाचा नवरा प्रकाशही होताच.
इकडे सरकारी दवाखान्यात मिळालेल्या काही वस्तु आणि अर्धवट जळलेले मृतदेह बघुन शंकरने हंबरडाच फ़ोडला. काय हे होत्याचे नव्हते झाले असे त्याला वाटले. परशा बरोबर होता त्याने सावरले त्याला. पी एम करुन झाले होतेच. थोडीफ़ार पोलीस प्रोसीजर करुन आता सर्व देह ताब्यात घेउन पुढील व्यवस्था करणे एवढेच बाकी होते. त्याला काय करावे सुचत नव्हते. पोलीसांकडुन लतिका तेवढी वाचल्याचे त्याला समजले होते. आता सुमनच्या सासरी कळवायला हवे होते. त्याच्याकडे काही मोबाईल नव्हता त्यामुळे घरी जाणे भाग होते घरच्या डायरीतच सर्व नंबर्स होते. घरी जाता जाता दवाखान्यात लतिका कशी आहे पाहुन जावे तसेच राजीलाही सारे सांगावे म्हणुन तो निघाला. पोलीसांनी शंकरची अवस्था पाहुन त्यांची जीप आणि बरोबर एक मदतनीसही दिला होता. दवाखान्यात आल्यावर तो राजीला जसा भेटला तसा लहान मुलासारखा तिला बिलगुन रडु लागला. आपल्या नवर्याचा हळवा स्वभाव राजी जाणुन होती. आता तिलाच कणखर व्हायला हवे होते. पण तरीही आधी ती एक स्त्री होती. त्यामुळे तीलाही दुःखाचा आवेग सहन झाला नाही. ती पण रडु लागली. परशा, प्रतिभा आणि प्रकाशने त्या दोघांना सावरले. शंकर लतिकाची अवस्था पाहुन अजुनच खचला. हे सारे होईपर्यंत चांगलेच उजाडलेले. लतिकाजवळ प्रतिभा आणि राजीला थांबवुन प्रकाश समवेत शंकर आणि परशा घरी गेले. यशोदा आज्जीचा आणि रखमाचाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. मुलांना काहीच माहिती नसल्याने ती मात्र निजलेलीच होती. झाला प्रकार परशा आणि प्रकाशकडुन आज्जीला आणि रखमाला समजल्यावर आज्जीने हंबरडा फ़ोडला. आपला नवरा गेल्यावरसुद्धा तिने मुला नातवंडांसाठी धिराने घेतले होते. पण आता मात्र बांध फ़ुटला. नुकताच नवरा गेला आणि अजुन दिवस उरकले नाहीत तोवर मुलगा, सुन, मुलगी, जावई आणि नातवंडे काळाने ओढुन नेली. कोण कुणाला धीर द्यायचा हा प्रश्नच होता. प्रकाशने पुढाकार घेऊन परशाशी बोलुन डायरीमधील नंबर पाहुन फ़ोनाफ़ोनी केली. गावकर्यांची रिघ लागली होती. जो तो हे समजल्यावर दुःखी होत होता. गावातील काही मोठ्यांच्या चर्चेतुन अंत्यदर्शनासाठी कोणतीही डेडबॉडी घरी आणु नये असे ठरले. कारण ते कुणालाही बघवले नसते आणि तसही आता १२ तास उलटून गेले होते. त्यामुळे परस्परच अंत्यसंस्कार करावेत असे ठरले. सुमनचे सासु सासरे पण लगेच येणे शक्य नव्हते अगदी आत्ता लगेच निघाले तरी यायला एक दिवसापेक्षा जास्त वेळ लागला असता. कारण ते विष्णुपंताचे समजल्यावर येउन भेटुन नंतर त्यांच्या मोठ्या मुलाकडे जयपुरला होते. त्यामुळे त्यांनी सारी जबाबदारी शंकरवर सोपवली आणि आम्ही लगेच निघत आहोत तरी उद्या दुपार होईल यायला असे सतिषच्या भावाने सांगितले. त्यामुळे आता जास्त थांबण्यात अर्थ नाही. मनिषाच्य माहेरचे आणि राजीच्या माहेरचे आल्यावर पुढचे सर्व सोपस्कार उरकले.
लतिकाला अजुन किमान चार पाच दिवस तरी दवाखान्यात ठेवावे लागेल असे वाटत होते. तसं फ़ार काही लागल नव्हतं म्हणजे काळजीचे कारण नव्हते. पण मुका मार आणि अंगावर जखमा बर्याच होत्या. नशिब की डोक्याला काही इजा झाली नव्हती. आणि कुठेही फ़्रॅक्चर नव्हते. पण ती खुप घाबरलेली असल्याने शुद्धीवर आल्यावर आईचा जप चालु होता. समोर मामीला पाहुन ती आई कुठाय असे विचारुन रडयला लागायची. राजीलाच तिची काळजी घ्यायला हवी होती. मानसीक आधारही द्यायला हवा होता. चंदापेक्षा दोन तीन वर्षानीच ती मोठी होती म्हणजे अवघी आठ नऊ वर्षाची. म्हणजे काही फ़ार मोठी नव्हती. तिचे आई बाबा आता या जगात नसल्याचे तिला सांगणे खुपच अवघड होते. उद्या तिचे तिकडचे आजी आजोबा आल्यावर तिला कसे सांगायचे ते पाहु अन तसही सध्या तिला थोडेफ़ार झोपेतच ठेवणे गरजेचे होते. जागी झाली की दवाखान्यातुनच तिला पेज, खीर, सुप असे नर्स येउन भरवत होती. राजीने मोठ्या भावाशी बोलुन आपल्या वहिनीला ठेवुन घेतले होते. कारण तिला दवाखान्यातुन हलणे शक्य नव्हते. अन घरी कुणीतरी जबाबदार व्यक्ती हवी होती. सासुबाईंना संभाळणे पण गरजेचे होते. त्या तर अगदी
हवालदिल झाल्या असणार याची तिला खात्री होती अन ती घरी नसल्याने तर जास्तच. खरे तर एकदा तरी घरी जाऊन येणे गरजेचे आहे. मिनी आणि गणेश मोठे आहेत पण चंदा अजुन लहान आहे. आणि आबा गेल्यावर ती सारखी घरभर भिरभिरत असायची आबा कुठे आहेत म्हणत. हे सारे घडले त्यामुळे ती अन अर्थातच मिनी गणेशही बिथरले असतील. सारेच लहान कोण सावरणार त्यांना. पण वहिनीवर घराचा भार सोपवुन ती निश्चिंत झाली. व्हायलाच हवे होते पर्यायच नव्हता. कसा बसा तो दिवस संपला. प्रतिभाने दवाखान्यातली जबाबदारी घेतल्याने तिच्या जेवण खाण्याचा चहाचा प्रश्न नव्हताच अन तसही या घटनेमुळे जात तरी कुठे होते जेवण.
दुसर्या दिवशी सकाळी लतिका चांगलीच शुद्धीत आली होती. अन तशी शांत होती. सकाळी दुध अन बिस्कीटे खाल्ली. नंतर नर्सने राजीच्या मदतीने तिचे स्पंजींग केले. कपडे बदलले. त्यामुळे ती अजुनच जरा फ़्रेश झाली. राजीला म्हणाली, " मामी कालपासुन माझे आई बाबा दिसले नाहीत ग कुठे. तु आणि या काकीच आहेत माझ्याजवळ. कुठे आहेत ग ते? मला एवढे लागलय अन ते मला पहायला का नाही आले ग? रागवलेत माझ्यावर? " राजी अवाकच झाली. किती शांत झालीय ही अन समजुतदारपणे बोलतेय. " लतिका बाळा तु विश्रांती घे बर आता. लागलय न तुला. मग बोलु आपण." " नाही ग मामी कालपासुन झोपुन झोपुन कंटाळा आलाय मला. अन मामी मला एक सांग राजेश मामा मनिषा मामी, आर्य आणि मनवा कुठे आहेत? " काय उत्तर द्यावे ते काही राजीला समजेना. ती म्हणाली, " बेटा तुला सांगते सारे काही. पण आता तु झोप बरे. " " नाही ग मामी मला नै झोप येत. आता मी बरी आहे. जरा दुखतय लागलय तिथे. पण तु फ़ुंकर मारतेस न मग बरे होऊन जाते सारे. तुला मी सांगते काल काय झाले ते. "
लतिका सांगु लागली..... मामी आम्ही इथुन निघालो. गाडीत सारेच गप्प होते. मी मागे आईच्या मांडीवर बसले होते. मामा मामी मनवाला घेउन पुढे बसले होते. आर्य आणि बाबा आईच्या शेजारी होते. घाट सुरु झाला आणि समोरुन ट्रक आला आणि त्याने गाडीला धडक दिली. मग आमची गाडी खाली खाली जायला लागली. आम्ही सारे ओरडत होतो. तेवढ्यात मी गाडीच्या बाहेर फ़ेकले गेले. मला खुप लागले होते मला उठता येईना. आणि समोर तर आग दिसायला लागली कसली आग मला समजेना. मला लागल्यामुळे मला उठताही येईना. मी आई आई म्हणुन हाक मारत होते ग पण कुणीच येईना. बर्याच वेळाने मग कुणी कुणी माणसे अस्पष्ट दिसायला लागली. कुणीतरी काकांनी माझा आवाज ऐकुन माझ्या जवळ आले आणि मला तेथुन उचलले एवढेच मला माहितेय. पण सांग न मी एकटीच कशी इथे बाकी सारे कुठे गेलेत? सांग ना मामी ... ए मामी सांग ना.......... राजीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. कसे काय सर्वांनी हे सोसले असेल देव जाणे. आणि हे पिल्लु बापरे.... तिने लतिकाला हृदयाशी घट्ट धरले आणि ती रडु लागली. कसं काय हे सोसले असेल पोरीने देव अन तीच जाणे. लतिका बाळा आपले आबा देवबाप्पाकडे गेले न त्यांना भेटायला गेलेत ते. असे सांगुन ती मोकळी झाली. मनावरचे ओझे तर उतरले तिच्या पण लतिका हा आघात कसा सोसेल हे मात्र समजेना. सतिष सारखा फ़िरतीवर असल्या कारणाने तिला आईचाच सहवास जास्त होता. मामी कडून आई बाबा देवबाप्पाकडे आबांना भेटायला गेलेत हे समजल्यावर मात्र ती जरा शांत झाली. आणि पांघरुण घेऊन झोपली. म्हणजे नुसते डोळेच मिटले. राजीला वाटले आपण सांगायला नको होते. किमान आत्ता तरी नको. पण ज्या काकुळतीने लतिका विचारत होती ते पाहता तिला लगेच सांगणेच योग्य होते असे तिला वाटले. थोड्याच वेळात नर्सही आली आणि प्रतिभाही आली.नर्सशी बोलुन प्रतिभाने घरुन आणलेला मऊ शिरा लतिकाला खाऊ घालायची परवानगी घेतली. शिरा खाऊन झाल्यावर औषधेही तिने घेतली आणि औषधाने की काय पण ती थोड्यावेळात झोपी गेली. डॉक्टरही येऊन गेले. तिच्या जखमा आणि तिची रिकव्हरी पाहता तिला संध्याकाळी घरी घेउन जायला परवानगी दिली. घरच्या वातावरणात ती लवकर बरी होईल असे सांगितले. पोलीसांचा लतिकाला तसा काही त्रास झाला नाही. पण ती जेव्हा राजीला सांगत होती तेव्हा महिला पोलीस तिथे असल्याने त्यांनी सारे ऐकलेच होते. पोलीसांनी आणि तिने रिक्वेस्ट केल्याने दवाखान्याच्या अॅम्ब्युलन्सने संध्याकाळी लतिकाला घरी आणले. प्रकाश प्रतिभा बरोबर होतेच. घरी आल्यावर मात्र तिने आणलेले उसने अवसान गळुन गेले. लतिका हळु हळु चालत प्रतिभाच्या आधाराने आज्जीच्या खोलीत गेली. आणि आज्जीच्या गळ्यात पडुन रडु लागली. ते दृष्य़ पाहुन सारेच परत रडु लागले. चंदाही आईला बिलगली. शंकर तर चालते बोलते जिवंत प्रेतच जणु अशी अवस्था झाली होती. संध्याकाळी सात नंतर मनिषाच्या सासरची माणसे आली. आजीला पाहिल्यावर लतिका वार्याच्या वेगाने पण धडपडत आज्जीकडे गेली. सारेच वातावरण परत शोकाकुल झाले होते.
शंकरची अवस्था पाहता आजीनी कुणाचेही दिवसकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि सुमनच्या सासुसासर्यांना त्या म्हणाल्या तुम्ही काय करताय ते पहा. सतिष आणि सुमचे दिवसकार्य कुठे कसे करायचे ते तुम्ही सांगा. सतिषच्या भावाने सांगितले आम्ही चार सहा दिवसात दिवसात निघु. लतिका तोवर बरी होईल सध्या येथील वातावरण पाहता तिला इथे ठेवणे योग्य होणार नाही. तसच त्यांच्या घरी जाऊन तेथील सामानाचे काय करायचे आणि घराचे काय करायचे याचाही विचार आत्ताच करायला हवा. कारण मला काही सारखे सारखे येणे जमणार नाही एवढ्या लांबुन. आणि आता आई बाबांना पण इथे एकटे ठेवणे शक्य नाही. माझ्या मुलांबरोबर लतिका वाढेल. आणि तसही माझ्या बायकोला लतिकाचा लळा आहेच. थोड्याच दिवसात सारे काही नॉर्मल होईल असा विश्वास आहे. त्याच्या म्हणण्याला त्याच्या आईवडिलांनी पण दुजोरा दिला. अन सारे काही तात्पुरते मार्गी लावुन आठ दिवसात लतिकाला आणि आई वडिलांना घेऊन सतिषचा भाऊ जयपुरला निघाला. जाताना लतिका मामी आणि आजी तसेच चंदा मिनी आणि गणेशच्या गळ्यात पडुन रडली. सारेच भावुक झाले होते.
हे सारे आठवताना राजी पुन्हा त्या अनुभवातुन गेली अन आपसुकच तिचे डोळे ओले झाले. एवढ्यात दरवाजा वाजला म्हणुन ती उठलीच. पाच वाजुन गेले होते. दोन माणसांनी शंकरला दरवाजापाशी आणुन सोडले. राजी बाहेर गेल्यावर " वहिनीसाहेब दादांना घ्या आत. " असे म्हणत ते दोघे निघुन गेले. फ़ुल्ल पिऊन आलेल्या शंकरला तिने गणेशच्या मदतीने आतल्या खोलीत आणुन झोपवले. एवढा आडदांड देह शंकरचा दोन चार वर्षात अगदी चिपाडासारखा झाला होता. आपल्या नवर्याकडे पहात असताना तिच्या मनात त्याच्याबद्दल फ़क्त माणुसकीचे भाव होते. ना राग ना लोभ, एक कुंकवाचा धनी बास. काय करणार न राग मनात धरुन? सारे आपल्याच नशोबाचे भोग आहे आणि ते आपल्यालाच भोगायला हवेत हा एकच विचार बास. मुलांकडे बघत जगायचे एवढे एकच ध्येय डोळ्यासमोर तिने ठेवले होते त्यामुळे शंकरच्या बाबतीत सर्व भावभावनांच्या पलिकडे ती गेली होती. तिन्हीसांज झालीच होती. देवासमोर दिवा लावायला म्हणुन ती उठली. आणि मुलांना घेउन देवासमोर बसली. दिवा लावुन आणि नमस्कार करुन तिने तिघांनाही शुभंकरोती म्हणायला लावली आणि ती रात्रीच्या स्वैपाकासाठी उठली. सकाळी दादुने दिलेल्या पिठातील कणिक घेउन त्यातच तिखट मीठ घालुन त्याच्या पोळ्या केल्या. म्हणजे वेगळी भाजी नको. गरम गरम पोळी खाल्ली .कीभाजी नसली तरी चालेल असा काटकसरी हिशेब तिने केला. सासुसाठी एक भाकरी केली. त्याबरोबर थोडेसे ताक होते कालचे ते दिले. स्वताही चार घास खाऊन मुलांजवळ येउन बसली. चंदा आणि मिनी शाळेतील काही गमती जमती सांगत होत्या पण त्या तिच्या मेंडुपर्यंत पोचतच नव्हत्या. तिच्या मनाचा वारु भुतकाळात कुठल्या कुठे उधळला होता.
लतिका तिच्या काकाबरोबर गेली. पोचल्याचा फ़ोनही आला दोन दिवसानी. नुकत्याच घडलेल्या घटनांनी घर दार सारे हादरुन गेले होते. कुणी कुणाला सावरायचे हा प्रश्नच होता. शंकर तर अगदी दगडी पुतळा झाल्यासारखाच होता. झोप आली की झोपायचा. जाग आली की उठायचा. राजीच त्याला काही खाउ घालायची. हळु हळु धरुन बाथरुममधे नेउन आंघोळ घालायची. परशा असायचा मदतीला. पण त्यालाही फ़ार होत नव्हते. तो दाखवुन देत नव्हता पण खरे तर मनातुन खचला होता. त्याच्याच आधारावर राजी शंकरच्या बाबतीत जरा निर्धास्त होती. पण हे काही फ़ार दिवस नाही चालले. परशाचा मुलगा आला आणि आई वडिलांना सोबत घेउन गेला. त्यामुळे वाड्यात परशा आणि रखमाची सोबत होती एक आधार होता तो पण गेला.
जोवर परशा होता वाड्यात तोवर वाड्यावर फ़ार कुणी फ़िरकत नव्हते. पण परशा निघुन गेला आणि शंकरचे मित्रमंडळ हळु हळु त्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने वाड्यावर येऊ लागले. त्यांच्या येण्याने शंकरमधे थोडा थोडा बदल होऊ लागला होता. थोडा माणसात आला तो. जरा बोलु लागला. त्याच्या पुर्वीच्या रुटीनप्रमाणे हळु हळु सारे चालु झाले होते. सकाळचा व्यायाम, शेतावर जाणे, मुलांबरोबर खेळणे गप्पा मारणे, आईशी बोलत बसणे, तिची चौकशी करणे, मधेच आठवण आली की लतिकाला फ़ोन करुन तिच्याशी बोलणे. पण या सार्याला चार महिन्याचा अवधी गेला. चार महिन्यानंतर एकदा दोन मित्रांना घेउन राजेशच्या घरी जाऊन तेथील सामानाची विल्हेवाट लाऊन आला. म्हणजे जवळ जवळ सारे सामान कुणाला ना कुणाला तरी देऊनच टाकले. कपडे भांडी वगैरे आश्रमात दिले. अन ते घर राजेशच्या कंपनीच्या ताब्यात देऊन त्याच्या ऑफ़ीसची इतर सारी कागदपत्रांची पुर्तता करुन आला. या सार्याला आठ दिवस लागले. राजी आणि यशोदाआज्जी पण आता शंकर माणसात आला म्हणुन खुश होत्या. अन मुलेही बाबा बाबा करत त्याच्या अवती भवती होती. अशातच एक दिवस रात्री नऊच्या दरम्यान शंकर घरी आला ते झोकांड्या खातच. राजीला आणि मुलांना त्याचे हे रुप नविनच होते. तो आता आला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. ती विमन्स्क अवस्थेतच. आज्जीला तेव्हा काहीच समजले नव्हते. पण सकाळी उठल्यावर राजीचे काहीतरी बिनसले आहे एवढे मात्र समजले. राजी अगदी गप्प गप्प होती. पण तिने राजीला काहीही विचारले नाही. कारण काय ते केव्हा न केव्हा कळणारच होते. एवढ्यात बाथरुममधुन शंकरच्या ओकार्यांचा आवाज यायला लागला. तिने गणेशला बोलवले आणि विचारले, " काय रे तुझ्या बाबाची तब्बेत बरी नाही काय रे ? " गणेश उत्तरला, " नाही ग आज्जी काल रात्री ते दारु पिऊन आलेत. त्यामुळे ओकार्या करत आहेत. " यशोदा आज्जी पण हादरलीच. नाही म्हणलं तरी आजवर विष्णुपंतांचा ते बोलले नाही कधी तरी धाक होता. मागे जेव्हा तो पिऊन आला होता त्याचवेळी आपल्या मुलाकडे त्यांनी अशा नजरेने पाहिले होते की काही बोलायची गरजच नव्हती. पण आता काय??? तिने त्याला आपल्या खोलीत बोलवुन घेतले आणि त्याला याबद्दल जाब विचारला. तेव्हा " आई अग मित्रांबरोबर गेलो होतो. त्यांनी जरा आग्रह केला म्हणुन थोडीशीच घेतली." त्या आपल्या लेकावर जरा रागवल्याच. " अरे ते मस्त आग्रह करतील म्हणुन काय तु लगेच ग्लास लावायचा का तोंडाला? हेच आम्ही संस्कार केले का? अरे जरा आपल्या वडिलांचा मान राख......................................... " असे बरेच काही बोलल्या. त्यावर तो काहीच न बोलता तिथुन उठला आणि बाहेर पडला. आता हे सारे नित्याचेच होऊन बसले. कुणाच्याच रागाला, अबोल्याला, प्रेमाला तो भिक घालत नव्हता. या दारुच्या नशेत त्याने कुठल्या कुठल्या कागदांवर सह्या केल्या हे एकतर तो जाणे आणि देवच जाणे. पण सारी शेती गेली. उत्पनाचे साधनच गेले आणि खायचे वांदे सुरु झाले. नशिब की घर राजीच्या नावावर केले होते. त्यामुळे निवार्याचा प्रश्न नव्हता. नाहीतर डोक्यावरचे छप्परही गेले असते तर मुलांना घेऊन कुठे जायचे हा प्रश्न निर्माण झाला असता. आता तर दारुसाठी शंकर घरातील सामानही हळु हळु घेउन जाऊ लागला होता. पैशाच्या बदल्यात सामान ठेवायचे आणि दारु पिऊन यायचे. अगदी वेळी अवेळी. शुद्धीत असेल तेव्हा जेवायचा आपल्या हाताने घेउन. फ़क्त एक मात्र होते की त्याने दारु पिऊन घरात धिंगाणा केला नव्हता की राजीवर मुलांवर हात उचलला नव्हता हीच काय ती जमेची बाजु म्हणता येइल. स्वैपाकघरात आता अगदीच जुजबी वस्तु उरल्या होत्या हेच का देशमुखांचे घर असा प्रश्न पडावा इतपत. कपाटातला एक दागिना बाहेर गेल्यावर मात्र राजीने शहाणपणा करुन फ़ोन करुन मोठ्या भावाला आणि वहिनीला बोलावुन घेतले आणि घरातले सारे किडुक मिडुक दागिने, चांदीच्या वस्तु त्यांच्या स्वाधिन केल्या. अन जपुन ठेवायला सांगितल्या. जोवर मी स्वता मागत नाही तोपर्यंत कुणालाही हे द्यायचे नाही असे बजावुन ठेवले. भाऊ ते सारे घेऊन गेला आणि आपल्या बहिणीचे हे धन त्याने बॅंकेत ठेवुन टाकले.
एवढा मोठा वाडा आता काय करायचा म्हणुन तिने वाड्यातल्या चारच खोल्या स्वताकडे ठेवुन बाकी दोन दोन खोल्यात तीन भाडेकरु ठेवले. किमान तेवढाच संसाराला हातभार. पण येणार्या दीड दोन हजारात काय काय भागवायचे? मुले मोठी होत होती. त्यांच्या गरजा वाढत होत्या. घरातल्या मिठ मिरचीलासुद्धा ते पैसे पुरेनात. मग कपडालत्ता, शाळेच्या सार्या वस्तु कुठे कुठे काय काय भागवणार? यशोदा आजीच्या जिवाचे पाणी पाणी होत होते राजीचे होत असलेले हाल पाहताना. एकदा अशीच वैतागुन तिरीमिरीत राजी बाहेर पडली. आणि काही घरात जाऊन कामाबद्दल विचारुन आली. पण देशमुखांची सुन आपण तिला कामाला कसे लावायचे हा विचार करत कुणीच कसलेही काम द्यायला तयार होत नव्हते. अगदी धुणी-भांडी ते स्वैपाक करण्याचीही तिची तयारी होती. पण छे. कुठेच काही जमत नव्हते. रडवेली होऊन ती घरी आली. आल्या आल्या सासुच्या कुशीत शिरुन ती रडु लागली आणि शांत झाल्यावर सारे सांगितले. सुनेची धडपड पाहुन तिला त्या न मिळणार्या यशाबद्दल तिला खुप वाईट वाटले. मुलांची रोजची उपासमार होऊ लागली. गणेश खुपच समजुतदार होता पण मिनी आणि चंदा लहानच होत्या तशा अजुन. भुकेने कळवळायच्या. शंकर काय या जगात असुन नसल्यासारखाच होता. त्याला कशाचीच शुद्ध नसायची. एके दिवशी आज्जी उठली अन सरळ दादुच्या गिरणीत गेली. गिरणीत कुणी नाही असे पाहुन तिने दादुला विचारले, " दादु तुझ्या गिरणीत आजुबाजुला पीठ पडते त्याचे तु काय करतोस रे? " दादु म्हणाला, " अग आज्जे मी ते बाहेर टाजुन देतो कारण थोडेफ़ार मिक्स झालेले असते नं.... मग येणारी जाणारी जनावरे ते खातात. का ग आज्जे असं का विचारतेस तु ? " आज्जी बोलाव की न बोलाव या विचारात होती. शेवटी धीर करुन तिने विचारलच, " दादु तुझ्या दोन्ही गिरण्या वेगवेगळ्या आहेत न रे? मग दोन्हीकडचे बाहेर उडलेले पीठ वेगवेगळे पिशवीत बांधुन देशील मला? " असे म्हणताना आज्जीच्या डोळ्यात पाणी भरुन आले होते. ते ती पुसत असताना दादुने पाहिलेच. " काय ग माय काय झालं ग ? तुझ्या डोळ्यात पाणी? "
" हो रे दादु, तुझ्यापासुन काय लपवायचे रे? तुला घरची परिस्थिती माहीती आहेच. अन्नाविणा मुलांचे हाल होत आहेत. राजी काम मागायला गावात फ़िरली पण देशमुखांची सुन म्हणुन कुणीही तिला काम द्यायला तयार होईना. मग काय करणार? म्हणून तुझ्याकडे आले. हे गोळा केलेले पीठ, तेवढच काहीतरी करुन घालता येईल मुलांना. " " आज्जे देईन मी तु काळजी नको करुस. सकाळी लवकर येत जा म्हणजे रात्री उशीरपर्यंत गिरणी चालु असते ते पीठ गोळा करुन ठेवत जाईन मी." अशा तर्हेने रोज आज्जी दादुकडुन पीठ आणु लागली. तेवढ्यात सुद्धा मुले खुश होऊ लागली. पण याची कसलीही फ़िकीर शंकरला नव्हतीच. आपला जिवनपट आठवता आठवता शंकरचा विचार करता करता राजीला केव्हा डोळा लागला समजलच नाही.
सकाळी तिला जाग आली तीच मुळी खुप उशीरा. आज्जी उठुन कामाला लागली होती. तिला उगाचच कानकोंडे झाले. " आई तुम्हाला बरे नाहीय तर कशाला उठला तुम्ही मला हाक मारायची नं... " " अग राजे कालच्या औषधाने मला खुप फ़रक पडलाय. अन काल तुला आजिबात झोप नव्हती लागली. रात्रीपण उशीरा झोपलीस. म्हणलं कशाला उठवायचे." राजी उठुन कामाला लागली. ज्वारीच्या पिठाची उपम्यासारखी उकड करुन सासुला आणि मुलांना खायला दिली. थोडी उकड शंकरसाठी ठेवुन तिनेही थोडे खाऊन घेतले अन ती स्वैपाकाला लागली. अधुन मधुन कुणी ना कुणीतरी जुन्या उपकाराची जाणीव ठेवत आणि यशोदा आज्जी आणि तिला वाईट वाटणार नाही याची काळजी घेत शेतातली पालेभाजी, फ़ळभाजी आणुन द्यायचे. ती ते पुरवुन पुरवुन वापरायची. भाडेकरुंच्या आलेल्या पैशातुन मीठ मिरची तेल तांदुळ असे काही बाही किरकोळ यायचे. ज्या घरात दुधाच्या घागरी असायच्या त्याच घरात विकतचे पावशेर दुध अन ते सुद्धा विकतचे यायचे. दिवस असेच चालले होते. गणेश मात्र चांगला अभ्यास करत होता. दुकानात कामही करत होताच. यंदा दहावी होती त्याची. तुटपुंज्या अभ्यासाच्या साहित्यावर आणि मित्रांनी दिलेल्या वह्या पुस्तके यांच्या मदतीने अन स्वताच्या मेहनतीने दहावीला तो बोर्डात पहिला आला. सगळीकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण आता काय करायचे हे मात्र नक्की होत नव्हते. कारण एकच पैसा. त्याला स्वताला इंजीनीयरींगला जाण्यात इंटरेस्ट होता. पण फ़ी आणि बाहेरगावी रहायचे म्हणजे तो खर्च याचे गणित कसे जमणार याच विवंचनेत तो आणि राजी होते. गणेशचा मामा आणि मामी त्याचे अभिनंदन करायला आलेच होते तेव्हा त्यांच्याकडे राजीने विषय काढला. " दादा मला वाटते आता माझ्या दागिन्यांची गरज लागेल असे वाटतेय. काहीही झाले तरी मी माझ्या तीनही मुलांना चांगले शिकवणारच. गणेशला इंजीनीयरींगला जायचय. पण पैशा अभावी त्याचे ते स्वप्न मी धुळीस नाही मिळु देणार. "
" हो राजी, मी त्याच हेतुने आलेलो आहे तुझ्याकडे. म्हणल भाच्याचे अभिनंदनही करता येईल आणि तुझ्याशीही बोलता येईल."
" बर बोल काय म्हणतोस तु. "
" हे बघ राजी, गणेश पहिला आलाय बोर्डात तेव्हा त्याला कोणत्याही कॉलेजात अॅडमिशन मिळेल. गव्हर्नमेंट कॉलेजात जर त्याने डिप्लोमा इंजीनियरींग ला अॅडमिशन घेतली तर तीन वर्षात हा कोर्स पुर्ण होईल. अन तसही या कोर्सची फ़ी फ़ार नाहीय. ते मी देतो आत्ता. त्यासाठी दागिन्याला हात लावायची गरज नाही. आजवर आमची मदत तु कायमच नाकारत आलेली आहेत. मी काहीही बोललो नाही पण आता मात्र तुझे काहीही ऐकणार नाही. फ़ार तर कर्ज समजुन घे ही रक्कम आणि जेव्हा गणेश कमवायला लागेल तेव्हा मला परत कर. एवढे तरी ऐक माझे."
यशोदा आज्जीही तिथेच होत्या. त्यांनीही डोळ्यानेच होकार भरला. मग राजी त्यासाठी तयार झाली. शाळेतील एका शिक्षकांच्या मदतीने जवळच्याच शहरातील एका कॉलेजमधे डिप्लोमा इंजीनियरींगच्या सिव्हील विभागात त्याने अॅडमिशन घेतली. रहायची व्यवस्था मामीच्या बहिणीकडे झाली दोन महिन्यासाठी. त्याचे कॉलेज रुटीन चालु झाले. शहरातील वातावरणाची सवय झाली. त्या वातावरणाचा डोळे उघडे ठेवुन तो अभ्यास करु लागला. जिथे रहात होता त्यांच्या बरोबर काही बोलणे केले आणि एक निश्चय करुनच तो महिन्याभरात परत आपल्या गावी आला.
आईला हाका मारत म्हणाला, " आई आज्जी जरा इकडे या मला तुमच्याशी बोलायचेय." नाही म्हणले तरी महिन्याभरातल्या शहरी वातावरणाची छाप त्याच्या वागण्या बोलण्यात पडली होती. " आई ऐक मी काय म्हणतोय ते....... हे बघ आपण सारे शहरात शिफ़्ट होऊया. मी एका खोलीत रहात आहे. मामीच्या बहिणीकडे. त्यांच्याशी बोलुन मी अजुन एक खोली मिळवलीय. म्हणजे दोन खोल्या आहेत. आतच बाथरुम आहे पण संडास मात्र कॉमन आहे. मावशी त्यांच्या ओळखीने तुला काही कामे देतील. माझ्या काही मित्रांना डबे हवेत. ते तु घरी बनवुन द्यायचेस. आणि मावशी म्हणतात तिथे घरी जाऊन स्वैपाक करायचा. चंदा आणी मिनीच्या शाळेच्या अॅडमिशनची जबाबदारी मावशींचे मिस्टर घेतो म्हणालेत. आपण सारेच एकत्र राहु. मलाही घरचे जेवण मिळेल. आणि मुख्य म्हणजे बाबा. त्यांना तिथे जाऊन काही फ़रक पडतोय का बघु काही औषधे पण मिळतात म्हणे तिथे. आणि मुख्यतः त्यांची इथली संगत सुटेल." आपल्या लेकाचे हे आत्मविश्वासपुर्ण बोलणे ऐकुन राजी आणि गणेशची आज्जी भारावुनच गेल्या. काय तो निर्णय लगेच घेणे भाग होते. भावाशी फ़ोनवर बोलावे की काय असे तिला वाटले. आता घरात काही फ़ोन नव्हता. काही विचार करुन ती गणेशला म्हणाली, " बाळा तुझे म्हणणे मला पटतय पण एकदा मामाशी बोलुन बघुया का? " " चालेल आई, चल आपण गावात जाऊ आणि बुथवरुन लगेच फ़ोन करु." आज काय ते सोक्षमोक्ष लावायचाच याच उद्देशाने तो घरी आला होता. राजीने सासुकडे पाहिले. तिनेही डोळ्यानेच संमती दिली. मग तीने बुथवरुन भावाला फ़ोन लावला. तिनही भावांशी बोलली. भावांनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली. दोघेही घरी आले. आणि मग दोन चार दिवसात सामानाची बांधाबांध करुन, मुलींचे शाळेचे दाखले काढुन घेउन शनिवारी सकाळच्या पहिल्या गाडीने निघायचे असे ठरले. अर्थात सामान असे ते काय होते? एका पोत्यात भांडी कुंडी, एका ट्रंकेत सर्वांचे कपडे, आणि अंथरुण पाघरुणाची एक वळकटी बास. त्याला तासभर फ़ार फ़ार तर दोन तास बास होते. मुख्य काम होते ते शाळेच्या दाखल्याचे. ते काम गणेशने पुढच्या दोन दिवसात केले. या कशाचीही खबर शंकरला नव्हती. शुक्रवारी मात्र गणेशने गोड बोलुन शंकरला घरातच गुंगवुन ठेवले. बाहेर जाऊ दिले नाही. राजी पण त्याच्याशी नीट बोलली. बर्याच वर्षानी सारे एकत्र जेवले त्या दिवशी. उद्या आपण गावाला जायचेय असे त्याला सांगुन ठेवले. भाडेकरुंना पण कल्पना देऊन ठेवली. आणि भाड्यासाठी महिन्याच्या पाच तारखेपर्यंत कुणी ना कुणी येईल अर्थातच गणेश किंवा राजी. तेव्हा भाड्याचे पैसे तयार ठेवावेत असे सांगितले.
शनिवारी पहिल्या एसटीने सारीजण शहरात रवाना झाली. पोचयला ११ वाजुन गेले. मावशींनी सार्यांचाच स्वैपाक तयार ठेवला होता. खोलीमधे सामान ठेवुन मावशींकडेच सारे जेवले. दुपारी जरा विश्रांती झाल्यावर मुली आणि सासुच्या मदतीने सारे सामान लावले. घरातला असलेला शिधाही बरोबर आणला होता. पण मावशींनी बजावले होते दोन तीन दिवस नका स्वैपाक करु. मी येथुन जेवण देते. दोन दिवसात जरा सेट व्हा. कामाचेही बघु. अन मग सुरुवात करा तुम्ही. रविवारी मावशींनी त्याच्या किराणावाल्याशी बोलुन या कुटुंबाला महिन्याला पुरेल असा किराणा उधारीवर घेउन दिला. आणि तुमचे रुटीन बसले की मग आमचे भाडे द्यायला लागा असे सांगितले. राजीला खरच त्या देवदुतच वाटल्या. मुलीही जरा हरकल्या होत्या. पण नवी शाळा नव्या मैत्रिणी कसे काय जमणार या काळजीत होत्या. अर्थातच दोघीही जग्न्मैत्रिणी होत्या. कुणाशीही पटकन सुर जुळायचे दोघींचेही. मावशींच्या मिस्टरांनी बोलुन ठेवले होतेच त्यामुळे लगेचच सोमवारपासुन शाळाही सुरु झाली. त्यांच्या ओळखीने शाळेतुनच जुने युनिफ़ॉर्म आणि पुस्तके मिळाली. वह्याही मिळाल्या पण त्याचे मात्र पैसे द्यावे लागणार होते. पण ते त्यांनी स्वता भरले. मिनीची शाळा सकाळची होती तर चंदाची शाळा दुपारची. गणेशचे ही कॉलेज चालु झाले. मावशींबरोबर जाऊन राजीनेही आपली कामे फ़िक्स करुन टाकली. मंगळवारपासुन ती कामे पण चालु झाली. यशोदा आज्जीला हे सारे राजीच्या चांगल्या कामाचेच चांगल्या वागण्याचेच अन ति घेत असलेल्या कष्टाचे फ़ळ आहे असे मनोमन वाटत होते.
यशोदा आज्जी घरचे सारे काम बघायची आणि त्यामुळेच राजीनेही अजुन चार कामे वाढवली. राजीच्या हाताला चांगली चवही होतीच त्यामुळे तिला सणावाराच्याही ऑर्डर मिळु लागल्या. आता चार पैसे हातात रहात होते. त्यामुळे मनासारख्या चार गोष्टी मुलांसाठी ती करु शकत होती. मावशींच्या वाड्यातील तिच्या शेजारीच राहणारे एक बिर्हाड नोकरीनिमित्त्य घर सोडुन गेले होते. तिने त्या दोन खोल्यांबद्दल मावशींना विचारले. आणि त्या दोन खोल्याही तिने भाड्य़ाने घेतल्या. मुली मोठ्या होत होत्या. गणेशलाही अभ्यासाला स्वतंत्र खोली असावी असे तिला वाटत होते. आत्ताच्या दोन खोल्यात नाही म्हणल तरी अडचण व्हायची पण इलाजच नव्हता. पण आता तसे नव्हते.... या सात आठ महिन्यात राजीने आपल्या मेहनतीने आणि काटकसरीने गाठीला चार पैसे गोळा केलेले होते. आणि मुळात तिला आता चांगलाच आत्मविश्वास आला होता. आपण याआधीच का गाव सोडले नाही असे वाटले. अन हे असे वाटायचे कारण म्हणजे शंकर. या सात आठ महिन्यात त्याने दारुला स्पर्शही केला नव्हता. नाही म्हणले तरी पहिला महिनाभर अस्वस्थ होता तो. तलफ़ यायची त्याला नाही असे नाही. पण मावशींच्या यजमानांना म्हणजे शिवरामपंतांना सारे काही माहिती होते. आता मुलगाच सारा धंदापाणी संभाळत असल्याने ते तसे घरातच असायचे त्यामुळे शंकरकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. तो कुठे बाहेर जायला निघाला तरी एका माणसाला त्याच्या मागावर सोडायचे. पण शंकरनेही त्याला काय वाटले कोण जाणे पण शहरात आल्यापासुन दारुच्या दुकानाची पायरी चढली नाही. बाहेर पडला की तो देवळात दोन दोन तास बसायचा आणि घरी यायचा. घरी आला की आईने वाढुन दिलेले जेवून झोपायचा. असच एकदा दरवाजात बसलेल्या शंकरला बघुन शिवरामपंतांनी हाक मारली. " या शंकरराव... बसुया जरा गप्पा मारत. " शंकरही जरा बुजतच त्यांच्याकडे गेला. शंकरला बोलता ठेवत त्याच्याकडुन सारी माहिती काढुन घेतली. शेतीवाडी कशी गेली. त्याला काय काय काम येते तसेच त्याचे शिक्षण किती वगैरे वगैरे. शंकर ही गावातील बडी असामी होती हे माहित असल्याने विचारु का नको या विचारात असलेल्या शिवरामपंतांनी शेवटी शंकरला विचारलेच. " शंकरराव तुम्ही मोठी असामी होतात गावातील पण सारे होत्याचे नव्हते झाले. बर आता झाले ते झाले. त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही. गेले महिनाभर मी तुमचा अंदाज घेतोय. मी काही काम दिले तुम्हाला तर तुम्ही कराल? " शंकरचे डॊळे लकाकले. तसही त्याला आता लाज वाटत होती घरी बसुन खाण्याची. बायको कमावतेय आणि आपण आयते खातोय हा विचारांचा भुंगा गेले काही दिवस त्याला स्वस्थ बसु देत नव्हताच. त्याने काय काम आहे हे न विचारताच लगेच होकार भरला. मग शिवरामपंतांनी मुलाशी बोलुन त्यांच्या कारखान्यातील एका युनीटवर लक्ष ठेवायचे काम त्याच्यावर सोपवले. सुरुवातीला त्या युणीटचे कामगार वेळेवर येतात का नाहीत, काम चोख करतात का, काम करताना मधेच थांबुन गप्पा मारतात का अशी जुजबी कामे सोपवली. महिन्याभरात त्याचे कितपत लक्ष आहे कामावर हे पाहुन खुश झालेल्या शिवरामपंतांच्या मुलाने सुजयने त्या युनीटचे अजुन काही काम सोपवले. शेतावर गड्यांकडुन गोड बोलुन प्रसंगी कठोर वागुन काम करवुन घेण्यात शंकर वाकबगार असल्याने त्याला हे फ़ारसे अवघड वाटले नाही. आणि अशा तर्हेने त्याचा वेळही जाऊ लागला आणि चार पैसेही हाती आले. आणि सुजयला घरचा हक्काचा विश्वासु माणुस मिळाला. पहिला पगार हातात आल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रु आले. थोडे दुखाश्रु थोडे आनंदाश्रु. दुखाश्रु या साठी की लाखोत लोळलेल्या शंकरला अशी नोकरी करावी लागत होती. जे होते ते आपण दारुत सारे घालवले. आणि आनंदाश्रु या साठी की आता आपण बायकोला जरा हातभार लावु शकु. पहिला पगार बायकोच्या स्वाधिन केल्यावर राजीला पण मनापासुन आनंद झाला. आणि यशोदा आज्जी???? ती तर मागचे सारे विसरुन त्याच्याशी धरलेला अबोला सोडुन आनंदली. त्याची अलाबला घेतली. आता या सुखाला कुणाची दृष्ट नको लागायला असे म्हणत त्याला जवळ घेतले. अन तोही लहान मुलासारखे आईच्या कुशीत शिरुन रडु लागला. तिनेही त्याला थांबवले नाही.
गणेशही डिप्लोमा फ़र्स्टक्लास मधे पास झाला. मिनी दहावी झाली होती. आणि चंदाही सातवीत गेली होती. चंदा जात्याच हुशार होती त्यामुळे चौथीत तिने स्कॉलरशीप मिळवली होती. आता सातवीतही ती मिळवायची याचा निर्धार केला होता. सर्वांचेच या तीन चार वर्षात छान रुटीन बसले होते. राजीच्या फ़राळाच्या पदार्थांना दिवाळीत खुप मागणी असायची. राजीही मग अशीच एक गरजु बाई मदतीला घेउन सारे काही पार पाडत होती. सासुची मदत असायचीच. अधुन मधुन गावदेवीच्या जत्रेला शंकर सोडुन सारे जात होतेच. तो नाही म्हणायचा तिकडे जायला अन कुणी आग्रहपण करत नव्हते. न जाणो त्यावेळचे ते मित्र परत भेटले अन परत सारा प्रकार चालु झाला तर???...... घरचे भाडे येत होतेच पण एक वेगळा तापही चालु झाला होता. खोल्या सोडायला कुणी तयार नव्हते. आहे ते आम्ही विकत घेतो जो काय असेल बाजारभाव त्याने आम्हाला द्या असे तीनही कुळे म्हणत होती. राजी आणि यशोदा आज्जीने विचार करुन गणेशशी आणि शंकरशी बोलुन काय असेल तो विषय मिटवुन टाकावा असे ठरवले. त्यानुसार आहे ते सगळेच घर विकुन टाकले आणि गावचा संबंधच संपवुन टाकला. चांगल्या आठवणींपेक्षा वाईट आठवणीच जास्त असल्याने कुणालाही त्याबद्दल फ़ारसे वाईट वाटले नाही. आलेले पैसे चंदा आणि मिनीच्या नावे बॅंकेत ठेवले. त्यांच्या लग्नाला उपयोगी येतील म्हणुन.
गणेशलाही डिप्लोमा झाल्यावर लगेच चांगला जॉब मिळाला एका बिल्डरकडे. पण त्याचे डिगरी करुन स्वताचा बिझनेस चालु करायचा असे स्वप्न होते. पण डिगरीला लागणारा पैसा आणणार कुठुन? त्यामुळे त्याने जॉब पत्करला. समर्थ असोसिएटस च्या मालकांना बापु कुलकर्ण्यांना ही कल्पना होती. त्याचे वर्षभरातले काम बघुन आणि त्याची डिगरी करायची इच्छा बघुन ते म्हणाले तुझ्या डिगरीला मी मदत करतो पण तु माझ्याकडचा जॉब नाही सोडायचास. काही विचार करुन आणि आईशी बोलुन त्याने डिगरीला अॅडमिशन घेतली. वेळ मिळेल तसे साईट्स वर जाणे. मालकांना त्यांच्या कामात मदत करणे हे कॉलेज संभाळत चालुच ठेवले. डिगरीला तो युनिव्हर्सिटीत तिसरा आला. सर्वांनाच आनंदी आनंद झाला.
राजीने मावशींना विचारुन त्यांच्या घराच्या टेरेसवर छोटी पार्टी ठेवली होती. घरी पुजाही घातली होती. सारा स्वैपाक तिने स्वता जातीने बनवला होता. मावशी त्यांच्या घरचे, बापु कुलकर्णी आणि त्यांच्या घरचे तसेच आई वडील, आपले तीनही भाऊ आणि तीनही वहिन्या आणि भाचरे यांना बोलावणे केले. लतिकाशीही अधुन मधुन संपर्क असयचाच पण ती जयपुरला असल्याने ती आणि तिच्याघरची काही आली नाहीत. पण आमच्या खुप खुप शुभेच्छा आहेत असे त्यांनी कळवले. संध्याकाळी सारेच टेरेसवर जमले. सर्वांनी गणेशला शुभेच्छा दिल्या. काही गिफ़्ट्स दिले. या सार्यात एक नवा गोड चेहरा मात्र गणेशला चांगलेच निरखत होता. बापु पुढे झाले आणि त्यांनीही गणेशला शुभेच्छा दिल्या. आणि ते बोलु लागले, ’ गणेश हा एक मेहनती मुलगा आहे. तसेच तो एक उत्तम बिझनेसमन होऊ शकेल ही माझी खात्री आहे. त्याच्यासारखा मोठ्यांना मान देणारा, हुशार आणि निगर्वी मुलगा मी अजुनपर्यंत पाहिला नाही. कॉलेजच्या काळात अनेक प्रलोभने समोर येत असतात. त्यात बरीच मी मी म्हणणारी मुले वाहुन जात असतात. पण हा मुलगा काही औरच आहे. अभ्यास एके अभ्यास करत याने सर्वातच सरशी मारली आहे. माझे त्याच्यासाठी असलेले गिफ़्ट म्हणजे माझा सारा बिझनेस त्याने संभाळुन आता मला विश्रांती द्यावी. तसेच राजी वहिनी आणि शंकर भाऊ तुम्हाला आणि गणेशलाही पसंत असेल तर माझ्या मुलीचा रेवा चा तुम्ही स्विकार करावा. माझी रेवाही चांगली शिकलेली आहे. सी ए करतेय. या बिझनेसमधे त्याला उत्तम साथ देईल. पण अर्थातच तुमचा नकार असेल तरी माझा गणेशला बिझनेस सुपुर्द करायच्या निर्णयात माघार नाही हे पण लक्षात असु द्या. तुम्ही विचार करुन सांगा. " त्यांनी असे म्हणल्यावर मग गणेशचे आणि इतर सार्यांचेच लक्ष रेवाकडे गेले. सर्वांनाच ती आवडली. पण गणेशने स्पष्ट शब्दात तिच्याशी आणि बापुंशी आधी बोलेन अन मगच माझा निर्णय सांगेन असे सांगिअतले आणि ते सर्वांनाच मान्य झाले. हसत खेळत जेवणे झाली. सर्वांचे तृप्त चेहरे पाहुन राजीचेही समाधान झाले.
गणेशनेही बापुंशी आणि रेवाशी बोलुन आपल्या सार्या शंका क्लीअर करुन घेउन होकार दिला. आणि महिन्याभरातच रेवाने गणेशच्या घराचे माप ओलांडले. भावाकडुन आपले दागिने मागुन घेउन त्यातील मुलींसाठी काही शिल्ल्क ठेवुन आणि लतिकाला काही दागिने आजोळची भेट म्हणुन देउन बाकी सारे रेवाच्या स्वाधीन केले. हो लतिका आज कितीतरी वर्षांनी आपल्या आजोळी आली होती. गणेशच्या लग्नासाठी. कितीतरी वर्षांनी ती आपल्या मामा मामीला आज्जीला आणी भावंडांना भेटत होती. सुमन, सतीष, राजेश मनिषा आर्य आणि मनवा यांच्या आठवणीने सारेच हेलावले होते. मोठी झालेली लतिका अगदी सुमनची कार्बन कॉपीच वाटत होती. ती मुद्दाम पंधरा दिवसाची सवड काढुनच आली होती. आपल्या मामा मामीशी आणि भावंडांशी आणि आता झालेल्या नव्या वहिनीशी खुप खुप बोलायचे होते. यथावकाश गणेशने आपले स्वताचे मोठे घर घेतले. मिनी आणि चंदाचेही योग्य स्थळी लग्न करुन दिले. लतिकालाही कुणी कशाचीही उणीव भासु दिली नाही.... ना आजोळच्या घराने ना तिच्या काका काकुंनी आता पुर्वीच्या दुःखाचे सावटही कुणाला नको होते. पण आठवणी ह्या आठवणीच असतात कधी कधी चोरपावलाने यायच्याही पण सारे सुख पाहुन मागच्या पावली परत फ़िरायच्या. सारे सुख पाहुन अशोदा आज्जीनेही सुखासमाधानाने या जगाचा निरोप घेतला होता. शंकरही आता तो जे युनीट चालवत होता त्याचा मालक झाला होता. पण राजीने मात्र अजुनही आपले काम चालु ठेवले होते. ज्यामुळे आपण आज इथवर पोचलो ते काम बंद करणे तिला शक्य नव्हते रादर ते कृतघ्नपणाचे वाटले असते. म्हणुन तिने ते चालु ठेवायचा निर्णय घेतला होता. अर्थात कुणाच्या घरी जात नव्हती ती स्वैपाकाला. पण जवळच जागा घेऊन एक युनीट तिने चालु केले होते. अजुन काहीजणींना रोजगार मिळेल म्हणुन म्हणुन आहे ते काम थोड्या मोठ्या प्रमाणात चालु केले होते. त्यावर १० जणींची कुटुंबे चालत होती.
गणेश अणि रेवाही खुप आनंदात होते. जास्त करुन रेवा. कारण आईसारखी माया करणारी सासु आणि बापुंसारखेच प्रेमळ सासरे शंकरच्या रुपात मिळालेले असताना तिला अजुन काय हवे होते? गणेश, मिनी, चंदा आणि लतिका कायम एकमेकांच्या संपर्कात रहात होते. आपल्या मुलाबाळांसहीत कधी मधी एखादे गेटटुगेदर करत होते. अन हे सारे राजी अन शंकर आनंदाने अनुभवत होते. सुख सुख म्हणतात ते हेच अन या सुखाला आता कुणाचीही दृष्ट नको लागायला असे म्हणत मनोमन देवाला नमस्कार करत होते.
" काय चंदाराणी काय म्हणताय आज आजी नाय आली का?"
" दादु आबा आजीला ताप चढलाय ना म्हणुन आईने मला पाठवलय. "
तिच्या कडेवरचा न आवरणारा पण मोकळाच डबा दादुने घेतला अन म्हणाला, " जा आता शाळेत तु, मी गिरणी बंद करताना घरी पोचवतो डबा अस सांग तुझ्या मायेला. अन मला सांग तु जेवलीस का नाही? "
दादुपासुन तोंड लपवुन हो जेवले म्हणत ती माघारी निघाली. दादु काय समजायचे ते समजला. त्याने किसनाला आपल्या मधल्या नातवाला साद घातली, " आर ये किसना हिकड ये जरा. माझ काम करशील का रे पोरा."
किसन अभ्यास करत बसला होता. दादुची हाक येताच तो लगेचच दादुकडे आला. " काय रे दादु मला कशाला बोलवलस रे? "
" आर पोरा माझं एक काम कर मी पीठ देतो ते घे आणि मधल्या आळीतल्या राजी वयनीकडे पोचते कर. मगाशी चंदा आली होती पण तिला काही डबा पेलायचा नाही म्हणुन म्या तिला घरी धाडलय. आन एक काम कर. तुझ्या आवशीने भाकरी कालवण केल असल त्यातल थोडं चंदासाठी घेउन जा. मी तोवर डबा भरुन ठेवतो. जा तु पटकन ये. "
दादुकडे ज्वारीची आणि गव्हाची अशा दोन वेगवेगळ्या गिरण्या होत्या. खाली सांडलेले पिठ न्यायला रोज यशोदा चंदाची आज्जी यायची. दादु दोनही पिठे वेगवेगळ्या पिशवीत घालुन ठेवायचा. कधी कधी जास्त दळणे आली नाहीत तर सगळ्या डब्यातले मुठ मुठ पिठ काढायचा. त्याला खर तर ही लबाडी वाटायची पण त्याचा नाईलाज असायचा. आपण लबाडी करतोय पण त्यामुळे चार भुकेले जीव त्यावर जगत आहेत हे समाधान दादुला जास्त होते. खरे तर यापेक्षाही काही जास्त करावे असे दादुला नेहमीच वाटे पण त्याच्या कुटुंबाचे पोटही फ़क्त गिरणीवर चाले.
किसन दादुने दिलेले पिठ चंदाने आणलेल्या डब्यात घेउन निघाला एका हातात भाकरी अन कालवण असलेल्या डब्याची पिशवी होती.
राजी मावशी ए राजी मावशी अशी हाक मारतच किसन घरात शिरला. " मावशे हे घे डबा दादुने दिलाय बघ. अन हे आयेने दिलय. चंदाला खाऊ घाल आन शाळेला पाठव. मी येतो थोड्यावेळात तिला न्यायला. आन यशुआज्जी कशी आहे ग मावशे? दादु म्हणत होता ताप भरलाय म्हणे."
" हो रे किसना, सासुबाई आजारी आहेत. मगाशी दिलाय काढा करुन आता येइल ताप कमी. "
" पण दवाखान्यात ने ग तिला संध्याकाळी. " असे म्हणत तो झपाझप घराकडे निघाला.
भाकरी भाजीचा डबा पाहुन चंदा खुश झाली. आता आज उपाशीच नाही जावे लागणार शाळेला या विचाराने तिला जरा बरे वाटले. पण तरीही अर्धीच भाकरी खाउन ती पानावरुन उठली. राजीने पाहिले तर चार भाकर्या होत्या डब्यात पण खाणारी तोंडे पण सहा होती. राजी, यशु आज्जी, चंदा, मिनी, गणेश आणि शंकर. मिनी आणि गणेश तासाभरात येतील शाळेतुन आणि शंकर ??? कुठल्या गुत्त्यात जाऊन पडलाय कोण जाणे. केवढं छान सोन्यासारखे घर पण शंकरच्या दारुच्या व्यसनापाई आता सुतळीचा तोडाही घरात नसल्यासारखी घराची अवस्था झाली होती.
विचार करत ती केव्हा भुतकाळात पोचली तिचे तिलाच नाही समजले. सात बहिणी आणि तीन भावंडात आठवा नंबर असलेली राजी दिसायला सर्वात खुप सुंदर. तिचे राव खरे तर राजलक्ष्मी पण सारे लाडाने तिला राजीच म्हणायचे. घरची तशी गरीबीच पण खाऊन पिऊन सुखी असे कुटूंब. शेताच्या तीन एकर तुकड्यात वडिल आणि तिघे भाऊ रात्रंदिवस राबायचे. मोठ्या सार्या बहिणींची लग्ने झाली होती. गाव तसे यथा तथाच असल्याने शिक्षणे मात्र कुणाचीही जास्त नव्हती झाली. आणि मुलींना परगावी शिक्षणाला ठेवायचा काळही नव्हता तो. तीन भाऊ मात्र दहावी पर्यंत शिकले, शेजारच्या गावी जाऊन. कधी चालत तर कधी सायकलने. अशातच राजीला जवळच्याच गावातुन मागणी आली. देशमुख घराणे मोठे होते आणि शेतीवाडीही खुप होती. म्हणजे जवळ जवळ शंभर एकर शेती अन तीही बागायती. बर माणसेही चांगली होती. मुलगा दिसायला अगदी राजबिंडा होता. बारावी पास होता. घरी आई वडील अजुन एक भाऊ आणि बहिण. बर बहिणीचेही लग्नाचे वय झाले होते म्हणजे तीही यथावकाश लग्न होऊन सासरी जाणार. म्हणजे घरात माणसेही फ़ार नाहीत. त्यामुळे या घरी राजीला द्यायला घरच्या कुणाचीही हरकत नव्हती. आपली पोर सुखात नांदेल तिथे हा विचार करुन राजीच्या लग्नाचे पक्के करुनच तिचे आई वडिल आणि मोठा भाऊ घरी आले. लग्नात पायातल्या जोडवी पासुन ते माथ्यावरच्या बिंदीपर्यंतच्या सर्व सोन्याच्या दागिन्यांनी राजी नुसती मढली होती. लक्ष्मीसारखी दिसत होती. स्वताच्याच भाग्याचा तिला हेवा वाटत होता. शंकरही वरवेषात अजुनच रुबाबदार दिसत होता जणु गावचा राजाच. अर्थात ते खरही होतं म्हणा. पैसा असल्याने म्हणा किंवा इतर कशानेही गावात देशमुख घराणे वरचढच होते. लग्न होऊन देशमुखांच्या घराच्या उंबर्यावरचे माप ओलांडुन राजलक्ष्मी देशमुख वाड्यात आली. लवकरच आपल्या स्वभावाने तिने सार्यांनाच जिंकुन घेतले.
इकडे तिच्या माहेरी आता वडिलांनाही कष्टाचे काम जमत नव्हते. बर जमीनही चांगली पाणस्थळ होती त्यामुळे जरा कष्ट घेतले की पिकपाणी चांगले यायचे त्यावर वर्षभर गुजराण चालायची. हळु हळु तीनही भावंडे शेतीच करायला लागली. नवे नवे प्रयोग करु लागली. पिकपाणे उत्तम येउ लागले. पैसा अडका गाठीला बांधुन अजुन जमीन विकत घेतली. परिस्थिती पालटु लागली. राजी माहेरी यायची तेव्हा आपल्या माहेरचे पालटत चाललेले रुप पाहुन सुखावुन जायची. आता तिनही भावांच्या बायकाही होत्याच. कधी कधी सार्या बहिणी आपापल्या पिल्लाना घेउन माहेरी यायच्या. प्रत्येकीची २/३ कच्चीबच्ची. घर म्हणजे अक्षरशः गोकुळ वाटायचे. राजीलाही यथावकाश तीन मुले झाली. मोठा मुलगा आणि त्याच्या पाठीवर दोन मुली. सारे कसे सुखात चालले होते. दरम्यान राजेशचे शंकरच्या लहान भावाचे आणि सुमनचेही लग्न झाले. दोघांच्या संसारवेलीवर अनुक्रमे दोन आणि एक अशी फ़ुले उमललेली होती.
" आई ग अग कुठे तंद्री लागलीय तुझी केव्हाचा हाका मारतोय मी. " इती गणेश.
" अरे तु केव्हा आलास रे शाळेतुन? अन मिनी कुठाय? "
" अग ती आत आहे वाढुन घेतेय. तु जेवलीस का? आणि चंदाने काय खाल्ले? आज सकाळी डब्यात तर कसलेच पिठ नव्हते ना तांदळाचा एकही कण नव्हता."
" थांब जरा ज्वारीच्या पिठाचे आंबील करते ते खा तुम्ही दोघे. मी आज्जीला खायला घालते अन येते. सकाळी दादुनी डबा पाठवला त्याच्या मुलाकडुन. ती बायजा सारखं काही न काही देते म्हणुन बरं आहे पण...... "
" आई माहितेय मला तुला नाही आवडत ते. पण मी पण दुकानात लिखाण करुन देतो त्याचे पैसे जास्त नाही मिळत मग काय करणार. आणि बाबा कुठे आहेत ग ? गेले का नेहमीप्रमाणे? आज काय नेलय घरातनं??? "
" ..................... "
" आई तु अशीच नेहमी गप्प बसत जा. बाबांना काही समजाव नं."
" अरे शुद्धीत असतात तेव्हा समजावते तेव्हा घेतात न समजुन पण बाहेर गेले की ये रे माझ्या मागल्या. मी पण कंटाळलेय आता. पण तुम्हा तिघांकडे बघुन ..... " राजीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या.
" आई ग तु नको ना रडु. जरा काही दिवस थांब मी चांगला शिकेन मोठा होईन तुला कशाला काही कमी पडणार नाही बघ. "
" माझं सोनं ग ते " असे म्हणत राजीने गणेशची अलाबला घेतली अन ती उठलीच. गणेश आणि मिनीला वाढुन एकीकडे दादुने पाठवलेल्या ज्वारीच्या पिठाचे आंबील केले. यशोदा आज्जीला आंबील खायला घालुन माजघरात येउन ती जरा झोपायचे म्हणुन आडवी झाली. पण डोळा कुठला लागायला. परत तिचा जिवनपट हळु हळु डोळ्यासमोर येउ लागला.
चंदाचा जन्म झाला अन तिचे रुपडे पाहुन शंकर आणि राजी दोघेही हरकुन गेले. साक्षात दुसरी राजीच. चंदाच्या बाळलिलांनी घर परत एकदा हरकुन गेले. चंदाचा पहिला वाढदिवस मोठा करायचा असे सार्याच देखमुख कुटूंबाने ठरवले. सगळीकडे आमंत्रणं गेली. शेतावरच्या घरात वाढदिवस करायचा असे ठरले. मस्त फ़र्मास बेत होता. शहरातुन आचारी बोलवला होता. जवळ जवळ सर्व गावाला आमंत्रण होते असे म्हणले तरी चालेल. सगळे येउन गेले. अगदी राजीच्या माहेरची पण येउन गेली. राजीचे आई आणी वडील मात्र त्या रात्री थांबले. शेतावरच सर्वांची जेवणे झाल्यावर सगळे गावातील वाड्यात जायला निघाले. शंकर आणि त्याचे काही मित्र मागे थांबले होते. त्याने राजीला सांगितले तुम्ही सगळे जा वाड्यावर मी आज इथेच मुक्कामाला राहतो माझे मित्रही आहेत मुक्कामाला. त्यांना जरा वेगळी पार्टी हवीय त्याची व्यवस्था केलीय मी. राजीही लगेच तयार झाली. कारण आपल्या नवर्याला ती चांगलीच ओळखत होती. काही झाले तरी वेडवाकडं काही करणार नाही याची खात्री होती त्यामुळे ती बिनधास्त वाड्यावर निघाली. आणि तसही शंकरचा मुक्काम बरेचदा शेतावरच्या घरात असायचा. आक्षेपार्ह वागणं कधीही नसायचे त्याचे.
सकाळचे नऊ वाजले तरी शंकर वाड्यावर आला नव्हता. असे आजवर कधीच घडले नव्हते. रात्री कितीही उशीर झाला तरी पहाटे पाचला शंकर उठायचाच. उठुन जोरबैठका मारुन घामाघुम झाल्यावर बाहेरच्या झोपाळ्यावर निवांत बसलेला असायचा थोडावेळ. मग सकाळची आन्हिके आवरुन पुजा पाठ करुन मग एक तांब्याभर निरसे दुध प्यायचा. पेपर वाचुन मग गावात फ़ेरफ़टका मारुन तसच शेतावर जाऊन दुपारी दोन वाजता जेवायलाच घरी यायचा. अगदी शेतावर मुक्कामाला गेला तरी त्याच्या सकाळच्या या दिनचर्येत काहीही फ़रक पडला नव्हता. लग्नानंतरच्या एवढ्या वर्षात प्रथमच हे असे घडले होते. उगाचच मनात कुठेतली पाल चुकचुकायला लागली. अकरा वाजत आले तशी राजीची अवस्था केविलवाणी झाली. शंकरचे आई वडिल पण काळजीत पडले. राजेश शंकरचा भाऊ आता मात्र शंकरला बघायला बाहेर पडला. राजेशची बायको मनिषा आणि वाढदिवसाच्या निमित्ताने आलेली सुमन राजीला धीर देत होते. तासभर गेला असेल नसेल राजेशची जीप दारात उभी राहिली. मागे शेतावरचा एक गडी शंकरला धरुन बसला होता. राजीच्या छातीस धस्स झाले. काय वाढुन ठेवलेय पुढ्यात तिला काही समजेना. ती वार्याच्या वेगाने जीपकडे धावली. राजेशने तिला शांत केले म्हणाला, " वहिनी काळजी करु नका, दादा अती दारु पिल्याने बेशुद्ध आहे. बाकी काहीही झालेले नाहीय." आपला नवरा दारु प्यायला हे समजल्यावर ती मटकन खालीच बसली. मनिषा आणि सुमनने तिला धीर देउन आत आणले. जरा पाणी प्यायला दिले. यशोदा एकदा तिच्याकडे अन एकदा आढ्याकडे बघत नुसतीच पडुन होती. अन तिच्याजवळ घरचे मोठे कारभारी विष्णुपंत हतबल होऊन बायकोकडे पहात बसलेले.
दुपारनंतर शंकर शुद्धीवर आला. त्याची त्यालाच लाज वाटायला लागली. उठुन बाथरुमात जाऊन उलट्या केल्या. आंघोळ करुन बाहेर आला तोपर्यंत सर्वजण माजघरात एकत्र आले होते. त्याने सर्वांची माफ़ी मागितली. पुन्हा असे होणार नाही. याची ग्वाही दिली. कुणीच काही बोलले नाही. राजीने सर्वांची पाने घेतली. सकाळपासुन लहान मुले सोडता कुणाच्याच पोटात अन्नाचा कण नव्हता. तरीही सारेजण उगाचच जेवायचे म्हणुन जेवले. झालेल्या प्रकाराने सर्वांचीच अन्नावरुन वासना उडाली होती. ताटावरुन उठुन शंकर खोलीत गेला. आणि बाकी सारेजण आपाप्ल्या खोलीत गेले. मागचे सारे आवरायला राजीला मदत करुन मनिषा आणि सुमनही आपापल्या खोलीत गेल्या. राजी मात्र स्वयंपाकघरात लहानग्या चंदाला घेउन तशीच बसली होती. झाल्या प्रकाराचा विचार करत. अशी कशी काय दारु प्यायची अवदसा आपल्या नवर्याला आठवली याचा विचार करुन करुन ति थकली अन बसल्या जागीच तिचा डोळा लागला.
कसल्याशा आवाजाने ती जागी झाली. पाहिले तर नुकतीच चालायला लागलेली चंदा स्वयंपाकघरातल्या कपाटाकडे गेली होती. त्या कपाटाला धरुन ती उभी रहात असताना काहीतरी पडले. अन त्या आवाजाने ती जागी झाली. चंदाला ती घेतच होती कडेवर तेवढ्यात चेहर्यावर अपराधी भाव असलेला शंकर तेवढ्यात तिथे आला. " राजी मला माफ़ कर ग. परत असे नाही होणार. मित्रांनी खुपच आग्रह केला ग म्हणुन अगदी घोटभर घेतली मी पण तेवढ्यानेही मला गरगरल्यासारखे झाले. अन मग त्यांनी मला कोल्डड्रींक्स मधुन पाजली ग. माझ्या नाही लक्षात आले ते."
" बर ठीक आहे. "
" नुसते ठीक आहे काय? रागव ग तु माझ्यावर. चिड माझ्यावर. पण अशी शांत नको बसुस. बोल न माझ्याशी. "
" काय बोलु मी? तुम्ही दारु पिलीत हा माझ्यावर एवढा मोठा आघात आहे की मी तो अजुनही पचवु शकत नाहीय. तरी बर माझे आई बाबा सकाळी पहिल्या गाडीने गावाकडे गेले. नाहीतर तुम्हाला असे पाहुन त्यांना काय वाटले असते अन त्यांच्यासमोर माझी काय अवस्था झाली असती याचा मी विचारच नाही करु शकत."
" हो ग राजी माझी चुक झाली मी मान्य करतो ग. खरच परत असे नाही होणार. "
राजीनेही त्याला मोकळ्या मनाने माफ़ करुन टाकले. परत सारे कसे छान चालु झाले. घडलेल्या या घटनेबद्दल परत कुणीही त्याला टोकले नव्हते. अन तो ही त्याचे नेहमीचे रुटीन पाळत होताच. राजेशही आपल्या नोकरीच्या गावी मनिषाला अन मुलांना घेऊन गेला आणि सुमनही आपल्या मुलांना घेऊन सासरी गेली. वर्षभर कसे अगदी काहीही न घडता सुरळीत गेले.
तसही विष्णुपंतांचा थोडा धाक होताच त्याला. त्यांची करारी करडी नजर शंकरवर होतीच. पण आज विष्णुपंत बाहेरुन आले तेच मुळी अगदी गलीतगात्र होऊन. परशा कायम त्यांच्याबरोबर असायचाच. परशाच्या आधाराने ते घरी आले. राजीला काही त्यांची लक्षणे ठीक दिसेनात. प्रचंड खोकत होते. अन अंग खुप कापत होते. चांगलीच हुडहुडी भरली होती. अंगात खुप ताप भरला होता. परशाला त्यांच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सांगुन ती बाहेर आली. गणेशला आजीला बोलवायला देवळात पाठवले. आणि शेजारच्या महादुला शेतावर शंकरला बोलवायला पाठवले. घरच्या फ़ोनवरुन गावातल्या डॉक्टरना फ़ोन केला आणि त्यांना ताबडतोब घरी यायला सांगितले. दहा पंधरा मिनीटात डॉक्टर आलेच. अन त्यांच्या पाठोपाठ यशोदा आज्जी आणि शंकरही आले. डॉक्टर विष्णुपंतांना तपासत होते. त्यांच्या चेहर्यावर चिंतीत भाव होते पण तरी फ़ार काही काळजी करण्यासारखी परिस्थिती नाहीय असे वाटत होते. एक इंजेक्षन देऊन आणि स्वताजवळची औषधे दिली. तसेच मेडीकलमधुन आणायची औषधेही लिहुन दिली. कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवणे चालु ठेवा असे सांगुन ते निघाले. शंकर त्यांच्याबरोबर बाहेर आला. त्याने वडिलांच्या तब्बेतीबद्दल विचारणा केली. जरा काळजीतच होता तो. " अरे शंकर नको काळजी करु. आत्ता तरी साधा ताप वाटत आहे. आपण उद्यापर्यंत पाहु अन मग काय करायचे ते ठरवु. मी दिलेल्या इंजेक्षन आणि औषधाने ताप उतरायला हवा आहे. बघु उद्या मी सकाळी परत येतो."
तो दिवस सगळा काळजीतच गेला सर्वांचा. उपाशी रहायचे नाही म्हणुन सर्वांनी थोडे जेउन घेतले पण जेवणात कुणाचेच मन लागत नव्हते. ताप काही उतरत नव्हता. कुणी ना कुणी त्यांच्याजवळ बसुन कपाळावरच्या पट्ट्या बदलत होतेच. यशोदा आज्जीने तांदळाजी पेज थोडी थोडी चमच्याने भरवली पण अर्धी वाटी पेज फ़क्त पोटात गेली. ताप काही अजुनही कमी होत नव्हता पण तरीही ते चांगले शुद्धीत होते. सर्वांशी बोलत होते हळु हळु. पण तरीही सारेजण काळजीतच होते. रात्री आठच्या दरम्यान विष्णुपंतांनी परत एक वाटीभर पेज पिली. त्यानंतर त्यांना चांगली तरतरी आली. थोडे तक्क्याला टेकुन त्यांना शंकरने बसवले. घरातील लहान मोठी सगळीच त्यांच्याजवळ येऊन बसली. त्यांनाही सर्वांना पाहुन बरे वाटले. " शंकर उद्या जरा जरा राजेश आणि सुमनला बोलवुन घेतोस? अन येताना मुलांनाही घेउन या म्हणावे. " त्यावर शंकर म्हणाला, " बाबा आत्ताच फ़ोन करतो अन उद्या सकाळी यायला सांगतो." त्याने राजेशला फ़ोन करुन मनिषा अन मुलांना घेउन ये बाबा वाट पहात आहेत. जरा बरे वाटत नाहीय. असा फ़ोन केला अन येताना वाटेत थांबुन सुमनला अन भावजींना मुलांसहीत घेउन ये सांगितले. त्यावर राजेश काळजीत पडला. " का रे दादा काय झालय बाबांना? काही काळजीचे कारण आहे का?" " नाही रे आज सकाळपासुन ताप अन खोकला अचानकच चालु झाला. डॉक्टर येउन गेले. काळजीचे कारण नाही म्हणाले पण ताप मात्र अजुनही उतरला नाहीय. पण सकालपासुन अगदी मलुल होते ते आत्ता जरा उठुन बसलेत अन जरा जरा बोलत आहेत. तेच म्हणाले तुला अन सुमनला उद्या येउन जायला सांग. म्हणुन फ़ोन केला. अन नको काळजी करुस तु. उद्या मात्र लवकर निघा सगळे अन नाश्त्याला इकडेच या. मी सुमनला फ़ोन करुन सांगतोच. "
" ओके ठिक आहे. तसच काही वाटलं तर मला ताबडतोब फ़ोन कर. मी येतोच सकाळी सगळ्यांना घेउन. बाय... "
" बाय. "
रात्री जेउन सारी बच्चेकंपनी झोपली. आळीपाळीने यशोदा आज्जी, शंकर, राजी असे विष्णुपंतांजवळ बसुन होते. परशाही बाहेर पडवीत जागाच होता. त्याचे लहानपण सारे देशमुखांच्या वाड्यातच गेले होते. विष्णुपंत आणि परशा यांच्या वयात दहा बारा वर्षाचे अंतर होते. आणि परशाचे लग्नही विष्णुपंतांच्या वडिलांनीच लावुन देऊन वाड्यातीलच बाजुच्या दोन खोल्या त्यांना रहायला दिल्या होत्या. तो अन त्याची बायको रखमा तिथेच रहात होते. अन त्यांचा मुलगा सुन परगावी नोकरीच्या ठिकाणी. बराच काळ एकत्र असल्याने विष्णुपंत आणि परशा यांच्यात मालक नोकर हे नाते नव्हतेच. तो त्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानायचा. त्यांचा सल्ला घ्यायचा आणि तो अमलातही आणायचा. दोघांचाही एकमेकांवर खुप जीव होता. विष्णुपंत आजारी पडल्यापासुन त्यालाही चैन पडत नव्हते. सकाळपासुन त्यानेही काही खाल्ले नव्हते. मधुनच उठुन तो त्यांच्या रुममधे येउन चक्कर मारुन जात होता. आपल्या नवर्याची अवस्था रखमाही जाणुन होती. रात्री मात्र तिने आपल्या नवर्याला जबरदस्तीने चार घास खाऊ घातलेच.
काहीही विपरीत न घडता रात्र तर पार पडली. पण ताप मात्र उतरायच्या ऐवजी चढायलाच लागला. पहाटे पहाटे पाचला मात्र तापामुळे ते ग्लानीत जायला लागले. आणि त्या ग्लानीत काही काही बोलायला लागले. काय करावे कुणालाच काही सुचेना. एवढ्या पहाटे दवाखान्यात तरी कसे न्यायचे? अन डॉक्टरला बोलवावे की नको अशा विवंचनेत शंकर असतानाच परशा डॉक्टरला घेउनच आला. डॉक्टरनी तपासले अन त्यांच्या चेहर्यावर काळजी दिसु लागली. ताप चांगलाच चढला होता. त्यांनी परत एक इंजेक्षन दिले. मात्र ते तिथेच थांबतो म्हणाले. इंजेक्षनचा काय परिणाम होतोय ते पाहुन आपण पुढचा निर्णय घेउ म्हणाले. एव्हाना सात वाजत आले होते. राजेशचा निघाल्याचा फ़ोन सहाला आलाच होता. तासाभरात तो पोचेलच. त्यामुळे त्याला फ़ोनवर काही सांगितले नाही.
साडेसात वाजले आणि दारात गाडी उभी राहिली. परशा गाडीतले सामान काढायला लागला. मुले गाडीतुन उतरुन आत आली अन चंदा मिनी बरोबर त्यांची मस्ती चालु झाली. लहानच असल्याने परिस्थितीचे गांभिर्य त्यांना कुठले समजायला. एकटा गणेशच काय तो थोडा कळता सवरता होता. राजेश मनिषा सुमन आणि तिचा नवरा सतीष सारेच विष्णुपंतांच्या खोलीकडे गेले. एकाच दिवसात त्यांच्या चेहर्यावरची रया गेली होती. राजेश अन सुमनने त्यांच्या दोन्ही बाजुला बसत त्यांना हाक मारली. त्यांची काहीच हालचाल नाही. दोघेही अगदी कावरे बावरे झाले. त्यातल्या त्यात सुमन तर जास्तच. अगदीच रडवेली झाली ती. एकुलती एक कन्या असल्याने सार्यांचाच तिच्यावर खुप जिव होता. आणि विष्णुपंतांचा तर जास्तच. बापलेकीचे नातेच जगावेगळे. डॉक्टरनी सर्वांनाच शांत रहायला सांगितले. मगाशीच इंजेक्षन दिलेय, त्यामुळे थोडा फ़रक आहे. पण अजुन अर्ध्या तासाच चांगला फ़रक व्हायला हवाय. तेव्हा तुम्ही जरा शांत रहा. काही काळजी करु नका.
अर्ध्या तासाचा तास गेला आणि त्यांनी जरा डोळे किलकिले केले. समोर अस्पष्ट असे दिसणारे चेहरे हळु हळु नीट दिसु लागले. समोर उभ्या असलेल्या शंकरच्या एका बाजुला राजेश आणि दुसर्या बाजुला सुमन आणि सुमच्या शेजारी यशोदेला पाहताच त्यांच्या चेहर्यावर हलकेसे स्मित उमटले. ते उठायचा प्रयत्न करु लागले. पण डॉक्टर होतेच जवळ त्यांनी त्यांना उठु दिले नाही. पुर्णतः झोपुनच रहायला सांगितले. एव्हाना सारी नातवंडेही जवळ आली होती. त्यांना पडलेला फ़रक बघता डॉक्टर जुजबी सुचना देऊन निघाले. राजीने तोवर तांदळाची पेज करुन आणली होती. ती गरम गरम पेज सुमनच्या हातुन खाल्ली. आणि औषध घेउन ते परत झोपले. आता ताण कमी झाला होता. बाकीच्यांनीही नाश्ता करुन घेतला. राजी आणि मनिषा दुपारच्या स्वैपाकाला लागल्या. स्वैपाक झाल्या झाल्या बच्चेकंपनीला आणि यशोदा आज्जीला वाढुन त्यांची जेवणे उरकुन घेतली. सुमन परत एकदा वडिलांसाठी रव्याची खीर घेउन गेली. ती खाऊन विष्णुपंत नातवंडाशी बसल्या बसल्या गप्पा मारु लागले. इकडे बाकी सारे जेवायला बसले. जेवताना वडिलांचा अचानक आलेला ताप, त्यांची एका दिवसातच डाऊन झालेली तब्बेत हाच विषय होता. तर तिकडे यशोदा नवर्याच्या शेजारी बसुन नातवंडाची बडबड ऐकत सुखावुन जात होती. चंदा सर्वात लहान असल्याने ती हट्ट करुन आजोबांच्या मांडीवर बसली. तर मिनी गणेश आणि सुमनची लतिका आणि राजेशचा आर्य आणि मनवा हे आजी आजोबांच्या आजुबाजुला बसत काही गमती जमती ऐकवत होती. मधेच काही हत्ती मुंगीचे विनोद ऐकवुन आजी आजोबा आणि इतरांना ऐकवत होती. परशा आणि रखमाही जेवण करुन तिथे खोलीत येउन बसले होते. सारे कसे छान चाललय असच अगदी. शंकर, राजेश आणि सतीष जेवण करुन अन राजी, मनिषा आणि सुमन मागचे सारे आवरुन विष्णुपंतांच्या खोलीत आले. त्यांनी आपल्या सार्या परिवारावर सुखाने नजर टाकली. एवढ्यात राजेशला काय वाटले कुणास ठाउक त्याने पटकन आपल्या मोबाईलवर आई वडील आणि नातवंडे असा एक फ़ोटो काढला. मग काय सगळेच फ़ोटोसाठी पुढे झाले. दोन्ही सुनांबरोबर वेगळा, तीनही मुलांबरोबर वेगळा अगदी परशा आणि रखमा बरोबर पण फ़ोटो काढला. सुख सुख म्हणतात ते अजुन काय ? असे त्यांना वाटुन गेले.
चला रे मुलांनो आता आजोबांना विश्रांती घेउ द्या बरे म्हणत राजी अन मनिषाने मुलांना बाहेर नेले. शंकर आणि राजेशने त्यांना व्यवस्थित झोपवुन अंगावर पांघरुण घातले. अन ते पण बाहेर आहे. सुमन आईबरोबर बोलत बसली हलक्या आवाजात. त्यांच्या गप्पा ऐकता ऐकता विष्णुपंत झोपी गेले. चार वाजता त्यांना परत खीर अथवा पेज काय आणु हे विचारण्यासाठी म्हणुन सुमन उठवायला गेली. तिने हाक मारली. पण ते काहीच प्रतिसाद देईनात. चांगलीच गाढ झोप लागलेली दिसतेय थोड्यावेळाने उठवु म्हणत ती परत बाहेर आली. मुले बाहेर झोपाळ्यावर आजीजवळ गोष्ट ऐकत होती. ती पण बसली तिथे आपले बालपण आठवत. अर्धा तास गेला असेल नसेल तोच मुलांनी भुक भुक चालु केले. त्यांना काहीतरी करुन द्यावे आणि वडिलांनाही गरम गरम काही द्यावे म्हणुन आपल्या वहिनीसोबत सुमन स्वैपाकघरात गेली. राजीने एकीकडे तांदळाची उकड बनवली मुलांसाठी आणि फ़ार विचार न करता सुमनने थोडीशी पेज बनवली. ती घेउन ती वडिलांच्या खोलीत गेली. अजुनही वडील उठले नसल्याचे तिने पाहिले. मग तिने त्यांना हलवुन उठवायचे ठरवले. पेज बाजुच्या टेबलवर ठेवली. आणि ती वडिलांना उठवु लागली. " बाबा चार वाजुन गेलेत, उठा बरे जरा, पेज घ्या म्हणजे औषधे घ्यायला बरे." पण छे ते काही उठेनात. त्यांच्या कपाळावर हात ठेवला तिने अन ती चरकलीच जरा. कपाळ अगदी गार लागत होते. तिने हाकांचा सपाटा लावला.... आई, दादा, राजेश, वहिनी लवकर या. बाबा उठत नाहीत बघा." अन ती रडुच लागली. परशा सहीत सारेच धावत त्या खोलीत आले. सारेच अगदी कळवळुन हाका मारु लागले. पण ओ द्यायला ते होते कुठे? त्यांचे प्राण तर कुडी सोडुन केव्हाच गेले होते. मुलेही आली खोलीत अन आबा उठा की तुम्ही गोष्ट सांगणार आहात ना? उठा न पटकन असे म्हणु लागली. डॉक्टरही फ़ोन केल्यावर दहा मिनीटात हजर झाले. त्यांनी चेक केले अन आय अॅम सॉरी ते आता या जगात नाहीत असे म्हणत शंकर अन राजेशच्या खांद्यावर थोपटत बाहेर गेले.
कुणाचाच विश्वास बसत नव्हता की थोड्यावेळापुर्वी हसत खेळत बोलणारी व्यक्ती आत्ता आपल्यात नाहीय. घरात एकच हलक्ल्लोळ माजला. कोण कुणाला सावरायचे समजत नव्हते. गणेश सोडता सारी चिल्लीपिल्ली आपापल्या आईला चिकटली होती अन भेदरुन सारे पहात होती. एकटे आबा फ़क्त शांत दिसत होते. हळु हळु सर्वांना विष्णुपंत गेल्याची बातमी सर्वांना समजु लागली. जसे समजेल तसे एक एक जण येत येत सारा गाव लोटला. नाही म्हणलं तरी विष्णुपंत देशमुख गावातले बडे प्रस्थ होते. आणि नुसतेच बडे नाही तर गावातील सर्वांना कशाच्या ना कशाच्या रुपाने त्यांनी मदतही केली होती. सर्वांच्या दर्शनासाठी विष्णुपंतांचा देह बाहेर ओसरीवर आणुन ठेवला. लोकांची रिघ लागली होती. तासा दोन तासातच राजी आणि मनिषाच्या माहेरचे आणि सुमनच्या सासरचे लोक आले. यशोदाआजीचा एक मोठा भाऊ होता पण तो ही थकला होता आणि हिंडु फ़िरु शकत नसल्याने त्याचा मुलगा आणि सुन आले. सारे आलेच आहेत तर आता थांबण्यात काही अर्थ नाही असा विचार करुन बुजुर्ग मंडळींनी पुढाकार घेऊन पुढील सारी व्यवस्था केली आणि पुढच्या तासाभरात विष्णुपंत देहरुपाने पण या जगात राहिले नाहीत. यशोदा आज्जीला कल्पना आली होती की न कळे पण ती सर्वांसमोर तरी शांत होती. उठुन बाथरुममधे जाऊन तिने दार लावुन घेतले. सौभाग्यालंकारातील मंगळसुत्र कुणी काढले गळ्यातले ते समजले नाही तिला पण कपाळावरची कुंकवाची चिरी डोक्यावर पडणार्या पाण्यात मिसळुन जात दिसेनाशी झाली. आणि त्याचबरोबर डोळ्यातले अश्रु पण. तिने मनाशी काही ठरवले आणि ती बाहेर आली. बाहेर आल्यावर कुणीतरी पांढरे पातळ पुढे केले. ते नाकारुन ती तशीच ओलेत्याने आपल्या खोलीत आली आणि दरवाजा लावुन घेतला. राजी घाबरली. मनिषा अजुनही एकीकडे सुमनला सावरता सावरता मुलांकडे बघत होती. राजी आपल्या सासुच्या मागोमाग आली. पण दरवाजा आतुन बंद होता. तिने हाका मारल्या पण आतुन काहीही प्रतिसाद आला नाही. आता बोलवावे कुणाला? कारण सारी पुरुषमंडळी तर घाटावर स्मशानात गेली होती. काय करावे हा विचार करतच होती तोवर यशोदा आज्जी बाहेर आली. एकदम शांत. त्यांचे पांढरे कपाळ अन मोकळ्या गळयाकडे पहावत नव्हते. नकळतच तिच्या डोळ्यातुन अश्रु येउ लागले. आज्जी म्हणाली, " राजी मोठी न तु घरची? तुच असे केलेस तर बाकीच्यांना कोण सावरणार ग? माझे दुःख तर डोंगराएवढे आहे ग. माझी इतक्या वर्षाची साथ सोबत अचानक एक दोन दिवसात संपली. पण मला रडुन नाही चालणार ग. मीच रडत बसले तर शंकर, राजेश अन सुमन कडे कोण पाहील? मला तुझी साथ हवीय या सर्वांना सावरायला. देशील न मला साथ? " डोळे पुसत राजीने होकार दिला.
" आई तु आंबील केले आहेस? मला दे न जरा आंबील. आई ए आई. " चंदा केव्हाची हाका मारत होती. ती भानावर आली आणि तिने चंदाला जवळ घेतले. " चंदा रागवलीस का ग माझ्यावर मी सकाळी तुला ओरडले म्हणुन? " " नाही ग आई. तु रागवलीस म्हणुन तर मी दादु आबा कडे गेले. अन मी गेले म्हणुन तर किसनाने डबा आणुन दिला अन मी काही खाऊ शकले न? " " किती शहाणी ग माझी बाय ती. " म्हणत राजीने चंदाची अलाबला घेतली. " पण आई असं किती दिवस आणायचं ग पीठ दादुआबा कडुन? मला नै आवडत. आणि तिथे कोण असेल ना तर कसे बघत असतात माहितेय तुला? " तिच्या केसातुन हात फ़िरवत राझी म्हणाली," हो ग बाळा, माहितेय मला. पण काय करु ग नाईलाज आहे माझा. या गावात मला काम पण नाहीय काही. आणि दुसर्या गावात जायचं म्हणजे रहायची सोय करण्यापासुन सगळच ग. पण बाळा जातील हे दिवस पण. भाऊ मोठा झाला न की सारे काही नीट होईल." पाच सहा वर्षाची चंदा परिस्थितीमुळे वयाच्या मानाने खुपच शहाणी झाली होती. मिनी आता सहावीत होती अन गणेश दहावीला होता. तिघही अभ्यासात हुशार होतेच. शाळेत शिकवताना होणारा अभ्यास आणि शाळेतील गुरुजी आणि बाईंनी पुस्तक वह्या बाबतीत केलेले सहाय्य आणि गणेशला मिळणारी स्कॉलरशीप यावर कसे बसे तिघांचे शालेय शिक्षण चालु होते. त्याला काही खिळ बसली नव्हती. पण नुसते तेच असे नाहीना. प्रपंचाला काय लागत नाही? घर स्वताचे असल्यामुळे निवारा होता. पण अन्न आणि वस्त्र याचे काय ? शंकर, राजी आणि यशोदा यांचे फ़ार काही अडले नाही कारण चांगली परिस्थिती असताना भरपुर कपडालत्ता होता. तोच आजवर जपुन जपुन वापरणे चालु होते. प्रश्न होता तो चंदा मिनी आणि गणेशचा. कारण वयानुसार अंगही वाढत होते त्यामुळे असलेले कपडे जोवर बसत होते तोवर काही प्रॉब्लेम नव्हता. पण नंतर? राजीच्या बहिणीं मात्र सणावाराच्या निमित्ताने मुलांना कपडे घेत होत्या. राजीचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही या पद्धतीने. मुलांसाठी ते मात्र राजीने मान्य केले पण इतर कसलीही मदत मात्र तिने घेतली नाही. सासुला पण ते आवडल नसतं याची तिला खात्री होती.
दुपारचे तीन वाजले असतील यशोदा आज्जीने आतुन हाक मारल्यावर ती आत गेली. सासुला उठवुन बसत ती म्हणाली, " काही आणु का करुन तुम्हाला? " " नको ग राजी. खुप करतेय तु. अगदी कोंड्याचा मांडा करणे म्हणजे काय ते तुझ्याकडुन शिकावे बघ. पण माझ्या तोंडाला चवच नाहीय ग. माझा हा तापही यांचासारखाच मलाही नेतो की काय असे वाटु लागलेय मला. अन नेले तर बरेच होईल एक तोंड तरी कमी होईल ग खायचे. " " आई.......!!!! असे नका म्हणु हो तुम्ही. तुमच्या जिवावरच तर हा सगळा भार मी पेलतेय. तुम्ही गेलात तर मी मोडुन पडेन हो. " असे म्हणत राजी त्यांच्या अधिकच जवळ गेली. आणि गळामिठी घातली. आपल्या सासुचे अंग अजुनच तापलेय हे तिला जाणवले. अन तिने गणेशला डॉक्टरकडे पाठवले. त्याच्याबरोबर डॉक्टर आले आणि तपासुन त्यांनी औषध दिले आणि म्हणाले, " काळजी नका करु उद्या त्या खडखडीत बर्या होतील. " त्यांच्याबरोबर राजी बाहेर आली तिने काळजीने विचारले सासुच्या तब्बेतीबाबत आणि पैशाबाबत तेव्हा डॉक्टर म्हणाले, " वहिनी, काकु होतील बर्या नका काळजी करु. साधा ताप आहे. आणि पैशाचे म्हणाल तर मी तुमच्याकडून पैसे घेतले तर नरकात पण जागा नाही मिळायची मला. माझ्यावर तुमच्या घराण्याचे खुप उपकार आहेत हो. बर मी निघतो आता. उद्या सकाळी दवाखान्यात जाण्यापुर्वी परत येतो. त्यांना हलकाच आहार द्या सध्यातरी. "
राजीने परत एकदा थोड्डेसे आंबील करुन सासुला खायला घातले. गोळ्या दिल्या. मुलांना अभ्यास करायला सांगुन ती सासु शेजारीच आडवी झाली जरा. पण आज झोप रुसलीच होती तिच्यावर......
सासरे गेल्यावर सासुच्या मदतीने राजीने सर्वांनाच सावरले. म्हणजे किमान सावरल्यासारखे वाटत तरी होते सारे. विष्णुपंतांचे दिवसकार्य झाल्यावर सारेच आपापल्या घरी निघाले. निघताना सुमन आणि राजेश आईच्या गळ्यात पडुन खुप रडले. वारंवार आई काळजी घे असे म्हणत होते. वहिनीला म्हणजेच राजीलाही काळजी घेण्याबाबत सारखे सांगत होते. एकाच गाडीने सारे निघाले. निघेपर्यंतच तीन वाजले. आणि नाही म्हणले तरी नुकतीच घडलेली घटना सर्वांच्याच मनात अजुनही घोटाळत होतीच. तेच विचार मनात चालु होतेच. गाडीत सारेच शांत होते. राजेश गाडी चालवत होता. एवढा घाट ओलांडला की सुमनला तिच्या घरी सोडुन पुढे जायचे या विचारांच्या नादात एका वळणावर समोरुन आलेला भरधाव ट्रक राजेशला कळलाच नाही. अन कळेपर्यंत वेळ निघुन गेली होती. ट्रकने कारला एवढी जोरात धडक दिली की त्या छोट्याशा घाटातुन कार जी खाली दरीत फ़ेकली गेली की कुणालाच काही समजायच्या आतच होत्याचे नव्हते झाले. गाडीतले पेट्रोल सांडुन त्याने पेट घेतला परिणामी गाडीही पेटली. बर फ़ार मोठ्या रहदारीचा रस्ता नसल्याने घडलेली घटना पटकन समजलीच नाही कुणाला. ट्रक ड्रायव्हर तर ट्रक घेउन लगेचच पळुन गेला. खाली कसली आग आहे हे पहायला काही वाहने थांबली असता रस्त्यावरच्या खाणाखुणांवरुन ट्रकने एखाद्या छोट्या वाहनाला जोरात धडक दिली असावी अशी शंका वजा खात्री जमलेल्या लोकांनी व्यक्त केली. मदतीला जावे तर पेट घेतलेल्या गाडीवरुन कुणी वाचले असायची शक्यता फ़ारच कमी होती. अन खाली जाणे तसही खुप रिस्की होते. तेवढ्यात कुणीतरी इमर्जन्सी नंबर डायल करुन घडलेली घटना कळवली. अर्ध्या तासातच पोलीस व्हॅन एका अॅम्ब्युलन्स सहीत तेथे आली. एकंदरीत परिस्थिती पाहता कुणीही वाचले असायची शक्यता फ़ारच कमी होती. आणि पोलीसांची आणलेली कुमकही कमी होती. एव्हाना आजु बाजुच्या छोट्या गावात अपघाताची बातमी पसरली होतीच. त्यामुळे तेथील उत्साही तरुण मंडळी आपापल्या गाड्या घेउन अपघातस्थळी दाखल झाली होतीच. त्यांची मदत घेउन खाली उतरायचे असा विचार पोलीस करत होते. पण अजुनही मदत हवीच होती. अग्नीशामक गाडीही बोलवावी लागणार होती. तर अशी सर्वांची मदत घेउन पोलीस काही तरुणांना घेउन खाली उतरु लागले. तोपर्यंत अग्नीशामक गाडीही तेथे दाखल झाली. सर्व जण योग्य ती काळजी घेऊनच गाडीजवळ जात होते. पाणी मारुन आग पुर्णतः विझवली. थोड्याच वेळात अंधार पडायला सुरुवात झोणार होती त्यामुळे जे काही करायचे ते तातडीने करावे लागणार होते. गाडीचा नंबर कळुन येत नव्हता. आणि गाडी जवळजवळ ७० ते ८० टक्के जळाली होती त्यामुळे आत किती लोक असावेत आणि कोण असावेत याचा काहीच अंदाज येत नव्हता. एवढ्यात बाजुला कुणीतरी कण्हल्यासारखा आवाज आला. तो आवाज एका तरुणाने ऐकला अन तो त्या दिशेने निघाला. बाजुच्या झुडुपात एक लहान मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत पडली होती. खर म्हणजे ती जिथे पडली होती त्यावरुन ती वाचली कशी याचेच आश्चर्य वाटत होते. तिला तेथुन अलगद बाहेर काढले ती पटकन काका म्हणत त्याला बिलगली आणि बेशुद्ध झाली. तिला तातडीने वर आणुन दवाखान्यात पोचवायची व्यवस्था केली. तेथील बाकीचे सारे सोपस्कार आवरुन पोलीसही अर्धवट जळालेल्या डेडबॉडीज घेउन सरकारी दवाखान्यात गेले. मुलगी शुद्धीवर आल्याखेरीज काहीही समजणार नव्हते.
राजेशचा फ़ोन कसा काय लागत नाही अथवा कुणीही पोहोचल्याचा फ़ोन कसा केला नाही यावरुन सारेच काळजीत होते. राजी आणि तिची सासु सारखे आत बाहेर हेलपाटे घालत काय लागला का फ़ोन असे शंकरला विचारत होत्या. पण छे फ़ोन जणु रुसलाच होता. त्यात रात्री आठच्या दरम्यान जवळच्या घाटात अपघात झालेले समजल्यापासुन कुणाचाच जिव थार्यावर नव्हता. वाट पाहुन शेवटी सारेजण चार घास खाऊन घेउ म्हणत जेवायला बसले. जेवण झाल्यावर परत एकदा फ़ोन लावुन पाहिला तर लागतच नव्हता. सुमन घरी पोचली असेल म्हणुन तिच्या घरीही फ़ोन लावला तर तोही कोणी उचलत नव्हते. शेवटी कंटाळुन सारेच झोपी गेले. रात्री बारा वाजुन गेल्यावर दरवाजाची कडी वाजली अन राजीच्या आणि अशोदा आज्जीच्या काळजात धस्स झाले. शंकर आणि मुले मात्र झोपली होती. तिने शंकरला उठवले आणि दाराची कडी वाजत असल्याने सांगितले. शंकरने उठुन दरवाजा उघडला तर दारात पोलीसांना बघुन तो चांगलाच हबकला. यशोदा आणि राजी आता काय पुढ्यात वाढुन ठेवलय या विचाराने मटकन खालीच बसल्या. " शंकर तुम्हाला जरा पोलीस चौकीत आणि दवाखान्यात यावे लागेल." असे पोलीसांनी म्हणताच शंकर जामच घाबरला. " क काय सा साहेब क काय झालय? " शंकर घाबरुनच त त प प करु लागला. त्याला बोलायचे काही सुधरेना. राजी पुढे झाली. तिने धीर करुन विचारले " काय साहेब काय झालय एवढ्या रात्री तुम्ही आलात म्हणजे तसच काही असले पाहिजे. पण जरा नीट सांगाल का सारे." एवढ्यात परशा आणि रखमा पण बाहेर आले होते. " वहिनीसाहेब, संध्याकाळी घाटात अपघात झाल्याची बातमी आली आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो. एक मुलगी सोडता कुणीही वाचले नाहीय. मुलगी तशी बेशुद्धच आहे पण मधेच थोडावेळ शुध्दीत आली असता तिच्याशी जे काही बोलणे झाले त्यावरुन आम्ही अंदाज बांधला आणि इथे आलो. तुम्ही जर लगेच आतात तर खुप बरे होईल. कारण मुलगी शुद्धीत आली की रडतेय नुसती." रखमाला आपल्या सासुजवळ आणि मुलांजवळ बसवुन पोलीसांच्याच गाडीतुन शंकर, परशा आणि राजी असे तिघही निघाले. राजीला दवाखान्यात एक लेडी कॉन्स्टेबलची सोबत देऊन तिथे सोडुन शंकर आणि परशाला घेऊन जीप सरकारी दवाखान्याच्या दिशेने निघाली.
राजीने ती मुलगी असलेल्या खोलीत महिला पोलीसासहीत पाय ठेवला आणि ती चरकलीच. ती लतिका होती. सुमनची मुलगी. तिच्याजवळ एक तरुण स्त्री होती. ती मायेने तिच्या डोक्यावरुन हलका हात फ़िरवत होती. लतिका असे जोरात ओरडतच ती लतिकाजवळ गेली. एवढ्यात नर्सही आलीच तिथे. राजीला शांत करत ती म्हणाली, " ताई तुम्हीच धीर सोडला तर त्या पोरीने काय करायचे? शुद्धीत येइल तसे नुसते आई आई म्हणत रडतेय. ही कुणाची कोण काहीच समजेना. पोलीसांच्या मदतीने ज्याने हिला इथे आणले त्याने आपल्या बायकोला घराकडुन बोलवुन घेतले आणि इथे थांबायला सांगितले. त्याच या मॅडम. " राजीने त्या स्त्रीला नमस्कार केला आणि म्हणाली, " ताई तुम्ही आणि तुमचे मिस्टर होतात म्हणुन हिला लवकर ट्रीटमेंट मिळाली. खुप उपकार झाले बघा. संध्याकाळपासुन आम्ही फ़ोन लावतोय पण कुणाचाच फ़ोन लागेना. "
वहिनीसाहेब मी खुप लहान आहे. मला ताई म्हणु नका. माझे नाव प्रतिभा. अन उपकाराचे काय हो. लहान पोर ते एकट होतं अन मोठ्या अपघातातुन वाचले हेच नशिब आहे. जवळ कुणीच नव्हतं कारण काहीच ओळख पटेल असे अपघाताच्या ठिकाणी सापडले नाही असे माझे मिस्टर म्हणाले. मग ते अन मी दोघेच इथे. हिला पुर्ण शुद्ध येईपर्यंत आणि हिची ओळख पटेपर्यंत इथे थांबायचे असे ठरवले. आम्ही तुम्हाला ओळखतो पण ही तुमच्यापैकी कुणाची असेल असे वाटले नव्हते. " " अग प्रतिभा आजकाल कुणी कुणासाठी पाच दहा मिनीटे पण थांबत नाही ग. अन तु एवढा वेळ थांबलीस. तुझ्या घरीही असतील न तुझी कच्ची बच्ची. जा तु ती वाट बघत असतील तुमची. मी आहे इथे." " नाही हो ताई मी थांबेन. माझी एक मुलगी आहे. लहान आहे पण तिला आत्यांची सवय आहे. ती त्यांच्याकडेच असते. मी थांबते इथे. आत्या म्हणाल्या पोरगी एवढी गंभीर जखमी आहे तर तिचे नातेवाईक आले तरी तु थांब मदतीला. त्यामुळे मी आहे तुमच्या सोबत. तुम्ही नका काळजी करु."
लतिकाजवळ राजी अन प्रतिभा दोघीही थांबल्या. बाहेर प्रतिभाचा नवरा प्रकाशही होताच.
इकडे सरकारी दवाखान्यात मिळालेल्या काही वस्तु आणि अर्धवट जळलेले मृतदेह बघुन शंकरने हंबरडाच फ़ोडला. काय हे होत्याचे नव्हते झाले असे त्याला वाटले. परशा बरोबर होता त्याने सावरले त्याला. पी एम करुन झाले होतेच. थोडीफ़ार पोलीस प्रोसीजर करुन आता सर्व देह ताब्यात घेउन पुढील व्यवस्था करणे एवढेच बाकी होते. त्याला काय करावे सुचत नव्हते. पोलीसांकडुन लतिका तेवढी वाचल्याचे त्याला समजले होते. आता सुमनच्या सासरी कळवायला हवे होते. त्याच्याकडे काही मोबाईल नव्हता त्यामुळे घरी जाणे भाग होते घरच्या डायरीतच सर्व नंबर्स होते. घरी जाता जाता दवाखान्यात लतिका कशी आहे पाहुन जावे तसेच राजीलाही सारे सांगावे म्हणुन तो निघाला. पोलीसांनी शंकरची अवस्था पाहुन त्यांची जीप आणि बरोबर एक मदतनीसही दिला होता. दवाखान्यात आल्यावर तो राजीला जसा भेटला तसा लहान मुलासारखा तिला बिलगुन रडु लागला. आपल्या नवर्याचा हळवा स्वभाव राजी जाणुन होती. आता तिलाच कणखर व्हायला हवे होते. पण तरीही आधी ती एक स्त्री होती. त्यामुळे तीलाही दुःखाचा आवेग सहन झाला नाही. ती पण रडु लागली. परशा, प्रतिभा आणि प्रकाशने त्या दोघांना सावरले. शंकर लतिकाची अवस्था पाहुन अजुनच खचला. हे सारे होईपर्यंत चांगलेच उजाडलेले. लतिकाजवळ प्रतिभा आणि राजीला थांबवुन प्रकाश समवेत शंकर आणि परशा घरी गेले. यशोदा आज्जीचा आणि रखमाचाही डोळ्याला डोळा लागला नव्हता. मुलांना काहीच माहिती नसल्याने ती मात्र निजलेलीच होती. झाला प्रकार परशा आणि प्रकाशकडुन आज्जीला आणि रखमाला समजल्यावर आज्जीने हंबरडा फ़ोडला. आपला नवरा गेल्यावरसुद्धा तिने मुला नातवंडांसाठी धिराने घेतले होते. पण आता मात्र बांध फ़ुटला. नुकताच नवरा गेला आणि अजुन दिवस उरकले नाहीत तोवर मुलगा, सुन, मुलगी, जावई आणि नातवंडे काळाने ओढुन नेली. कोण कुणाला धीर द्यायचा हा प्रश्नच होता. प्रकाशने पुढाकार घेऊन परशाशी बोलुन डायरीमधील नंबर पाहुन फ़ोनाफ़ोनी केली. गावकर्यांची रिघ लागली होती. जो तो हे समजल्यावर दुःखी होत होता. गावातील काही मोठ्यांच्या चर्चेतुन अंत्यदर्शनासाठी कोणतीही डेडबॉडी घरी आणु नये असे ठरले. कारण ते कुणालाही बघवले नसते आणि तसही आता १२ तास उलटून गेले होते. त्यामुळे परस्परच अंत्यसंस्कार करावेत असे ठरले. सुमनचे सासु सासरे पण लगेच येणे शक्य नव्हते अगदी आत्ता लगेच निघाले तरी यायला एक दिवसापेक्षा जास्त वेळ लागला असता. कारण ते विष्णुपंताचे समजल्यावर येउन भेटुन नंतर त्यांच्या मोठ्या मुलाकडे जयपुरला होते. त्यामुळे त्यांनी सारी जबाबदारी शंकरवर सोपवली आणि आम्ही लगेच निघत आहोत तरी उद्या दुपार होईल यायला असे सतिषच्या भावाने सांगितले. त्यामुळे आता जास्त थांबण्यात अर्थ नाही. मनिषाच्य माहेरचे आणि राजीच्या माहेरचे आल्यावर पुढचे सर्व सोपस्कार उरकले.
लतिकाला अजुन किमान चार पाच दिवस तरी दवाखान्यात ठेवावे लागेल असे वाटत होते. तसं फ़ार काही लागल नव्हतं म्हणजे काळजीचे कारण नव्हते. पण मुका मार आणि अंगावर जखमा बर्याच होत्या. नशिब की डोक्याला काही इजा झाली नव्हती. आणि कुठेही फ़्रॅक्चर नव्हते. पण ती खुप घाबरलेली असल्याने शुद्धीवर आल्यावर आईचा जप चालु होता. समोर मामीला पाहुन ती आई कुठाय असे विचारुन रडयला लागायची. राजीलाच तिची काळजी घ्यायला हवी होती. मानसीक आधारही द्यायला हवा होता. चंदापेक्षा दोन तीन वर्षानीच ती मोठी होती म्हणजे अवघी आठ नऊ वर्षाची. म्हणजे काही फ़ार मोठी नव्हती. तिचे आई बाबा आता या जगात नसल्याचे तिला सांगणे खुपच अवघड होते. उद्या तिचे तिकडचे आजी आजोबा आल्यावर तिला कसे सांगायचे ते पाहु अन तसही सध्या तिला थोडेफ़ार झोपेतच ठेवणे गरजेचे होते. जागी झाली की दवाखान्यातुनच तिला पेज, खीर, सुप असे नर्स येउन भरवत होती. राजीने मोठ्या भावाशी बोलुन आपल्या वहिनीला ठेवुन घेतले होते. कारण तिला दवाखान्यातुन हलणे शक्य नव्हते. अन घरी कुणीतरी जबाबदार व्यक्ती हवी होती. सासुबाईंना संभाळणे पण गरजेचे होते. त्या तर अगदी
हवालदिल झाल्या असणार याची तिला खात्री होती अन ती घरी नसल्याने तर जास्तच. खरे तर एकदा तरी घरी जाऊन येणे गरजेचे आहे. मिनी आणि गणेश मोठे आहेत पण चंदा अजुन लहान आहे. आणि आबा गेल्यावर ती सारखी घरभर भिरभिरत असायची आबा कुठे आहेत म्हणत. हे सारे घडले त्यामुळे ती अन अर्थातच मिनी गणेशही बिथरले असतील. सारेच लहान कोण सावरणार त्यांना. पण वहिनीवर घराचा भार सोपवुन ती निश्चिंत झाली. व्हायलाच हवे होते पर्यायच नव्हता. कसा बसा तो दिवस संपला. प्रतिभाने दवाखान्यातली जबाबदारी घेतल्याने तिच्या जेवण खाण्याचा चहाचा प्रश्न नव्हताच अन तसही या घटनेमुळे जात तरी कुठे होते जेवण.
दुसर्या दिवशी सकाळी लतिका चांगलीच शुद्धीत आली होती. अन तशी शांत होती. सकाळी दुध अन बिस्कीटे खाल्ली. नंतर नर्सने राजीच्या मदतीने तिचे स्पंजींग केले. कपडे बदलले. त्यामुळे ती अजुनच जरा फ़्रेश झाली. राजीला म्हणाली, " मामी कालपासुन माझे आई बाबा दिसले नाहीत ग कुठे. तु आणि या काकीच आहेत माझ्याजवळ. कुठे आहेत ग ते? मला एवढे लागलय अन ते मला पहायला का नाही आले ग? रागवलेत माझ्यावर? " राजी अवाकच झाली. किती शांत झालीय ही अन समजुतदारपणे बोलतेय. " लतिका बाळा तु विश्रांती घे बर आता. लागलय न तुला. मग बोलु आपण." " नाही ग मामी कालपासुन झोपुन झोपुन कंटाळा आलाय मला. अन मामी मला एक सांग राजेश मामा मनिषा मामी, आर्य आणि मनवा कुठे आहेत? " काय उत्तर द्यावे ते काही राजीला समजेना. ती म्हणाली, " बेटा तुला सांगते सारे काही. पण आता तु झोप बरे. " " नाही ग मामी मला नै झोप येत. आता मी बरी आहे. जरा दुखतय लागलय तिथे. पण तु फ़ुंकर मारतेस न मग बरे होऊन जाते सारे. तुला मी सांगते काल काय झाले ते. "
लतिका सांगु लागली..... मामी आम्ही इथुन निघालो. गाडीत सारेच गप्प होते. मी मागे आईच्या मांडीवर बसले होते. मामा मामी मनवाला घेउन पुढे बसले होते. आर्य आणि बाबा आईच्या शेजारी होते. घाट सुरु झाला आणि समोरुन ट्रक आला आणि त्याने गाडीला धडक दिली. मग आमची गाडी खाली खाली जायला लागली. आम्ही सारे ओरडत होतो. तेवढ्यात मी गाडीच्या बाहेर फ़ेकले गेले. मला खुप लागले होते मला उठता येईना. आणि समोर तर आग दिसायला लागली कसली आग मला समजेना. मला लागल्यामुळे मला उठताही येईना. मी आई आई म्हणुन हाक मारत होते ग पण कुणीच येईना. बर्याच वेळाने मग कुणी कुणी माणसे अस्पष्ट दिसायला लागली. कुणीतरी काकांनी माझा आवाज ऐकुन माझ्या जवळ आले आणि मला तेथुन उचलले एवढेच मला माहितेय. पण सांग न मी एकटीच कशी इथे बाकी सारे कुठे गेलेत? सांग ना मामी ... ए मामी सांग ना.......... राजीच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. कसे काय सर्वांनी हे सोसले असेल देव जाणे. आणि हे पिल्लु बापरे.... तिने लतिकाला हृदयाशी घट्ट धरले आणि ती रडु लागली. कसं काय हे सोसले असेल पोरीने देव अन तीच जाणे. लतिका बाळा आपले आबा देवबाप्पाकडे गेले न त्यांना भेटायला गेलेत ते. असे सांगुन ती मोकळी झाली. मनावरचे ओझे तर उतरले तिच्या पण लतिका हा आघात कसा सोसेल हे मात्र समजेना. सतिष सारखा फ़िरतीवर असल्या कारणाने तिला आईचाच सहवास जास्त होता. मामी कडून आई बाबा देवबाप्पाकडे आबांना भेटायला गेलेत हे समजल्यावर मात्र ती जरा शांत झाली. आणि पांघरुण घेऊन झोपली. म्हणजे नुसते डोळेच मिटले. राजीला वाटले आपण सांगायला नको होते. किमान आत्ता तरी नको. पण ज्या काकुळतीने लतिका विचारत होती ते पाहता तिला लगेच सांगणेच योग्य होते असे तिला वाटले. थोड्याच वेळात नर्सही आली आणि प्रतिभाही आली.नर्सशी बोलुन प्रतिभाने घरुन आणलेला मऊ शिरा लतिकाला खाऊ घालायची परवानगी घेतली. शिरा खाऊन झाल्यावर औषधेही तिने घेतली आणि औषधाने की काय पण ती थोड्यावेळात झोपी गेली. डॉक्टरही येऊन गेले. तिच्या जखमा आणि तिची रिकव्हरी पाहता तिला संध्याकाळी घरी घेउन जायला परवानगी दिली. घरच्या वातावरणात ती लवकर बरी होईल असे सांगितले. पोलीसांचा लतिकाला तसा काही त्रास झाला नाही. पण ती जेव्हा राजीला सांगत होती तेव्हा महिला पोलीस तिथे असल्याने त्यांनी सारे ऐकलेच होते. पोलीसांनी आणि तिने रिक्वेस्ट केल्याने दवाखान्याच्या अॅम्ब्युलन्सने संध्याकाळी लतिकाला घरी आणले. प्रकाश प्रतिभा बरोबर होतेच. घरी आल्यावर मात्र तिने आणलेले उसने अवसान गळुन गेले. लतिका हळु हळु चालत प्रतिभाच्या आधाराने आज्जीच्या खोलीत गेली. आणि आज्जीच्या गळ्यात पडुन रडु लागली. ते दृष्य़ पाहुन सारेच परत रडु लागले. चंदाही आईला बिलगली. शंकर तर चालते बोलते जिवंत प्रेतच जणु अशी अवस्था झाली होती. संध्याकाळी सात नंतर मनिषाच्या सासरची माणसे आली. आजीला पाहिल्यावर लतिका वार्याच्या वेगाने पण धडपडत आज्जीकडे गेली. सारेच वातावरण परत शोकाकुल झाले होते.
शंकरची अवस्था पाहता आजीनी कुणाचेही दिवसकार्य न करण्याचा निर्णय घेतला आणि सुमनच्या सासुसासर्यांना त्या म्हणाल्या तुम्ही काय करताय ते पहा. सतिष आणि सुमचे दिवसकार्य कुठे कसे करायचे ते तुम्ही सांगा. सतिषच्या भावाने सांगितले आम्ही चार सहा दिवसात दिवसात निघु. लतिका तोवर बरी होईल सध्या येथील वातावरण पाहता तिला इथे ठेवणे योग्य होणार नाही. तसच त्यांच्या घरी जाऊन तेथील सामानाचे काय करायचे आणि घराचे काय करायचे याचाही विचार आत्ताच करायला हवा. कारण मला काही सारखे सारखे येणे जमणार नाही एवढ्या लांबुन. आणि आता आई बाबांना पण इथे एकटे ठेवणे शक्य नाही. माझ्या मुलांबरोबर लतिका वाढेल. आणि तसही माझ्या बायकोला लतिकाचा लळा आहेच. थोड्याच दिवसात सारे काही नॉर्मल होईल असा विश्वास आहे. त्याच्या म्हणण्याला त्याच्या आईवडिलांनी पण दुजोरा दिला. अन सारे काही तात्पुरते मार्गी लावुन आठ दिवसात लतिकाला आणि आई वडिलांना घेऊन सतिषचा भाऊ जयपुरला निघाला. जाताना लतिका मामी आणि आजी तसेच चंदा मिनी आणि गणेशच्या गळ्यात पडुन रडली. सारेच भावुक झाले होते.
हे सारे आठवताना राजी पुन्हा त्या अनुभवातुन गेली अन आपसुकच तिचे डोळे ओले झाले. एवढ्यात दरवाजा वाजला म्हणुन ती उठलीच. पाच वाजुन गेले होते. दोन माणसांनी शंकरला दरवाजापाशी आणुन सोडले. राजी बाहेर गेल्यावर " वहिनीसाहेब दादांना घ्या आत. " असे म्हणत ते दोघे निघुन गेले. फ़ुल्ल पिऊन आलेल्या शंकरला तिने गणेशच्या मदतीने आतल्या खोलीत आणुन झोपवले. एवढा आडदांड देह शंकरचा दोन चार वर्षात अगदी चिपाडासारखा झाला होता. आपल्या नवर्याकडे पहात असताना तिच्या मनात त्याच्याबद्दल फ़क्त माणुसकीचे भाव होते. ना राग ना लोभ, एक कुंकवाचा धनी बास. काय करणार न राग मनात धरुन? सारे आपल्याच नशोबाचे भोग आहे आणि ते आपल्यालाच भोगायला हवेत हा एकच विचार बास. मुलांकडे बघत जगायचे एवढे एकच ध्येय डोळ्यासमोर तिने ठेवले होते त्यामुळे शंकरच्या बाबतीत सर्व भावभावनांच्या पलिकडे ती गेली होती. तिन्हीसांज झालीच होती. देवासमोर दिवा लावायला म्हणुन ती उठली. आणि मुलांना घेउन देवासमोर बसली. दिवा लावुन आणि नमस्कार करुन तिने तिघांनाही शुभंकरोती म्हणायला लावली आणि ती रात्रीच्या स्वैपाकासाठी उठली. सकाळी दादुने दिलेल्या पिठातील कणिक घेउन त्यातच तिखट मीठ घालुन त्याच्या पोळ्या केल्या. म्हणजे वेगळी भाजी नको. गरम गरम पोळी खाल्ली .कीभाजी नसली तरी चालेल असा काटकसरी हिशेब तिने केला. सासुसाठी एक भाकरी केली. त्याबरोबर थोडेसे ताक होते कालचे ते दिले. स्वताही चार घास खाऊन मुलांजवळ येउन बसली. चंदा आणि मिनी शाळेतील काही गमती जमती सांगत होत्या पण त्या तिच्या मेंडुपर्यंत पोचतच नव्हत्या. तिच्या मनाचा वारु भुतकाळात कुठल्या कुठे उधळला होता.
लतिका तिच्या काकाबरोबर गेली. पोचल्याचा फ़ोनही आला दोन दिवसानी. नुकत्याच घडलेल्या घटनांनी घर दार सारे हादरुन गेले होते. कुणी कुणाला सावरायचे हा प्रश्नच होता. शंकर तर अगदी दगडी पुतळा झाल्यासारखाच होता. झोप आली की झोपायचा. जाग आली की उठायचा. राजीच त्याला काही खाउ घालायची. हळु हळु धरुन बाथरुममधे नेउन आंघोळ घालायची. परशा असायचा मदतीला. पण त्यालाही फ़ार होत नव्हते. तो दाखवुन देत नव्हता पण खरे तर मनातुन खचला होता. त्याच्याच आधारावर राजी शंकरच्या बाबतीत जरा निर्धास्त होती. पण हे काही फ़ार दिवस नाही चालले. परशाचा मुलगा आला आणि आई वडिलांना सोबत घेउन गेला. त्यामुळे वाड्यात परशा आणि रखमाची सोबत होती एक आधार होता तो पण गेला.
जोवर परशा होता वाड्यात तोवर वाड्यावर फ़ार कुणी फ़िरकत नव्हते. पण परशा निघुन गेला आणि शंकरचे मित्रमंडळ हळु हळु त्याची चौकशी करण्याच्या निमित्ताने वाड्यावर येऊ लागले. त्यांच्या येण्याने शंकरमधे थोडा थोडा बदल होऊ लागला होता. थोडा माणसात आला तो. जरा बोलु लागला. त्याच्या पुर्वीच्या रुटीनप्रमाणे हळु हळु सारे चालु झाले होते. सकाळचा व्यायाम, शेतावर जाणे, मुलांबरोबर खेळणे गप्पा मारणे, आईशी बोलत बसणे, तिची चौकशी करणे, मधेच आठवण आली की लतिकाला फ़ोन करुन तिच्याशी बोलणे. पण या सार्याला चार महिन्याचा अवधी गेला. चार महिन्यानंतर एकदा दोन मित्रांना घेउन राजेशच्या घरी जाऊन तेथील सामानाची विल्हेवाट लाऊन आला. म्हणजे जवळ जवळ सारे सामान कुणाला ना कुणाला तरी देऊनच टाकले. कपडे भांडी वगैरे आश्रमात दिले. अन ते घर राजेशच्या कंपनीच्या ताब्यात देऊन त्याच्या ऑफ़ीसची इतर सारी कागदपत्रांची पुर्तता करुन आला. या सार्याला आठ दिवस लागले. राजी आणि यशोदाआज्जी पण आता शंकर माणसात आला म्हणुन खुश होत्या. अन मुलेही बाबा बाबा करत त्याच्या अवती भवती होती. अशातच एक दिवस रात्री नऊच्या दरम्यान शंकर घरी आला ते झोकांड्या खातच. राजीला आणि मुलांना त्याचे हे रुप नविनच होते. तो आता आला आणि आपल्या खोलीत जाऊन झोपला. ती विमन्स्क अवस्थेतच. आज्जीला तेव्हा काहीच समजले नव्हते. पण सकाळी उठल्यावर राजीचे काहीतरी बिनसले आहे एवढे मात्र समजले. राजी अगदी गप्प गप्प होती. पण तिने राजीला काहीही विचारले नाही. कारण काय ते केव्हा न केव्हा कळणारच होते. एवढ्यात बाथरुममधुन शंकरच्या ओकार्यांचा आवाज यायला लागला. तिने गणेशला बोलवले आणि विचारले, " काय रे तुझ्या बाबाची तब्बेत बरी नाही काय रे ? " गणेश उत्तरला, " नाही ग आज्जी काल रात्री ते दारु पिऊन आलेत. त्यामुळे ओकार्या करत आहेत. " यशोदा आज्जी पण हादरलीच. नाही म्हणलं तरी आजवर विष्णुपंतांचा ते बोलले नाही कधी तरी धाक होता. मागे जेव्हा तो पिऊन आला होता त्याचवेळी आपल्या मुलाकडे त्यांनी अशा नजरेने पाहिले होते की काही बोलायची गरजच नव्हती. पण आता काय??? तिने त्याला आपल्या खोलीत बोलवुन घेतले आणि त्याला याबद्दल जाब विचारला. तेव्हा " आई अग मित्रांबरोबर गेलो होतो. त्यांनी जरा आग्रह केला म्हणुन थोडीशीच घेतली." त्या आपल्या लेकावर जरा रागवल्याच. " अरे ते मस्त आग्रह करतील म्हणुन काय तु लगेच ग्लास लावायचा का तोंडाला? हेच आम्ही संस्कार केले का? अरे जरा आपल्या वडिलांचा मान राख......................................... " असे बरेच काही बोलल्या. त्यावर तो काहीच न बोलता तिथुन उठला आणि बाहेर पडला. आता हे सारे नित्याचेच होऊन बसले. कुणाच्याच रागाला, अबोल्याला, प्रेमाला तो भिक घालत नव्हता. या दारुच्या नशेत त्याने कुठल्या कुठल्या कागदांवर सह्या केल्या हे एकतर तो जाणे आणि देवच जाणे. पण सारी शेती गेली. उत्पनाचे साधनच गेले आणि खायचे वांदे सुरु झाले. नशिब की घर राजीच्या नावावर केले होते. त्यामुळे निवार्याचा प्रश्न नव्हता. नाहीतर डोक्यावरचे छप्परही गेले असते तर मुलांना घेऊन कुठे जायचे हा प्रश्न निर्माण झाला असता. आता तर दारुसाठी शंकर घरातील सामानही हळु हळु घेउन जाऊ लागला होता. पैशाच्या बदल्यात सामान ठेवायचे आणि दारु पिऊन यायचे. अगदी वेळी अवेळी. शुद्धीत असेल तेव्हा जेवायचा आपल्या हाताने घेउन. फ़क्त एक मात्र होते की त्याने दारु पिऊन घरात धिंगाणा केला नव्हता की राजीवर मुलांवर हात उचलला नव्हता हीच काय ती जमेची बाजु म्हणता येइल. स्वैपाकघरात आता अगदीच जुजबी वस्तु उरल्या होत्या हेच का देशमुखांचे घर असा प्रश्न पडावा इतपत. कपाटातला एक दागिना बाहेर गेल्यावर मात्र राजीने शहाणपणा करुन फ़ोन करुन मोठ्या भावाला आणि वहिनीला बोलावुन घेतले आणि घरातले सारे किडुक मिडुक दागिने, चांदीच्या वस्तु त्यांच्या स्वाधिन केल्या. अन जपुन ठेवायला सांगितल्या. जोवर मी स्वता मागत नाही तोपर्यंत कुणालाही हे द्यायचे नाही असे बजावुन ठेवले. भाऊ ते सारे घेऊन गेला आणि आपल्या बहिणीचे हे धन त्याने बॅंकेत ठेवुन टाकले.
एवढा मोठा वाडा आता काय करायचा म्हणुन तिने वाड्यातल्या चारच खोल्या स्वताकडे ठेवुन बाकी दोन दोन खोल्यात तीन भाडेकरु ठेवले. किमान तेवढाच संसाराला हातभार. पण येणार्या दीड दोन हजारात काय काय भागवायचे? मुले मोठी होत होती. त्यांच्या गरजा वाढत होत्या. घरातल्या मिठ मिरचीलासुद्धा ते पैसे पुरेनात. मग कपडालत्ता, शाळेच्या सार्या वस्तु कुठे कुठे काय काय भागवणार? यशोदा आजीच्या जिवाचे पाणी पाणी होत होते राजीचे होत असलेले हाल पाहताना. एकदा अशीच वैतागुन तिरीमिरीत राजी बाहेर पडली. आणि काही घरात जाऊन कामाबद्दल विचारुन आली. पण देशमुखांची सुन आपण तिला कामाला कसे लावायचे हा विचार करत कुणीच कसलेही काम द्यायला तयार होत नव्हते. अगदी धुणी-भांडी ते स्वैपाक करण्याचीही तिची तयारी होती. पण छे. कुठेच काही जमत नव्हते. रडवेली होऊन ती घरी आली. आल्या आल्या सासुच्या कुशीत शिरुन ती रडु लागली आणि शांत झाल्यावर सारे सांगितले. सुनेची धडपड पाहुन तिला त्या न मिळणार्या यशाबद्दल तिला खुप वाईट वाटले. मुलांची रोजची उपासमार होऊ लागली. गणेश खुपच समजुतदार होता पण मिनी आणि चंदा लहानच होत्या तशा अजुन. भुकेने कळवळायच्या. शंकर काय या जगात असुन नसल्यासारखाच होता. त्याला कशाचीच शुद्ध नसायची. एके दिवशी आज्जी उठली अन सरळ दादुच्या गिरणीत गेली. गिरणीत कुणी नाही असे पाहुन तिने दादुला विचारले, " दादु तुझ्या गिरणीत आजुबाजुला पीठ पडते त्याचे तु काय करतोस रे? " दादु म्हणाला, " अग आज्जे मी ते बाहेर टाजुन देतो कारण थोडेफ़ार मिक्स झालेले असते नं.... मग येणारी जाणारी जनावरे ते खातात. का ग आज्जे असं का विचारतेस तु ? " आज्जी बोलाव की न बोलाव या विचारात होती. शेवटी धीर करुन तिने विचारलच, " दादु तुझ्या दोन्ही गिरण्या वेगवेगळ्या आहेत न रे? मग दोन्हीकडचे बाहेर उडलेले पीठ वेगवेगळे पिशवीत बांधुन देशील मला? " असे म्हणताना आज्जीच्या डोळ्यात पाणी भरुन आले होते. ते ती पुसत असताना दादुने पाहिलेच. " काय ग माय काय झालं ग ? तुझ्या डोळ्यात पाणी? "
" हो रे दादु, तुझ्यापासुन काय लपवायचे रे? तुला घरची परिस्थिती माहीती आहेच. अन्नाविणा मुलांचे हाल होत आहेत. राजी काम मागायला गावात फ़िरली पण देशमुखांची सुन म्हणुन कुणीही तिला काम द्यायला तयार होईना. मग काय करणार? म्हणून तुझ्याकडे आले. हे गोळा केलेले पीठ, तेवढच काहीतरी करुन घालता येईल मुलांना. " " आज्जे देईन मी तु काळजी नको करुस. सकाळी लवकर येत जा म्हणजे रात्री उशीरपर्यंत गिरणी चालु असते ते पीठ गोळा करुन ठेवत जाईन मी." अशा तर्हेने रोज आज्जी दादुकडुन पीठ आणु लागली. तेवढ्यात सुद्धा मुले खुश होऊ लागली. पण याची कसलीही फ़िकीर शंकरला नव्हतीच. आपला जिवनपट आठवता आठवता शंकरचा विचार करता करता राजीला केव्हा डोळा लागला समजलच नाही.
सकाळी तिला जाग आली तीच मुळी खुप उशीरा. आज्जी उठुन कामाला लागली होती. तिला उगाचच कानकोंडे झाले. " आई तुम्हाला बरे नाहीय तर कशाला उठला तुम्ही मला हाक मारायची नं... " " अग राजे कालच्या औषधाने मला खुप फ़रक पडलाय. अन काल तुला आजिबात झोप नव्हती लागली. रात्रीपण उशीरा झोपलीस. म्हणलं कशाला उठवायचे." राजी उठुन कामाला लागली. ज्वारीच्या पिठाची उपम्यासारखी उकड करुन सासुला आणि मुलांना खायला दिली. थोडी उकड शंकरसाठी ठेवुन तिनेही थोडे खाऊन घेतले अन ती स्वैपाकाला लागली. अधुन मधुन कुणी ना कुणीतरी जुन्या उपकाराची जाणीव ठेवत आणि यशोदा आज्जी आणि तिला वाईट वाटणार नाही याची काळजी घेत शेतातली पालेभाजी, फ़ळभाजी आणुन द्यायचे. ती ते पुरवुन पुरवुन वापरायची. भाडेकरुंच्या आलेल्या पैशातुन मीठ मिरची तेल तांदुळ असे काही बाही किरकोळ यायचे. ज्या घरात दुधाच्या घागरी असायच्या त्याच घरात विकतचे पावशेर दुध अन ते सुद्धा विकतचे यायचे. दिवस असेच चालले होते. गणेश मात्र चांगला अभ्यास करत होता. दुकानात कामही करत होताच. यंदा दहावी होती त्याची. तुटपुंज्या अभ्यासाच्या साहित्यावर आणि मित्रांनी दिलेल्या वह्या पुस्तके यांच्या मदतीने अन स्वताच्या मेहनतीने दहावीला तो बोर्डात पहिला आला. सगळीकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत होता. पण आता काय करायचे हे मात्र नक्की होत नव्हते. कारण एकच पैसा. त्याला स्वताला इंजीनीयरींगला जाण्यात इंटरेस्ट होता. पण फ़ी आणि बाहेरगावी रहायचे म्हणजे तो खर्च याचे गणित कसे जमणार याच विवंचनेत तो आणि राजी होते. गणेशचा मामा आणि मामी त्याचे अभिनंदन करायला आलेच होते तेव्हा त्यांच्याकडे राजीने विषय काढला. " दादा मला वाटते आता माझ्या दागिन्यांची गरज लागेल असे वाटतेय. काहीही झाले तरी मी माझ्या तीनही मुलांना चांगले शिकवणारच. गणेशला इंजीनीयरींगला जायचय. पण पैशा अभावी त्याचे ते स्वप्न मी धुळीस नाही मिळु देणार. "
" हो राजी, मी त्याच हेतुने आलेलो आहे तुझ्याकडे. म्हणल भाच्याचे अभिनंदनही करता येईल आणि तुझ्याशीही बोलता येईल."
" बर बोल काय म्हणतोस तु. "
" हे बघ राजी, गणेश पहिला आलाय बोर्डात तेव्हा त्याला कोणत्याही कॉलेजात अॅडमिशन मिळेल. गव्हर्नमेंट कॉलेजात जर त्याने डिप्लोमा इंजीनियरींग ला अॅडमिशन घेतली तर तीन वर्षात हा कोर्स पुर्ण होईल. अन तसही या कोर्सची फ़ी फ़ार नाहीय. ते मी देतो आत्ता. त्यासाठी दागिन्याला हात लावायची गरज नाही. आजवर आमची मदत तु कायमच नाकारत आलेली आहेत. मी काहीही बोललो नाही पण आता मात्र तुझे काहीही ऐकणार नाही. फ़ार तर कर्ज समजुन घे ही रक्कम आणि जेव्हा गणेश कमवायला लागेल तेव्हा मला परत कर. एवढे तरी ऐक माझे."
यशोदा आज्जीही तिथेच होत्या. त्यांनीही डोळ्यानेच होकार भरला. मग राजी त्यासाठी तयार झाली. शाळेतील एका शिक्षकांच्या मदतीने जवळच्याच शहरातील एका कॉलेजमधे डिप्लोमा इंजीनियरींगच्या सिव्हील विभागात त्याने अॅडमिशन घेतली. रहायची व्यवस्था मामीच्या बहिणीकडे झाली दोन महिन्यासाठी. त्याचे कॉलेज रुटीन चालु झाले. शहरातील वातावरणाची सवय झाली. त्या वातावरणाचा डोळे उघडे ठेवुन तो अभ्यास करु लागला. जिथे रहात होता त्यांच्या बरोबर काही बोलणे केले आणि एक निश्चय करुनच तो महिन्याभरात परत आपल्या गावी आला.
आईला हाका मारत म्हणाला, " आई आज्जी जरा इकडे या मला तुमच्याशी बोलायचेय." नाही म्हणले तरी महिन्याभरातल्या शहरी वातावरणाची छाप त्याच्या वागण्या बोलण्यात पडली होती. " आई ऐक मी काय म्हणतोय ते....... हे बघ आपण सारे शहरात शिफ़्ट होऊया. मी एका खोलीत रहात आहे. मामीच्या बहिणीकडे. त्यांच्याशी बोलुन मी अजुन एक खोली मिळवलीय. म्हणजे दोन खोल्या आहेत. आतच बाथरुम आहे पण संडास मात्र कॉमन आहे. मावशी त्यांच्या ओळखीने तुला काही कामे देतील. माझ्या काही मित्रांना डबे हवेत. ते तु घरी बनवुन द्यायचेस. आणि मावशी म्हणतात तिथे घरी जाऊन स्वैपाक करायचा. चंदा आणी मिनीच्या शाळेच्या अॅडमिशनची जबाबदारी मावशींचे मिस्टर घेतो म्हणालेत. आपण सारेच एकत्र राहु. मलाही घरचे जेवण मिळेल. आणि मुख्य म्हणजे बाबा. त्यांना तिथे जाऊन काही फ़रक पडतोय का बघु काही औषधे पण मिळतात म्हणे तिथे. आणि मुख्यतः त्यांची इथली संगत सुटेल." आपल्या लेकाचे हे आत्मविश्वासपुर्ण बोलणे ऐकुन राजी आणि गणेशची आज्जी भारावुनच गेल्या. काय तो निर्णय लगेच घेणे भाग होते. भावाशी फ़ोनवर बोलावे की काय असे तिला वाटले. आता घरात काही फ़ोन नव्हता. काही विचार करुन ती गणेशला म्हणाली, " बाळा तुझे म्हणणे मला पटतय पण एकदा मामाशी बोलुन बघुया का? " " चालेल आई, चल आपण गावात जाऊ आणि बुथवरुन लगेच फ़ोन करु." आज काय ते सोक्षमोक्ष लावायचाच याच उद्देशाने तो घरी आला होता. राजीने सासुकडे पाहिले. तिनेही डोळ्यानेच संमती दिली. मग तीने बुथवरुन भावाला फ़ोन लावला. तिनही भावांशी बोलली. भावांनी या प्रस्तावाला आनंदाने संमती दिली. दोघेही घरी आले. आणि मग दोन चार दिवसात सामानाची बांधाबांध करुन, मुलींचे शाळेचे दाखले काढुन घेउन शनिवारी सकाळच्या पहिल्या गाडीने निघायचे असे ठरले. अर्थात सामान असे ते काय होते? एका पोत्यात भांडी कुंडी, एका ट्रंकेत सर्वांचे कपडे, आणि अंथरुण पाघरुणाची एक वळकटी बास. त्याला तासभर फ़ार फ़ार तर दोन तास बास होते. मुख्य काम होते ते शाळेच्या दाखल्याचे. ते काम गणेशने पुढच्या दोन दिवसात केले. या कशाचीही खबर शंकरला नव्हती. शुक्रवारी मात्र गणेशने गोड बोलुन शंकरला घरातच गुंगवुन ठेवले. बाहेर जाऊ दिले नाही. राजी पण त्याच्याशी नीट बोलली. बर्याच वर्षानी सारे एकत्र जेवले त्या दिवशी. उद्या आपण गावाला जायचेय असे त्याला सांगुन ठेवले. भाडेकरुंना पण कल्पना देऊन ठेवली. आणि भाड्यासाठी महिन्याच्या पाच तारखेपर्यंत कुणी ना कुणी येईल अर्थातच गणेश किंवा राजी. तेव्हा भाड्याचे पैसे तयार ठेवावेत असे सांगितले.
शनिवारी पहिल्या एसटीने सारीजण शहरात रवाना झाली. पोचयला ११ वाजुन गेले. मावशींनी सार्यांचाच स्वैपाक तयार ठेवला होता. खोलीमधे सामान ठेवुन मावशींकडेच सारे जेवले. दुपारी जरा विश्रांती झाल्यावर मुली आणि सासुच्या मदतीने सारे सामान लावले. घरातला असलेला शिधाही बरोबर आणला होता. पण मावशींनी बजावले होते दोन तीन दिवस नका स्वैपाक करु. मी येथुन जेवण देते. दोन दिवसात जरा सेट व्हा. कामाचेही बघु. अन मग सुरुवात करा तुम्ही. रविवारी मावशींनी त्याच्या किराणावाल्याशी बोलुन या कुटुंबाला महिन्याला पुरेल असा किराणा उधारीवर घेउन दिला. आणि तुमचे रुटीन बसले की मग आमचे भाडे द्यायला लागा असे सांगितले. राजीला खरच त्या देवदुतच वाटल्या. मुलीही जरा हरकल्या होत्या. पण नवी शाळा नव्या मैत्रिणी कसे काय जमणार या काळजीत होत्या. अर्थातच दोघीही जग्न्मैत्रिणी होत्या. कुणाशीही पटकन सुर जुळायचे दोघींचेही. मावशींच्या मिस्टरांनी बोलुन ठेवले होतेच त्यामुळे लगेचच सोमवारपासुन शाळाही सुरु झाली. त्यांच्या ओळखीने शाळेतुनच जुने युनिफ़ॉर्म आणि पुस्तके मिळाली. वह्याही मिळाल्या पण त्याचे मात्र पैसे द्यावे लागणार होते. पण ते त्यांनी स्वता भरले. मिनीची शाळा सकाळची होती तर चंदाची शाळा दुपारची. गणेशचे ही कॉलेज चालु झाले. मावशींबरोबर जाऊन राजीनेही आपली कामे फ़िक्स करुन टाकली. मंगळवारपासुन ती कामे पण चालु झाली. यशोदा आज्जीला हे सारे राजीच्या चांगल्या कामाचेच चांगल्या वागण्याचेच अन ति घेत असलेल्या कष्टाचे फ़ळ आहे असे मनोमन वाटत होते.
यशोदा आज्जी घरचे सारे काम बघायची आणि त्यामुळेच राजीनेही अजुन चार कामे वाढवली. राजीच्या हाताला चांगली चवही होतीच त्यामुळे तिला सणावाराच्याही ऑर्डर मिळु लागल्या. आता चार पैसे हातात रहात होते. त्यामुळे मनासारख्या चार गोष्टी मुलांसाठी ती करु शकत होती. मावशींच्या वाड्यातील तिच्या शेजारीच राहणारे एक बिर्हाड नोकरीनिमित्त्य घर सोडुन गेले होते. तिने त्या दोन खोल्यांबद्दल मावशींना विचारले. आणि त्या दोन खोल्याही तिने भाड्य़ाने घेतल्या. मुली मोठ्या होत होत्या. गणेशलाही अभ्यासाला स्वतंत्र खोली असावी असे तिला वाटत होते. आत्ताच्या दोन खोल्यात नाही म्हणल तरी अडचण व्हायची पण इलाजच नव्हता. पण आता तसे नव्हते.... या सात आठ महिन्यात राजीने आपल्या मेहनतीने आणि काटकसरीने गाठीला चार पैसे गोळा केलेले होते. आणि मुळात तिला आता चांगलाच आत्मविश्वास आला होता. आपण याआधीच का गाव सोडले नाही असे वाटले. अन हे असे वाटायचे कारण म्हणजे शंकर. या सात आठ महिन्यात त्याने दारुला स्पर्शही केला नव्हता. नाही म्हणले तरी पहिला महिनाभर अस्वस्थ होता तो. तलफ़ यायची त्याला नाही असे नाही. पण मावशींच्या यजमानांना म्हणजे शिवरामपंतांना सारे काही माहिती होते. आता मुलगाच सारा धंदापाणी संभाळत असल्याने ते तसे घरातच असायचे त्यामुळे शंकरकडे त्यांचे बारीक लक्ष असायचे. तो कुठे बाहेर जायला निघाला तरी एका माणसाला त्याच्या मागावर सोडायचे. पण शंकरनेही त्याला काय वाटले कोण जाणे पण शहरात आल्यापासुन दारुच्या दुकानाची पायरी चढली नाही. बाहेर पडला की तो देवळात दोन दोन तास बसायचा आणि घरी यायचा. घरी आला की आईने वाढुन दिलेले जेवून झोपायचा. असच एकदा दरवाजात बसलेल्या शंकरला बघुन शिवरामपंतांनी हाक मारली. " या शंकरराव... बसुया जरा गप्पा मारत. " शंकरही जरा बुजतच त्यांच्याकडे गेला. शंकरला बोलता ठेवत त्याच्याकडुन सारी माहिती काढुन घेतली. शेतीवाडी कशी गेली. त्याला काय काय काम येते तसेच त्याचे शिक्षण किती वगैरे वगैरे. शंकर ही गावातील बडी असामी होती हे माहित असल्याने विचारु का नको या विचारात असलेल्या शिवरामपंतांनी शेवटी शंकरला विचारलेच. " शंकरराव तुम्ही मोठी असामी होतात गावातील पण सारे होत्याचे नव्हते झाले. बर आता झाले ते झाले. त्यावर विचार करण्यात काही अर्थ नाही. गेले महिनाभर मी तुमचा अंदाज घेतोय. मी काही काम दिले तुम्हाला तर तुम्ही कराल? " शंकरचे डॊळे लकाकले. तसही त्याला आता लाज वाटत होती घरी बसुन खाण्याची. बायको कमावतेय आणि आपण आयते खातोय हा विचारांचा भुंगा गेले काही दिवस त्याला स्वस्थ बसु देत नव्हताच. त्याने काय काम आहे हे न विचारताच लगेच होकार भरला. मग शिवरामपंतांनी मुलाशी बोलुन त्यांच्या कारखान्यातील एका युनीटवर लक्ष ठेवायचे काम त्याच्यावर सोपवले. सुरुवातीला त्या युणीटचे कामगार वेळेवर येतात का नाहीत, काम चोख करतात का, काम करताना मधेच थांबुन गप्पा मारतात का अशी जुजबी कामे सोपवली. महिन्याभरात त्याचे कितपत लक्ष आहे कामावर हे पाहुन खुश झालेल्या शिवरामपंतांच्या मुलाने सुजयने त्या युनीटचे अजुन काही काम सोपवले. शेतावर गड्यांकडुन गोड बोलुन प्रसंगी कठोर वागुन काम करवुन घेण्यात शंकर वाकबगार असल्याने त्याला हे फ़ारसे अवघड वाटले नाही. आणि अशा तर्हेने त्याचा वेळही जाऊ लागला आणि चार पैसेही हाती आले. आणि सुजयला घरचा हक्काचा विश्वासु माणुस मिळाला. पहिला पगार हातात आल्यावर त्याच्या डोळ्यात अश्रु आले. थोडे दुखाश्रु थोडे आनंदाश्रु. दुखाश्रु या साठी की लाखोत लोळलेल्या शंकरला अशी नोकरी करावी लागत होती. जे होते ते आपण दारुत सारे घालवले. आणि आनंदाश्रु या साठी की आता आपण बायकोला जरा हातभार लावु शकु. पहिला पगार बायकोच्या स्वाधिन केल्यावर राजीला पण मनापासुन आनंद झाला. आणि यशोदा आज्जी???? ती तर मागचे सारे विसरुन त्याच्याशी धरलेला अबोला सोडुन आनंदली. त्याची अलाबला घेतली. आता या सुखाला कुणाची दृष्ट नको लागायला असे म्हणत त्याला जवळ घेतले. अन तोही लहान मुलासारखे आईच्या कुशीत शिरुन रडु लागला. तिनेही त्याला थांबवले नाही.
गणेशही डिप्लोमा फ़र्स्टक्लास मधे पास झाला. मिनी दहावी झाली होती. आणि चंदाही सातवीत गेली होती. चंदा जात्याच हुशार होती त्यामुळे चौथीत तिने स्कॉलरशीप मिळवली होती. आता सातवीतही ती मिळवायची याचा निर्धार केला होता. सर्वांचेच या तीन चार वर्षात छान रुटीन बसले होते. राजीच्या फ़राळाच्या पदार्थांना दिवाळीत खुप मागणी असायची. राजीही मग अशीच एक गरजु बाई मदतीला घेउन सारे काही पार पाडत होती. सासुची मदत असायचीच. अधुन मधुन गावदेवीच्या जत्रेला शंकर सोडुन सारे जात होतेच. तो नाही म्हणायचा तिकडे जायला अन कुणी आग्रहपण करत नव्हते. न जाणो त्यावेळचे ते मित्र परत भेटले अन परत सारा प्रकार चालु झाला तर???...... घरचे भाडे येत होतेच पण एक वेगळा तापही चालु झाला होता. खोल्या सोडायला कुणी तयार नव्हते. आहे ते आम्ही विकत घेतो जो काय असेल बाजारभाव त्याने आम्हाला द्या असे तीनही कुळे म्हणत होती. राजी आणि यशोदा आज्जीने विचार करुन गणेशशी आणि शंकरशी बोलुन काय असेल तो विषय मिटवुन टाकावा असे ठरवले. त्यानुसार आहे ते सगळेच घर विकुन टाकले आणि गावचा संबंधच संपवुन टाकला. चांगल्या आठवणींपेक्षा वाईट आठवणीच जास्त असल्याने कुणालाही त्याबद्दल फ़ारसे वाईट वाटले नाही. आलेले पैसे चंदा आणि मिनीच्या नावे बॅंकेत ठेवले. त्यांच्या लग्नाला उपयोगी येतील म्हणुन.
गणेशलाही डिप्लोमा झाल्यावर लगेच चांगला जॉब मिळाला एका बिल्डरकडे. पण त्याचे डिगरी करुन स्वताचा बिझनेस चालु करायचा असे स्वप्न होते. पण डिगरीला लागणारा पैसा आणणार कुठुन? त्यामुळे त्याने जॉब पत्करला. समर्थ असोसिएटस च्या मालकांना बापु कुलकर्ण्यांना ही कल्पना होती. त्याचे वर्षभरातले काम बघुन आणि त्याची डिगरी करायची इच्छा बघुन ते म्हणाले तुझ्या डिगरीला मी मदत करतो पण तु माझ्याकडचा जॉब नाही सोडायचास. काही विचार करुन आणि आईशी बोलुन त्याने डिगरीला अॅडमिशन घेतली. वेळ मिळेल तसे साईट्स वर जाणे. मालकांना त्यांच्या कामात मदत करणे हे कॉलेज संभाळत चालुच ठेवले. डिगरीला तो युनिव्हर्सिटीत तिसरा आला. सर्वांनाच आनंदी आनंद झाला.
राजीने मावशींना विचारुन त्यांच्या घराच्या टेरेसवर छोटी पार्टी ठेवली होती. घरी पुजाही घातली होती. सारा स्वैपाक तिने स्वता जातीने बनवला होता. मावशी त्यांच्या घरचे, बापु कुलकर्णी आणि त्यांच्या घरचे तसेच आई वडील, आपले तीनही भाऊ आणि तीनही वहिन्या आणि भाचरे यांना बोलावणे केले. लतिकाशीही अधुन मधुन संपर्क असयचाच पण ती जयपुरला असल्याने ती आणि तिच्याघरची काही आली नाहीत. पण आमच्या खुप खुप शुभेच्छा आहेत असे त्यांनी कळवले. संध्याकाळी सारेच टेरेसवर जमले. सर्वांनी गणेशला शुभेच्छा दिल्या. काही गिफ़्ट्स दिले. या सार्यात एक नवा गोड चेहरा मात्र गणेशला चांगलेच निरखत होता. बापु पुढे झाले आणि त्यांनीही गणेशला शुभेच्छा दिल्या. आणि ते बोलु लागले, ’ गणेश हा एक मेहनती मुलगा आहे. तसेच तो एक उत्तम बिझनेसमन होऊ शकेल ही माझी खात्री आहे. त्याच्यासारखा मोठ्यांना मान देणारा, हुशार आणि निगर्वी मुलगा मी अजुनपर्यंत पाहिला नाही. कॉलेजच्या काळात अनेक प्रलोभने समोर येत असतात. त्यात बरीच मी मी म्हणणारी मुले वाहुन जात असतात. पण हा मुलगा काही औरच आहे. अभ्यास एके अभ्यास करत याने सर्वातच सरशी मारली आहे. माझे त्याच्यासाठी असलेले गिफ़्ट म्हणजे माझा सारा बिझनेस त्याने संभाळुन आता मला विश्रांती द्यावी. तसेच राजी वहिनी आणि शंकर भाऊ तुम्हाला आणि गणेशलाही पसंत असेल तर माझ्या मुलीचा रेवा चा तुम्ही स्विकार करावा. माझी रेवाही चांगली शिकलेली आहे. सी ए करतेय. या बिझनेसमधे त्याला उत्तम साथ देईल. पण अर्थातच तुमचा नकार असेल तरी माझा गणेशला बिझनेस सुपुर्द करायच्या निर्णयात माघार नाही हे पण लक्षात असु द्या. तुम्ही विचार करुन सांगा. " त्यांनी असे म्हणल्यावर मग गणेशचे आणि इतर सार्यांचेच लक्ष रेवाकडे गेले. सर्वांनाच ती आवडली. पण गणेशने स्पष्ट शब्दात तिच्याशी आणि बापुंशी आधी बोलेन अन मगच माझा निर्णय सांगेन असे सांगिअतले आणि ते सर्वांनाच मान्य झाले. हसत खेळत जेवणे झाली. सर्वांचे तृप्त चेहरे पाहुन राजीचेही समाधान झाले.
गणेशनेही बापुंशी आणि रेवाशी बोलुन आपल्या सार्या शंका क्लीअर करुन घेउन होकार दिला. आणि महिन्याभरातच रेवाने गणेशच्या घराचे माप ओलांडले. भावाकडुन आपले दागिने मागुन घेउन त्यातील मुलींसाठी काही शिल्ल्क ठेवुन आणि लतिकाला काही दागिने आजोळची भेट म्हणुन देउन बाकी सारे रेवाच्या स्वाधीन केले. हो लतिका आज कितीतरी वर्षांनी आपल्या आजोळी आली होती. गणेशच्या लग्नासाठी. कितीतरी वर्षांनी ती आपल्या मामा मामीला आज्जीला आणी भावंडांना भेटत होती. सुमन, सतीष, राजेश मनिषा आर्य आणि मनवा यांच्या आठवणीने सारेच हेलावले होते. मोठी झालेली लतिका अगदी सुमनची कार्बन कॉपीच वाटत होती. ती मुद्दाम पंधरा दिवसाची सवड काढुनच आली होती. आपल्या मामा मामीशी आणि भावंडांशी आणि आता झालेल्या नव्या वहिनीशी खुप खुप बोलायचे होते. यथावकाश गणेशने आपले स्वताचे मोठे घर घेतले. मिनी आणि चंदाचेही योग्य स्थळी लग्न करुन दिले. लतिकालाही कुणी कशाचीही उणीव भासु दिली नाही.... ना आजोळच्या घराने ना तिच्या काका काकुंनी आता पुर्वीच्या दुःखाचे सावटही कुणाला नको होते. पण आठवणी ह्या आठवणीच असतात कधी कधी चोरपावलाने यायच्याही पण सारे सुख पाहुन मागच्या पावली परत फ़िरायच्या. सारे सुख पाहुन अशोदा आज्जीनेही सुखासमाधानाने या जगाचा निरोप घेतला होता. शंकरही आता तो जे युनीट चालवत होता त्याचा मालक झाला होता. पण राजीने मात्र अजुनही आपले काम चालु ठेवले होते. ज्यामुळे आपण आज इथवर पोचलो ते काम बंद करणे तिला शक्य नव्हते रादर ते कृतघ्नपणाचे वाटले असते. म्हणुन तिने ते चालु ठेवायचा निर्णय घेतला होता. अर्थात कुणाच्या घरी जात नव्हती ती स्वैपाकाला. पण जवळच जागा घेऊन एक युनीट तिने चालु केले होते. अजुन काहीजणींना रोजगार मिळेल म्हणुन म्हणुन आहे ते काम थोड्या मोठ्या प्रमाणात चालु केले होते. त्यावर १० जणींची कुटुंबे चालत होती.
गणेश अणि रेवाही खुप आनंदात होते. जास्त करुन रेवा. कारण आईसारखी माया करणारी सासु आणि बापुंसारखेच प्रेमळ सासरे शंकरच्या रुपात मिळालेले असताना तिला अजुन काय हवे होते? गणेश, मिनी, चंदा आणि लतिका कायम एकमेकांच्या संपर्कात रहात होते. आपल्या मुलाबाळांसहीत कधी मधी एखादे गेटटुगेदर करत होते. अन हे सारे राजी अन शंकर आनंदाने अनुभवत होते. सुख सुख म्हणतात ते हेच अन या सुखाला आता कुणाचीही दृष्ट नको लागायला असे म्हणत मनोमन देवाला नमस्कार करत होते.